Join us  

दही फार आवडतं, मात्र दही खाण्याचे महत्त्वाचे नियम माहीत आहेत? वाट्टेल तसे दही खाल्ले तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2022 11:57 AM

दह्याचा वाद कायम असला तरी काही नियम पाळून ते खाल्ल्यास त्रास होत नाही....

ठळक मुद्देआयुर्वेदात सांगितलेले दही खाण्याचे नियम समजून घ्यायला हवेत.दही खावं, पण कधी, कसं, केव्हा हे समजून घ्यायला हवं.

डॉ. गीता मुळूक, आयुर्वेदतज्ज्ञ

दही आरोग्यासाठी चांगेल की वाईट हा वाद मागील बऱ्याच काळापासून आहे. दही कोणत्या पदार्थांबरोबर खावे, दिवसाच्या कोणत्या वेळेला खाल्लेले चांगले, दह्यामुळे आरोग्यावर कोणते परीणाम होतात यांविषयी आयुर्वेदात विस्ताराने सांगितलेले आहे. दही खूप आवडतं त्यामुळे त्याशिवाय जेवणच पूर्ण होत नाही असे म्हणणारे अनेक जण आपल्या आजुबाजूला असतात. जेवणात दही असेल तर पोटाला शांत वाटते, दह्यामुळे जेवणाचा स्वाद वाढण्यास मदत होत असल्याचे म्हणत अनेक जण रोजच्या जेवणात दह्यावर ताव मारतात. दह्यात आरोग्यासाठी उपयुक्त असे प्रोटीन, कॅल्शियम व्हीटॅमिन बी ६, बी १२ असे घटक असतात असे मॉडर्न सायन्स म्हणते. मात्र दह्यामुळे आरोग्याला काही प्रमाणात हानी पोहोचत असल्याने आयुर्वेदानुसार दही खाण्याचे काही नियम  सांगितले आहेत. त्यानुसार कोणी, केव्हा आणि कसे दही खायचे याचे नियम समजून घेतले तर आपल्या आरोग्यावर दह्याचे विपरित परिणाम होणार नाहीत.

१. आयुर्वेदानुसार दही पचायला जड असते त्यामुळे शक्यतो ते टाळलेलेच बरे. मात्र जे लोक भरपूर व्यायाम करतात त्यांनी आहारात मर्यादित प्रमाणात दह्याचा समावेश केल्यास चालतो. 

२. दही खायचेच असेल तर अगदी कमी प्रमाणात खावे. तेही साखर, मध किंवा तूप घालून खाल्ल्यास पचायला सोपे होते. 

३. ज्यांना ताप, सर्दी आहे किंवा त्वचेशी आणि रक्ताशी निगडित आजार आहेत त्यांनी आहारात दह्याचा अजिबात समावेश करु नये. 

४. नुसते दही खाण्यापेक्षा त्याचे ताक करुन प्यायलेले उत्तम. थंडीच्या दिवसांत दह्यापासून केलेल्या ताकाची कढी हाही उत्तम पर्याय ठरु शकतो. 

५. दह्याचे ताक केल्याने कमी प्रमाणात दही पोटात जाते तसेच पाण्यात मिसळल्याने तसेच त्यात मीठ, हिंग किंवा जीरेपूड घातल्याने त्यावर प्रक्रिया होते आणि ते पचायला सोपे होते.

६. दही शक्यतो सकाळी किंवा दुपारी खावे, संध्याकाळनंतर दही अजिबात खाऊ नये.

७. आपल्याकडे कोशिंबीरीमध्ये अनेकदा दह्याचा वापर केला जातो, तो ठिक आहे कारण त्यामुळे सलाडमधील फायबर पचायला मदत होते. पण यातील दह्याचे प्रमाण कमी असावे.

८. दही रक्तात योग्य पद्धतीने मिसळत नसल्याने रक्तदोष निर्माण होतात. त्यामुळे विविध आजारांना विनाकारण निमंत्रण मिळू शकते.

९. ज्यांना अॅसिडीटीचा त्रास आहे अशांसाठी दही अजिबात चांगले नाही. अॅसिडीटीमध्ये आधीच शरीरातील आम्ले खवळलेली असतात. यामध्ये दही खाल्ल्यास हा त्रास वाढण्याचीच शक्यता जास्त असते. दह्यातील आम्लांचे शरीरातील आम्लांशी एकत्रिकरण झाल्यास त्यातून अॅसिडीटीचा त्रास वाढतो. 

१०. दह्यामुळे कफ वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्हाला श्वसनाशी निगडित तक्रारी, अस्थमा असल्यास दही अजिबात खाऊ नये. 

११. जुना सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनीही आहारात दह्याचा समावेश केल्यास हा त्रास जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सांधेदुखी असणाऱ्यांनी दही खाणे टाळलेलेच बरे.

१२. दूध, कांदा, तळलेले पदार्थ, आंबा किंवा इतर फळे यांच्याबरोबर दही खाणे धोक्याचे असते. यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात आणि त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स