Join us  

तिळगुळाचा भुगा शिल्लक राहीला, काय करायचे कळेना? ३ टिप्स, असा करा स्वयंपाकात स्मार्ट वापर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 12:06 PM

Makar Sankranti Left Over Tilgul Recipes Cooking Tips : उरलेल्या तिळगुळाच्या भुग्याचे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वड्यांचा उपयोग कसा करावा याविषयी...

ठळक मुद्देउरलेल्या तिळगुळाचे काय करायचे असा प्रश्न असेल तर करता येतील असे ३ सोपे पर्यायथंडीत शरीराला ऊर्जा देणारे तिळगूळ आवर्जून खायला हवेत...

मकर संक्रांतीला आपण आवर्जून तिळगूळ करतो. एकमेकांना हे तिळगूळ देऊन गोड बोलण्यासही सांगतो. बरेचदा हळदी-कुंकवाला गेल्यावर आपण प्रत्येक ठिकाणी मिळालेला तिळगूळ खातोच असे नाही. तसेच ऑफीसमध्ये किंवा बाहेरही बरेच जण आपल्याला तिळगूळ देतात. हे सगळे तिळगूळ वेगवेगळ्या प्रकारचे असतात. इतकेच नाही तर २ दिवसांत घरातील तिळगूळही वाटून संपतात आणि मग खाली त्याचा भुगा शिल्लक राहतो (Makar Sankranti Left Over Tilgul Recipes Cooking Tips). 

तिळगुळामध्ये तीळ, दाणे, गूळ हे पदार्थ असल्याने थंडीच्या दिवसांत हे सगळे आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. पण सतत गोड खाऊन कंटाळा येतो आणि नंतर त्याकडे कोणी पाहतही नाही. अशावेळी या उरलेल्या तिळगुळाच्या भुग्याचे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वड्यांचे आणि लाडूचे काय करायचे असा प्रश्न आपल्यासमोर पडतो. तर आज आपण असे ३ उपाय पाहणार आहोत ज्यामध्ये या तिळगूळाचा अतिशय छान असा वापर होईल आणि त्यामुळे हा भुगा किंवा तिळगूळ वायाही जाणार नाही. 

(Image : Google)

१. ठिसूळ वड्या असतील तर त्या मिक्सरमधून फिरवून घेऊन त्याची पावडर करावी. पोळ्या करताना त्यामध्ये ही पूड भरता येते. सकाळी नाश्त्याला गूळपोळीसारख्या या २ पोळ्या खाल्ल्या तर पोट भरते आणि हा तीळगूळही वाया जात नाही. वाटलं तर यामध्ये आणखी गूळ, ड्रायफ्रूट पावडर असे काही घालून शकतो. 

२. वड्या संपून खालचा भुगा शिल्लक असेल तर थोडं खोबरं आणि दाणे घालून तो मिक्सरमधून फिरवून ठेवावा. कोणत्याही भाजीला कूट किंवा वाटण घालतो त्याप्रमाणे याचा वापर करता येतो. फक्त यामध्ये गूळ असल्याने थोडी गोडसर चव येण्याची शक्यता असते. त्या अंदाजाने तिखट आणि मसाल्याचे प्रमाण वाढवता येते. मात्र तीळ, दाणे असल्याने कुटाप्रमाणे याचा वापर करता येतो. 

(Image : Google)

३. तिळगुळाचे लाडू किंवा वड्या पौष्टीक म्हणून आपण खातो मात्र नंतर त्याकडे कोणी पाहतही नाही. अशावेळी कढईत तूप घालून त्यामध्ये हा उरलेला तिळगूळ मिक्सर करुन घालावा. यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस, आपल्याला हव्या त्या ड्रायफ्रूटसची पूड, खसखस असे सगळे घातले तर याचे पौष्टीक लाडू तयार करुन ठेवता येऊ शकतात. मुलांना खाऊच्या डब्यात, मधल्या वेळात खाण्यासाठी हा उत्तम पर्याय होऊ शकतो.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती