मिलिंद कांबळे, पिंपरी गाणी, नृत्य, विनोद, बोली भाषेचा समर्पक वापर करून जिवंत देखावे सादर केले जात आहेत. या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा वसा शहरातील कलाकार आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे. शासनाच्या प्रसिद्धीपेक्षा या माध्यमातून गणेशोत्सवात होणारी जनजागृती अधिक परिणामकारक ठरत आहेत. शहरात जिवंत देखावा सादर करणाऱ्या मंडळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे यंदा ६०पेक्षा अधिक ठिकाणी जिवंत देखावे पाहावयास मिळत आहेत. सद्य:स्थिती, समाजप्रबोधन, जनजागृती आदी विषयांना हात घालत शहरातील नवोदित कलाकारांचे ग्रुप मंडळामध्ये आपली कला प्रदर्शित करीत आहेत. लाभले भाग्य बोलतो मराठी, शोध नवा भारताचा, शेतकऱ्यांची आत्महत्या, माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, शेतकरी दिन, स्वांतत्र्याचा लढा, स्वच्छ भारत, पाणी वाचवा, सोशल मीडियाचा मारा, नवी पिढी, व्यसनाधीनता, चंगळवाद, तसेच पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे जिवंत रूपात मांडण्यात आले आहेत. एखादा विषय घेऊन त्यावर संवादलेखन करून पटकथा तयार केली जाते. संगीत, गाणी यांचा वापर करून सीडी तयार केली जाते. त्या अनुषंगाने कलाकार नृत्य, कला आणि संवाद सादर करतात. सुमारे २० ते ४० मिनिटांचा ‘शो’ असतो. तसेच, विनोद आणि गमतीदार प्रसंगांची पेरणी केली जाते. यामुळे देखावा अधिक प्रभावी ठरतो. असे जिवंत देखावे, पाहण्यासाठी गर्दी होत आहे. दिवसातून ५ ते ६ शो सादर केले जातात. यामध्ये कला आणि नृत्य असे दोन प्रकार आहेत. गु्रपसोबत मंडळाचे कार्यकर्ते जिवंत देखाव्यात सहभाग घेत आहेत. एका देखाव्यात साधारण ५ ते २५ कलाकारांचा समावेश असतो. त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश वाढत आहे. संस्कृती क्रिएशनच्या आशा नेगी यांनी सांगितले, ‘‘ग्रुपतर्फे सन २००३पासून जिवंत देखावे सादर केले जात आहेत. दर वर्षी ६ मंडळांमध्ये देखावे असतात नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळते. यातून अनेक कलाकार नाटक, टीव्ही आणि चित्रपटांत झळकले आहेत.’’ स्वामी समर्थ गु्रपच्या सुरेखा बाविस्कर यांनी सांगितले, ‘‘स्थानिक कलाकारांना एकत्रित करून देखावे सादर केले जातात. गणेशोत्सवात रोज रात्री पथकाचे शो होतात. शेकडो नागरिक देखाव्यांचा आनंद घेतात. या माध्यमातून गणेशाची अनोखी भक्ती केली जाते.’’
देखाव्यांतून समाजप्रबोधन
By admin | Published: September 25, 2015 12:57 AM