Join us  

खाता-खाता हातातला पदार्थ सांडला तर तुम्ही काय करता ? उचलून तोंडात टाकण्यापूर्वी हे संशोधन वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 7:53 PM

Is It Safe to Eat Food That's Dropped to the Floor ? : खाली पडलेलं खाऊ नये असं आपल्याला वडिलधारे सांगतात ते पटत नाही, पण आता संशोधनच सांगते आहे गंभीर इन्फेक्शनचा धोका

आपण आपल्या आवडीचा  पदार्थ खात असतो, तो सांडतो, जमिनीवर पडतो. अशावेळी खालचे उचलून खाऊ नये असं आपण लहान मुलांनाही सांगतो. पण क्वचित तसं होत नाही, चटकन हात खाली जातो आणि आपण खाली पडलेलं उचलून खातो.  पण आता अमेरकिन संशोधन सांगते की असे खाली पडलेले पुन्हा उचलून खाणे तब्येत आणि पोटासाठी अत्यंत धोकादायक असू शकते.

एकदा खात असलेले अन्न हातांतून सांडून खाली पडले तर असे मानले जाते की जमिनीवर पडल्यानंतर ३ ते ५ सेकंदांपर्यंत अन्न चांगले राहते आणि ते खाल्ले जाऊ शकते. परंतु हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे ? असे मानणे खरेच योग्य आहे की नाही? अन्न जमिनीवर पडल्यानंतर लगेच दूषित होते का? बॅक्टेरिया किती लवकर अन्नावर परिणाम करू शकतात? या सगळ्या प्रश्नांचा विचार आपल्या डोक्यांत लगेच येतोच. त्यामुळे जमिनीवर पडलेले अन्न परत उचलून खावे की खाऊ नये?(Is It Really OK To Eat Food That’s Fallen On The Floor, Experts Says).

 रिसर्च नेमकं काय सांगतो ? 

अमेरिकन कौन्सिल ऑन सायन्स अँड हेल्थने जमिनीवर पडलेले अन्न खावे की खाऊ नये या विषयाबाबत एक संशोधन केले आहे. हा अहवाल उपयोजित आणि पर्यावरणीय सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने केला. तो एएसएम जर्नल्समध्ये प्रकाशित झाला. या संशोधनानुसार, अन्न दूषित पृष्ठभागावर जितके जास्त काळ टिकून राहते, तितकेच ते खराब होण्यास वाव असतो. बॅक्टेरियाच्या आंतरसंक्रमणामुळे विविध प्रकारचे रोग होऊ शकतात. या रिसर्च मधून असे सिद्ध झाले आहे की, जमिनीवरच पडलेले अन्न दूषित असते असे नाही. तर याउलट किचनमधील ओट्यावर, जेवण बनवण्याच्या भांड्यांमध्ये बॅक्टेरिया असल्यास, अन्न नीट शिजले नाही किंवा आपले हात घाण झाले आहेत आणि त्याच घाण हातांनी आपण अन्नाला स्पर्श केला आहे यांसारख्या असंख्य कारणांनी अन्न दूषित होऊ शकते. 

साजूक तूप करण्यासाठी साय साठवण्याच्या ५ सोप्या टिप्स, तूप होईल शुभ्र- रवाळ...

अन्न जमिनीवर सांडल्यानंतर ३ ते ५ सेकंदाच्या आत पुन्हा उचलून खाणे योग्य की अयोग्य ? 

सामान्यतः असे म्हटले जाते की, एखादा पदार्थ खात असताना तो हातांतून खाली पडला तर तो ३ ते ५ सेकंदाच्या आत पुन्हा उचलून खाणे योग्य ठरते. परंतु केलेल्या रिसर्चनुसार हा एक चुकीचा समज आहे. कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ खाताना ते खाली सांडल्यानंतर अतिशय कमी वेळातच त्यावर वाईट बॅक्टेरिया चिटकण्याची शक्यता असते. आपले अन्न ज्या फरशीवर सांडले आहे ती फरशी अँटी-बॅक्टेरियल वाइपने किंवा फिनाईलने स्वच्छ केली असली तरीही त्या अन्नपदार्थांला बॅक्टेरिया चिकटण्याची शक्यता असतेच. त्यामुळे अन्न जमिनीवर सांडल्यानंतर ३ ते ५ सेकंदाच्या आत त्याला धूळ, माती चिकटून किंवा त्यावर बॅक्टेरिया चिकटून ते अन्न दूषित होऊ शकते, त्यामुळे असे खाल्ली पडलेले अन्नपदार्थ खाणे टाळणेच सर्वोत्तम पर्याय आहे. या अभ्यासांतून असाही एक निष्कर्ष समोर आला आहे की, ज्या ठिकाणी अन्न सांडते त्या ठिकाणी ओलावा असल्यास, अन्नपदार्थ आणखीनच लगेच दूषित होऊ शकतात. त्यामुळे ओल्या असलेल्या फरशीवरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे. 

पावसाळ्यात मीठ व साखरेला ओलसरपणा येऊन गुठळ्या तयार होतात ? ६ सोप्या घरगुती टिप्स...

सुके खोबरे खवट होते, काळे पडते ? २ उपाय, खोबरे टिकेल भरपूर...

१ सेकंदापेक्षा कमी वेळेत इन्फेक्शन

पदार्थांमधील ओलावा किंवा आर्द्रता देखील आपले अन्न किती लवकर दूषित होत आहे यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर आपण चिप्सचा काही भाग जमिनीवर टाकला तर तो दूषित होण्याची शक्यता कमी असते , परंतु जर टरबूज सारखे जास्त पाणी असलेले अन्नपदार्थ जमिनीवर पडले तर ते लगेच दूषित होतात. वर नमूद केलेल्या संशोधनानुसार, जेव्हा पृष्ठभागांचा विचार केला जातो तेव्हा कार्पेटवर कमी आर्द्रता असलेले अन्न पदार्थ सर्वात कमी प्रमाणात दूषित होतात, परंतु टाईल्स, स्टील, लाकूड, काँक्रीट इत्यादीवरील अन्नपदार्थ फार लवकर दूषित होऊ शकते. याशिवाय बॅक्टेरियाच्या प्रकाराचाही मोठा प्रभाव पडतो. अ‍ॅस्टन युनिव्हर्सिटीच्या प्रकाशित अहवालात हे मान्य करण्यात आले आहे की अन्न दूषित होण्यात आर्द्रतेचे प्रमाण मोठी भूमिका बजावते. परंतु सांडलेले अन्न उचलणे आणि ते असेच खाणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

टॅग्स :अन्नअन्नातून विषबाधा