Join us  

उपवासाला फक्त तेलकट -कोरडंकोरडं न खाता आहारात हवेत हे ४ पदार्थ, उपवासाने शरीराला होईल फायदा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2024 7:31 PM

Healthy dishes to add to your vrat feast : What is the best healthy food for Navratri fast : उपवासाला रोज आवर्जून खावेत असे ४ पदार्थ, थकवा होईल दूर राहाल हेल्दी...

नवरात्रीत (Navratri 2024) अनेकजण उपवास करतात. उपवास म्हटलं की आपण काही मोजकेच पदार्थ खाऊ शकतो. शक्यतो उपवासादरम्यान पचायला हलके, पौष्टिक आणि ऊर्जा देणारे असे सकस अन्नपदार्थ खाल्ले पाहिजे. असे असले तरीही आपण नेमके याउलटच करतो. उपवासाला फराळ करताना आपण गोडधोड, तेलकट, मसालेदार असेच पदार्थ खातो. उपवासाच्या नावाने खरंतर काहीजण भरपूर प्रमाणात खातात. उपवास करताना काहीकाळ उपाशी राहून त्यानंतर लगेच असे तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चुकीचे असते(What is the best healthy food for Navratri fast).

उपवास करताना नेमके काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल अनेकजणांना माहिती नसते. उपवास करताना चुकीच्या पद्धतीने आहार केल्यास आपली तब्येत बिघडू शकते किंवा पोटाच्या अनेक समस्या होऊ शकतात. उपवासाला आपण साबुदाणा खिचडी, वडे, उपवासाची मिसळ,थालीपीठ, वरईचा भात, चिवडा, वेफर्स असे तेलकट आणि पचायला जड असणारे पदार्थ खातो. उपवासानिमित्त खाल्ले जाणारे हे पदार्थ पोटभरीचे असले तरीही त्यातून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत.  यासाठीच उपवास करताना पोटभरीचे पदार्थ खाण्यासोबतच काही पौष्टिक पदार्थांचा देखील आहारात समावेश करणे गरजेचे असते. यासाठी उपवास करताना नेमके कोणते पदार्थ आपल्या आहारात असायला पाहिजे ते पाहूयात(Healthy dishes to add to your vrat feast).

उपवास करताना कोणते पदार्थ आवर्जून खायला पाहिजेत ? 

१. फळं :- उपवास करताना आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश करावा. रोज सकाळी एक सफरचंद किंवा आपल्या आवडीचे एखादे फळं खावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल. याशिवाय केळी, पपई, पेरु, संत्री ही फळे खावीत. ही फळे खाल्ल्याने शरीराला फायबर आणि भरपूर ऊर्जा मिळते. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, यामुळे वारंवार भूक लागत नाही परिणामी वेटलॉस करण्यासही मदत होते. 

२. नारळ पाणी :- उपवास करताना दिवसभर हायड्रेटेड राहण्यासाठी सकाळी एक ग्लास शहाळ्याचे पाणी प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होईल. यासोबतच वजन कमी करण्यास देखील फायदेशीर ठरेल. शहाळ्याचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात. यामुळे शरीरात ऊर्जा येते आणि रिकाम्या पोटी गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही.   

गरबा खेळताना खूप घाम येतो-दुर्गंधीही येते घामाची? १ भन्नाट ट्रिक-डिओपेक्षा भारी उपाय...

३. सुकामेवा :- उपवासादरम्यान दिवसभर इतर कामे करण्यासाठी ताकद आणि ऊर्जाही लागते. काहीजण संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात त्यांनी मूठभर सुकामेवा रोज खावा. सुकामेवा खाल्ल्याने आपल्या शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळेल याचबरोबर आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता भरुन काढेल. उपवासाला आपण काजू, बदाम, मनुका, अक्रोड, आणि खजूर खाऊ शकता. 

गरबा खेळून पाय खूप दुखतात? करा ७ सोपे स्ट्रेचिंग-दुसऱ्या दिवशी पुन्हा गरबा खेळाल जोशात...

४. ताक आणि दही :- उपवासाच्यावेळी लिक्विड पदार्थ पिण्याकडे अधिक जास्त लक्ष द्यावे. यासाठी रोजच्या आहारात दही आणि ताकाचा समावेश करावा. दही खायला आवडत नसेल तर आपण ताक किंवा लस्सी तयार करून पिऊ शकता. ताक तयार करतांना त्यात जिरे, रॉक सॉल्ट घालावे यामुळे पचनक्रियेचे कार्य सुधारण्यास मदत मिळेल.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४फिटनेस टिप्सनवरात्रीनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४