Join us  

पावसाळ्यात मीठ व साखरेला ओलसरपणा येऊन गुठळ्या तयार होतात ? ६ सोप्या घरगुती टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2023 11:44 AM

How To Keep Sugar & Salt Dry In The Rainy Season : पावसाळ्यात वातावरणातील दमटपणामुळे मीठ व साखरेला ओलसरपणा येतोय ? काही सोप्या टिप्सचा वापर करून पाहूयात...

पावसाळा म्हटलं की सगळीकडे ओलावा, चिखल, हवेतील आर्द्रता आलीच. या वातावरणातील ओलाव्यामुळे किचनमधील पदार्थ कितीही जपून व्यवस्थित साठवून ठेवले तरीही ते काही काळाने सादळतात किंवा त्यांना ओलसरपणा येतो. आपल्यापैकी बऱ्याच गृहणींनी पावसाळ्यात असा अनुभव घेतलाच असेल. किचनमधील काही पदार्थ सादळून खराब होतात ते अक्षरशः फेकून द्यावे लागतात. अनेक पदार्थांना एक वेगळाच चिकटपणा येतो. असे ओलसर, दमट पदार्थ खाल्ले जात नाहीत आणि मग वाया जातात. 

मीठ व साखर हे आपल्या किचनमधील रोजच वापरले जाणारे दोन मुख्य पदार्थ आहेत. परंतु पावसाळ्यात हे दोन्ही पदार्थ वातावरणातील दमटपणामुळे ओलसर होऊन ओले व चिकट लागतात. मीठ आणि साखर हे असे पदार्थ आहेत जे बदलत्या वातावरणामुळे लवकर खराब होतात. मात्र, रोजच्या स्वयंपाकात लागत असल्यामुळे हे पदार्थ टिकवणं कठीण बनतं. पावसाळयात मीठ व साखर कितीही योग्य पद्धतीने साठवून ठेवले तरीही त्यांना पाणी सुटून त्यांच्या गुठळ्या तयार होतात. असे होऊ नये म्हणून आपण काही सोप्या घरगुती उपायांचा वापर करणार आहोत, यामुळे मीठ व साखर ओलसर न होता पावसाळ्यातही व्यवस्थित टिकून राहील(6 Genius Tricks To Prevent Salt & Sugar From Clumping and Becoming Damp).

पावसाळयात वातावरणातील दमटपणामुळे मीठ व साखर ओलसर होते ? 

१. मीठ व साखर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा :- किचनमध्ये स्वयंपाकासाठी लागणारे मीठ व साखर भरून ठेवण्यासाठी बऱ्याचदा प्लास्टिक किंवा स्टीलचे डबे वापरले जातात. मात्र पावसाळ्याच्या काळात मीठ व साखर नेहमी काचेच्या बरणीत भरून ठेवणे सोयीचे ठरेल. कारण प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्यामध्ये बाहेरील उबदार वातावरणामुळे ओलसरपणा येऊ शकतो. मात्र काचेच्या बरणीला त्या मानाने ओलसरपणा नक्कीच कमी येतो ज्यामुळे आपल्या घरातील मीठ व साखर कोरडी राहिल.

 

२. तांदूळाची पोटली बांधून ठेवा :- मीठ व साखरेच्या डब्यामध्ये तांदळाचे काही दाणे टाकल्याने फायदा होतो. साखरेत किंवा मिठामध्ये तांदळाची पुरचूंडी टाकून त्यामध्ये ठेवून द्या. यामुळे त्यामध्ये तयार झालेला ओलावा  तांदूळ शोषून घेईल आणि साखर किंवा मिठाला ओलेपणा लागणार नाही.

३. साखरेत लाकडाची टुथपिक ठेवा :- साखरेत टुथपिक ठेवणे हा उपाय ऐकून आपल्याला थोडं आश्चर्य वाटेल. कारण लाकडाच्या टुथपिकमुळे साखरेमधील ओलावा निघून जाईल. शिवाय साखरेमधून टुथपिक बाजूला काढणं खूपच सोपं जाईल. पावसाळ्यात साखर टिकवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. याचबरोबर पावसाळ्यात साखर ओली होऊ नये म्हणून आपण साखरेच्या डब्यांत ६ ते ७ लवंग आणि त्यासोबतच ७ ते ८ राजमा घालून ठेवू शकतो, यामुळे साखर ओली न होता, बराच काळ टिकते. 

सुके खोबरे खवट होते, काळे पडते ? २ उपाय, खोबरे टिकेल भरपूर...

४. झाकणाला टिश्यू पेपर लावा :- पावसाळ्यात दमटपणामुळे साखर व मीठ ओलसर होऊ नये म्हणून बरणीच्या झाकणाला टिश्यू पेपर लावून ठेवावा. मीठ व साखर बरणीत ओतल्यानंतर ती वातावरणामुळे खराब होऊ नये यासाठी हा एक चांगला उपाय आहे. साखर बरणीत भरल्यावर वरून झाकणाच्या खाली एक टिश्यू पेपर लावून ठेवा. ज्यामुळे वातावरणातील ओलावा सर्वात आधी टिश्यू पेपर शोषून घेईल. ज्यामुळे तो ओला किंवा दमट होईल आणि साखर व मीठ खराब होणार नाही. टिश्यू पेपर ओलसर झाल्यावर तो लगेच बदला ज्यामुळे साखर, मीठ  खराब होणार नाही. 

रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...

५. ब्लोटिंग पेपरचा वापर करावा :- साखर किंवा मीठ जास्त दिवस टिकवण्यासाठी ब्लोटिंग पेपरही वापरता येतो. याकरता बरणीमध्ये साखर भरताना त्यामध्ये आधी ब्लोटिंग पेपर ठेवा. त्यानंतर त्यावर साखर किंवा मीठ भरून ठेवावे. ब्लोटिंग पेपर त्यामधील एक्स्ट्रा मॉश्चर खेचून घेतं. साखर किंवा मीठ जास्त दिवस टिकवण्यासाठी ब्लोटिंग पेपरही वापरता येतो.

६. मीठ व साखर काढण्यासाठी कोरडा चमचा वापरा :- आपण मीठ व साखरेच्या बरणीत नेहमी एखादा छोटा चमचा ठेवतो, जेणेकरून मीठ व साखर व्यवस्थित बरणीतून काढता येईल. परंतु  लक्षात ठेवा हा चमचा कोरडा असायला हवा. चुकूनही जर चमचा ओला किंवा दमट असेल तर त्यामुळे पूर्ण बरणीतील मीठ व साखर खराब होऊ शकते.

मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात नारळ फोडण्याची १ सोपी ट्रिक, नारळ फोडण्याचं अवघड काम होईल सोपं...

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्स