Join us  

शाम्पू बदलला तर खरंच केस गळती थांबते? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात शाम्पू वापराविषयी ४ गैरसमज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2022 5:23 PM

Misconception About Hair Wash with Shampoo : मैत्रीणींच्या सल्ल्याने तर कधी आणखी कोणाच्या सांगण्यावरुन शाम्पू बदलण्याचा निर्णय घेतो.

ठळक मुद्देसंपूर्ण केसांना शाम्पू लावतो. पण तसे न करता शाम्पू हा फक्त मुळांना लावायला हवा. शाम्पू वापरताना त्वचारोगतज्ज्ञांशी योग्य ती सल्ला मसलत करुन मगच निवड करायला हवी. 

शाम्पू बदलला की केस गळती थांबते का, सारखे केस धुतले की केस जास्त प्रमाणात गळतात का असे प्रश्न आपल्याला कायम पडतात. केस पातळ होण्याचे, गळण्याचे, वाढ न होण्याचे कारण आपला शाम्पू असतो असे आपल्याला वाटते. आपले केस लांब, काळेभोर आणि दाट असावेत असं प्रत्येकीला वाटतं. त्यासाठी आपण सतत काही ना काही प्रयत्न करत असतो. पण आपल्या प्रयत्नांना यश येतंच असं नाही. अशावेळी आपण कधी मैत्रीणींच्या सल्ल्याने तर कधी आणखी कोणाच्या सांगण्यावरुन शाम्पू बदलण्याचा निर्णय घेतो (Misconception About Hair Wash with Shampoo). 

शाम्पू बदलल्यामुळे आपल्या या सगळ्या तक्रारी दूर होतील असं आपल्याला वाटतं. मात्र त्वचारोगतज्ज्ञ याविषयी महत्त्वाची माहिती आपल्याशी शेअर करतात. प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जयश्री शरद याविषयी सांगतात, बाजारात वास येणारे तसेच वेगवेगळ्या फ्लेवर्सचे शाम्पू उपलब्ध आहेत. कधी जाहिरातींना भुलून तर कधी इतर कोणी वापरते म्हणून आपण वेगवेगळे शाम्पू वापरतो. इतकेच नाही तर काही वेळा आपण नैसर्गिक वस्तूंचा वापर करुन तयार करण्यात आलेले हर्बल शाम्पू वापरण्याला प्राधान्य देतो. या सगळ्याचा आपल्या केसांवर होणाऱ्या परिणामांविषयी आपल्या मनात बरेच गैरसमज असतात. डॉ. शरद याविषयी काय सांगतात पाहूया...

१. शाम्पू बदलल्यावर केसगळती कमी होईल

शाम्पूचे मुख्य काम केसांच्या मुळाशी असलेला भाग स्वच्छ करणे हे असते. आपली केसांच्या आतली त्वचा कोरडी आहे की तेलकट, बाहेरचे हवामान कसे आहे यावर अवलंबून असते. या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या शाम्पूची निवड किंवा बदल करायला हवा. त्यामुळे शाम्पू बदलल्यावर आपली केसगळती थांबेल असा विचार करणे चूक आहे. 

२. रोज शाम्पू केल्यावर केसगळती वाढेल

आपल्या केसांच्या मूळे रोज जास्त प्रमाणात धूळ किंवा प्रदूषण यांच्या संपर्कात येत असतील, आपल्याला खूप घाम येत असेल तर आपण रोज शाम्पू करण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्या. तरच आपले केस आणि केसांची मुळे साफ राहू शकतील हे लक्षात घ्या. 

(Image : Google)

३. सल्फेट असलेला शाम्पू केसांसाठी चांगला नसतो 

सल्फेट हा एक केस साफ होण्यासाठी उपयुक्त असणारा घटक आहे. या घटकामुळे केसांच्या मुळाशी असलेली घाण आणि तेल साफ होण्यास मदत होते. आपल्या केसांचा पोत कसा आहे त्यानुसार शाम्पूची निवड केली जाऊ शकते. काही जणांच्या केसांना सल्फेट असलेला शाम्पू सूट होत नाही हे खरे असले तरी शाम्पू वापरताना त्वचारोगतज्ज्ञांशी योग्य ती सल्ला मसलत करुन मगच निवड करायला हवी. 

४. शाम्पू डोक्याच्या मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत लावायचा

हा समज अतिशय चुकीचा आहे. शाम्पू केसाच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत लावायला हवा असे आपल्याला वाटते. त्यामुळे आपण संपूर्ण केसांना शाम्पू लावतो. पण तसे न करता शाम्पू हा फक्त मुळांना लावायला हवा. यामुळे केसांच्या मुळांशी असणारी घाण, तेल, धूळ, डेड स्कीन दूर होण्यास मदत होते. नंतर पाण्याने केस धुताना हा फेस केसांवरुन आपोआप खाली येतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी