मंचर : पुणे-नाशिक महामार्गावर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंना रांगा लागल्या होत्या. कांदा व दुधाचे भाव घसरल्याने कांदे व दूध रस्त्यावर ओतून निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा रास्ता रोको करण्यात आले. बैलगाडा शर्यत सुरू करा, अशा घोषणाही शेतकऱ्यांनी या वेळी दिल्या.दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टिका केली. शेतकरी टिकला, तरच देश चालेल. मात्र, केंद्रातील मोदी व राज्य सरकार हे शेतकरी व ग्रामीण भागाच्या विरोधातील सरकार आहे. हे सरकार लायक नसून सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा त्यांनी निषेध सभेत दिला. ते म्हणाले, ‘‘अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारचा दोन वर्षांचा प्रवास पाहिला तर फक्त ठराविक उद्योगपतींना अच्छे दिन आले असून, सर्वसामान्य माणसांचे मात्र कंबरडे मोडले आहे. हे सरकार ग्रामीण भागाच्या विरोधातील सरकार आहे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारविरोधात संघर्ष करण्याची तयारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी ठेवावी.’’ या वेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग भय्या पाचुंदकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव शरद शिंदे, प्रभाकर बांगर, राहुल पडवळ, संदीप थोरात, राजू बेंडे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश खिलारी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)राज्याचे मुख्यमंत्री स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा देतात. त्यांना मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पद सोडून दिले पाहिजे. महाराष्ट्र उद्ध्वस्त करून गुजरात वाढविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहेत. सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल.- दिलीप वळसे-पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष
कांदा, दूध रस्त्यावर ओतले
By admin | Published: May 28, 2016 4:19 AM