Join us  

फळं खाताना कायम लक्षात ठेवा ३ गोष्टी, फळांतून मिळेल भरपूर पोषण, राहाल फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2023 5:39 PM

3 Rules of Eating Fruits : शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सिझनल फळांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.

ठळक मुद्देफळं खायलाच हवीत, पण कधी, केव्हा, कशी हे समजून घ्यायला हवेआहाराबाबत काही नियम पाळल्यास त्याचा आरोग्य उत्तम राहण्यास चांगला उपयोग होतो

आपला आहार समतोल असायला हवा असं आपण नेहमी ऐकतो. आहारात फळं, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ असं सगळं योग्य त्या प्रमाणात असायला हवं असं आपण नेहमी ऐकतो. विविध प्रकारच्या फळांमधून आरोग्याला पोषणमूल्य मिळण्यास मदत होते. फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, लोह यांसारखे विविध घटक असल्याने शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सिझनल फळांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा (3 Rules of Eating Fruits). 

असं असलं तरी फळं दिवसाच्या कोणत्या वेळेला खावीत, किती प्रमाणात, कशा पद्धतीने खाल्ल्यास फळांतून जास्त पोषण मिळण्यासमदत होते. यांबाबत आपल्याला माहित असतेच असे नाही. म्हणूनच आपण आपण फळं खाताना आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात अशा ३ गोष्टी समजून घेणार आहोत. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा आपल्याला याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहेत. 

(Image : Google)

१. बरेचदा आपण जेवण झालं की फळं खातो. पण असे करणे योग्य नाही. कारण जेवणातील घटक हे शिजवलेले असतात आणि फळ हे कच्च्या स्वरुपात असते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पचत नाहीत. फळं पचायला केवळ १ तास लागतो तर आपण खाल्लेले इतर अन्न पचायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे जेवणानंतर किमान २ तासाचा गॅप घेऊन मगच फळं खायला हवीत. किंवा फळ खाल्ल्यानंतर १ तासानंतर जेवावे. नाहीतर बद्धकोष्ठता, सूज येणे, गॅसेस, अपचन यांसारख्या तक्रारी उद्भवतात.

२. बरेच जण फळं पचायला हलकी असतात म्हणून रात्रीच्या जेवणात फक्त फलाहार घेतात. मात्र असे नसून फळं पचायला जड असतात. फळांमध्ये फ्यूमारीक अॅसिड, टार्टारीक अॅसिड, ऑक्सिलिक अॅसिड, सायट्रीक अॅसिड, मॅलिक अॅसिड अशी विविध अॅसिड असतात. झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिन हे हार्मोन तयार होण्यात या सगळ्या अॅसिडचा अडथळा येतो. त्यामुळे सुर्यास्तानंतर फळं खाऊ नयेत. त्यापेक्षा ४ किंवा ५ वाजता आपण चहासोबत काहीतरी खातो त्याऐवजी फळ खाणे केव्हाही उत्तम.

३. फळांचे काही गट असतात, वेगवेगळ्या गटातील फळं अजिबात वेगळी करु नयेत. सफरचंद, बेरीज, चेरीज आणि पेरु ही एका गटात येतात. तर पपई, आंबा, केळी, पिच यांसारखी फळं गोड गटात येतात. संत्री, मोसंबी, द्राक्षं या आंबट फळांचा एक गट असतो. कलिंगड, खरबूज या पाणीदार फळांचा वेगळा गट असतो. यातील वेगवेगळ्या गटातील फळं एकावेळी खाणं योग्य नाही. त्यामुळे एकावेळी एकाच गटातील फळं खायला हवीत.  

टॅग्स :अन्नआहार योजनाफळे