Join us  

पास्ता शिजवलेले पाणी फेकू नका, ५ टिप्स - पदार्थ होतील रुचकर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2023 6:38 PM

5 Best Ways To Use Pasta Leftover Water : पास्ता अर्धवट शिजवून घेतलेल्या या पाण्याचा वापर नक्की कशा प्रकारे करता येऊ शकतो हे समजून घेऊयात.

चमचमीत सॉस, चीज, मसाले वापरून बनवलेला पास्ता म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला आपसूकच पाणी सुटत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर चायनीज, इटालियन असे वेगवेगळे क्युझिन आपण मागवत असतो. त्यातही पिझ्झा, पास्ता हे आपले आवडते इटालियन पदार्थ आहेत. पास्ता ही घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी डिश आहे. पास्ता ही अशी रेसिपी आहे की जी खूप कमी वेळांत झटपट घरी बनवू शकतो. पास्ता घरी बनवताना सर्वप्रथम आपण गरम पाण्यात मीठ आणि तेल घालून तो पास्ता थोडासा शिजवून घेतो. यानंतर हा पास्ता  एका चाळणीत काढून त्यातील संपूर्ण पाणी निथळून घेतो. परंतु कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की या निथळून घेतलेल्या पाण्याचा वापर करून आपल्या रोजचा स्वयंपाक अधिक रुचकर व चविष्ट करू शकतो. पास्ता अर्धवट शिजवून घेतलेल्या या पाण्याचा वापर नक्की कशा प्रकारे करता येऊ शकतो हे समजून घेऊयात(5 Best Ways To Use Pasta Leftover Water).

नक्की काय काय करता येऊ शकते ? 

१. सॉस किंवा पेस्ट मध्ये वापरू शकता - जरा आपण घरच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे सॉस किंवा पेस्ट तयार करत असाल तर यामध्ये तुम्ही हे पाणी मिक्स करू शकता. पास्ता उकळवून घेतलेल्या पाण्यात स्टार्च आणि मिठाचे प्रमाण भरपूर असते. खरंतर मीठ आणि स्टार्च हे दोन्ही घटक बाईंडिंग, थिकनिंग एजंट आहेत. याच्या वापरामुळे तुमच्या सॉस आणि पेस्टची चव अधिक वाढेल. तसेच ते अधिक घट्ट होण्यास मदत होईल. 

२. डाळ व कडधान्य भिजवून ठेवण्यासाठी - डाळ, राजमा छोले किंवा इतर कडधान्य बनविण्याआधी त्यांना पाण्यांत भिजवून ठेवणे खूप गरजेचे असते. ही कडधान्य किंवा डाळ भिजविण्यासाठी आपण सध्या पाण्याचा वापर करतो. पास्ता उकळवून घेतलेल्या पाण्यात जर आपण डाळी आणि कडधान्य भिजत घातली तर त्या पाण्यांत व्यवस्थित भिजल्यामुळे अधिक चविष्ट बनतात.  

३. कणीक मळण्यासाठी - छान मऊसूत पोळ्या होण्यासाठी कणीक व्यवस्थित मळणे गरजेचे असते. तेल, मीठ, पाण्याचा वापर करून आपण छान मऊ कणीक मळतो. हे कणीक मळताना जर आपण या पाण्याचा वापर केला तर कणीक छान भिजून मऊ होते. यामुळे पोळ्या कापसासारख्या मऊसूत होतात व खाताना अधिक चविष्ट लागतात. 

४. भाज्या स्टीम करण्यासाठी किंवा धुण्यासाठी - आपण बाजारातून अनेक प्रकारच्या भाज्या आणतो. या भाज्यांना काही वेळा माती चिकटलेली असते. किंवा बाजारातून खरेदी करून आणलेल्या भाज्या आपण धुवून घेतो. या भाज्या धुण्यासाठी या मिठाच्या पाण्याचा वापर केल्याने भाज्या स्वच्छ धुवून होतात. मिठामुळे या भाज्यांना चिकटलेली माती निघण्यास मदत होते. त्याचप्रमाणे काही भाज्या बनवताना आपण त्या आधी स्टीम करून घेतो जसे की पालक. या भाज्या स्टीम करताना या पाण्याचा वापर केल्याने भाज्या चांगल्या स्टीम होतात. 

५. सूप बनवताना वापरा - सूप बनवता आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या भाज्या आधी गरम पाण्यात वाफवून मग त्याचे सूप बनवतो. या भाज्या वाफवण्यासाठी या पाण्याचा वापर करता येऊ शकतो. एवढेच नव्हे तर भाज्या वाफवून झाल्यावर सूप तयार करताना त्याच्या कन्सिस्टंसीनुसार आपण त्यात पाणी घालतो. तेव्हा सुद्धा आपण या स्टॉक वॉटरचा वापर करु शकतो.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स