Join us  

उपवासाच्या नावाखाली तुम्ही Carb तर खात नाही? मग वजन वाढणारच; घ्या हेल्दी डाएट प्लॅन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2021 3:20 PM

उपवास म्हणजे उपाशी राहाणं, अगदीच थोडं खाणं किंवा सारखं खात राहाणं, जड पदार्थ जास्त खाणं असं नव्हे. उपवासाचा आदर्श आहार कसा असावा याबाबत सेलिब्रेटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एक डाएट चार्टच सांगितलेला आहे.

ठळक मुद्देउपवासाच्या दिवशी उठल्यानंतर काही पौष्टिक खाणं महत्त्वाचं आहे.दुपारच्या जेवणात अर्थात फराळाला आहारात धान्य आणि भाजी यांचा समावेश असायला हवा.रात्रीच्या जेवणाला अजिबात चुकवू नये. उपवासाला काही न खाता झोपल्यास पित्ताचा त्रास होतो, रात्री झोप शांत लागत नाही.

उपवास कोणाला आवडतात, तर कोणाला अजिबात नाही. कोणाला उपवास ही संधी वाटते तर कोणाला संकट, कोणाकडे उपवासाच्या पदार्थांचे इतके पर्याय असतात की ते करुन खाण्यासाठी, खाऊ घालण्यासाठी त्यांना उपवास हवेहवेसे वाटतात तर कोणाकडे उपवासाला काय करायचे याचे पर्याय कमी आणि प्रश्नच जास्त असतात. कोणी उपवासाकडे कसं बघतं हा मुद्दा नसून , उपवासाकडे कसं बघावं, त्यासाठी काय करावं हा आहे. उपवासाच्या आहारात काही चुका केल्यास उपवास हे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपवास म्हणजे आरोग्य सुधारणारी कृती आहे.

उपवासाचा आदर्श आहार बघता यात हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीराचं शुध्दीकरण होणं अपेक्षित आहे. हे आपण करत असलेल्या उपवासातून आपल्या आरोग्य आणि शरीराबाबत घडण्यासाठी उपवासाच्या दिवसभराच्या आहाराचा बारकाईनं विचार करायला हवा. उपवास म्हणजे उपाशी राहाणं, अगदीच थोडं खाणं किंवा सारखं खात राहाणं, जड पदार्थ जास्त खाणं असं नव्हे. उपवासाचा आदर्श आहार कसा असावा याबाबत सेलिब्रेटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एक डाएट चार्टच सांगितलेला आहे. सकाळी उठल्यापासून रात्रीच्या शेवटच्या खाण्यापर्यंत आहारात काय काय असायला हवं याची माहिती त्यात आहे. उपवासाच्या आहाराबाबत ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेला चार्ट जर नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात अंमलात आला तर नऊ दिवसाचे उपवास आपल्या शरीर मनाला ताजंतवानं आणि ऊर्जा देणारे ठरतील.

Image: Google

सकाळी उठल्यावर काय खावं?

उपवास आहे म्हणून अनेकजण एरवी सकाळी उठल्यावर जसं खातो तसं खाणं उपवासाच्या काळात टाळतात. पण ऋजुता दिवेकर यांनी उपवासाच्या दिवशी उठल्यानंतर खाणं महत्त्वाचं आहे हे सांगून त्यासाठी पर्यायही दिले आहेत. नवरात्रीच्या किंवा कोणत्याही उपवासाला सकाळी उठल्यावर ताजं फळ, थोडा सुकामेवा खायला हवा. रात्री मनुके पाण्यात भिजत घालावेत आणि ते सकाळी उठून चावून चावून खावेत. उपवासाच्या दिवसाची अशी हेल्दी सुरुवात दवसराच्या आपल्या उत्साही चलनवलनासाठी उपयोगी ठरते.

Image: Google

नाश्ता काय करणार?

उपवासाच्या नाश्त्याला थोडे जड पदार्थही चालतात. पण ते खाताना त्याचं प्रमाण हे र्मयादित असायला हवं असं ¬जुता दिवेकर म्हणतात. यासाठी सकाळी नाश्त्याला साबुदाणा खिचडी, दह्यासोबत शिंगाड्याच्या पिठाच्या पुर्‍या किंवा भजे किंवा रताळ्याची किंवा बटाट्याची खीर खाऊ शकतात. साबुदाणा भगरीचे डोसे, साबुदाणा इडली, उपवासाचे आप्पे खावेत. नाश्त्याचे हे पदार्थ भरपूर वेळ पोट भरलेलं असल्याची जाणीव देतात. शरीराला ऊर्जा आणि कामाची ताकद देतात.

Image: Google

दुपारच्या जेवणात काय?

उपवासाला दुपारच्या जेवणात अर्थात फराळाला आहारात धान्य आणि भाजी यांचा समावेश असायला हवा. त्यासाठी राजगिरा, कुट्टू आणि शिंगाड्याच्या पिठाची पोळी किंवा साबुदाणा, राजगिरा, भगर वेगवेगळी भाजून त्याच्या दळून आणलेल्या भाजणीचे उपवासाचे थालिपीठ बटाट्याच्या किंवा अरबीच्या सुक्या भाजीसोबत, नारळाच्या ओल्या चटणीसोबत किंवा कुट्टूच्या कढीसोबत खाता येतात. कढीसोबत थोडी भगार खाल्ली तरी चालते.

संध्याकाळी स्नॅक्स म्हणून काय खायचं?

नवरात्रीच्या उपवासात संध्याकाळच्या खाण्यालाही महत्त्व आहे. संध्याकाळी भूक लागली तर एखादं फळ, मिल्कशेक, ताक, शिकंजी, जलजीरा, रताळ्याचं चाट हे पदार्थ उत्तम पर्याय आहेत. यामुळे भूकही भागते आणि ताकदही मिळते.

Image: Google

रात्रीच्या जेवणाला..

उपवास आहे म्हणून रात्रीचं जेवण नको असं म्हणून उपाशी झोपणारेही अनेक आहेत. पण ऋजुता दिवेकर म्हणतात उपवासाला रात्रीचं जेवण अजिबात चुकवू नये. काही न खाता झोपल्यास पित्ताचा त्रास होतो, रात्री झोप शांत लागत नाही, त्यामुळे उपवासाच्या काळात चिडचिड वाढण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी थोडं का होईना काही खायला हवं असं ऋजुता दिवेकर म्हणतात. यासाठी दह्यासोबत भगर खाणं किंवा पनीरच्या रश्याच्या भाजीसोबत राजगिरा, शिंगाडा किंवा कुट्टुच्या पिठाची पोळी खावी.

उपवासाच्या योग्य आहाराचे फायदे

नवरात्रीच्या उपवासाला वर सांगितल्याप्रमांणे आहाराचे नियम पाळले तर त्याचे फायदेही लगेच अनुभवता येतात. नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास हे फायदे पडताळून बघण्याचा उत्तम काळ. कारण एवढे दीर्घ उपवास नवरात्रातच असतात.1.उपवासाला जर योग्य आहार घेतला नाही तर चिडचिड होणं, सतत मूड बदलणं हे त्रास होतात. पण वर दिलेले आहार नियम पाळल्यास हा त्रास होत नाही.2. संप्रेरकांचा समतोल उपवास आहार नियमांमुळे व्यवस्थित राहातो.3. उपवासाचे वर सुचवलेले पदार्थ खाल्ल्यास पचन संस्थेवरचा ताण कमी होतो. पचन सुलभ होतं. पचनाचे आणि पोटाचे त्रास होत नाही.4. उपवासाच्या काळात योग्य आहार घेतला तर त्याचा उपयोग शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास होतो. शरीर आतून शुध्द होतं. त्याचा परिणाम आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारतं. केसांच्या समस्याही या नवरात्रीतल्या नऊ दिवसांचे आहार नियम पाळून कमी होतात.5. उपवासाच्या काळात एरवी जाणवणारा थकवा योग्य आहारामुळे जाणवत नाही.