हिवाळ्यात थंडी गुलाबी असली तरी गाल, ओठ आणि पूर्ण त्वचा कोरडी पडून लालसर पडते. क्रीम लावून त्वचेची जपणूक करता येईलही, मात्र केसगळती सुरु झाली की सौंदर्याला जणू ग्रहण लागते. आधीच कोरडे झालेले केस गळू लागल्यामुळे पातळ, विरळ दिसू लागतात. तुम्हालाही केसगळतीची काळजी लागली असेल तर जाणून घ्या सोपे आणि घरगुती उपाय, ज्यामुळे केसगळती थांबेल आणि केस मऊसूत होतील.
हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे केस कोरडे होतात. त्यामुळे ते कोरडे होतात. तसेच, कधीकधी हवामानातील बदलामुळे शरीरात हार्मोनल बदल होतात, हे देखील केस गळण्याचे एक कारण होऊ शकते. पण थोडी काळजी घेतल्यास आणि दिलेले घरगुती उपाय केल्यास तुमचे केस गळणे कमी होऊ शकते. त्यासाठी केसांना आवश्यक पोषण (Winter Haircare Tips) कसे द्यायचे ते जाणून घेऊ.
कांद्याचे हेअर मास्क :
१ कप कांद्याचा रस, १ चमचा मध, १ चमचा गुलाबजल
कृती : एका भांड्यात कांद्याचा रस, मध आणि गुलाबपाणी एकत्र करा. केसांच्या मुळांवर आणि टाळूवर लावा. अर्धा तास हेअर मास्क तसाच राहू द्या आणि नंतर सौम्य शैम्पूने केस धुवा.
फायदे : कांद्याचा रस केसांच्या मुळांना पोषण देतो आणि केस गळणे थांबवतो. मधामुळे केसांमध्ये आर्द्रता निर्माण होते, तर गुलाबपाणी केसांना ताजेपणा आणि सुंदर सुगंध देते.
आवळा हेअर मास्क :
३ चमचे आवळा पावडर, १ चमचा जास्वंदाच्या फुलांची पावडर, १ चमचा खोबरेल तेल, १ चमचा कोरफड जेल
कृती : सर्व साहित्य मिक्स करून पेस्ट बनवा. ती टाळूला आणि केसांना लावा. अर्ध्या तासाने सौम्य शॅम्पू लावून केस स्वच्छ धुवून घ्या. कोरड्या कपड्याने केस पुसून घ्या आणि नैसर्गिकरित्या वाळू द्या. जास्त झटकू नका किंवा ओले असताना विंचरू नका.
फायदे: हा मास्क केसांना मुळापासून पोषण देतो, केस मजबूत करतो, कोंडा कमी करतो आणि केसांची वाढ करण्यास मदत करतो.
मेहेंदी हेअर मास्क :
१ कप मेंदी पावडर, १ मोठा चमचा कॉफी पावडर, १ चमचा दही, १ चमचा गुलाबजल, गरजेनुसार पाणी
कृती : सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर आणि टाळूवर नीट लावा. २-३ तासांनी केस फक्त पाण्याने धुवा.
फायदे: हा पॅक केसांना नैसर्गिक रंग आणि चमक देतो, केसांची मुळे मजबूत करतो आणि कोंडा दूर करतो. तसेच केस मऊ आणि चमकदार बनवतो.
केस गळणे रोखण्यासाठी नैसर्गिक उपाय हे सर्वात प्रभावी आणि सुरक्षित पर्याय ठरतात. वर दिलेल्या पॅक बरोबरच कोरफड, आवळा, मेथी आणि मेंदी याच्या नित्य वापरामुळे केस मऊ आणि लांबसडक होतात. त्याबरोबरच तुमचा आहार सात्विक आणि पौष्टिक असेल तर केसांना शरीरातूनही चांगले पोषण मिळू शकते. त्यामुळे महागडे प्रोडक्ट वापरण्याऐवजी नैसर्गिक उपचार करा आणि केस निरोगी ठेवा!