Join us  

पावसात जास्तीच्या पाण्यामुळे कुंडीत फुलांची रोपं खराब होतात ? ५ सोपे उपाय, रोपं बहरेल फुलांनी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 9:00 AM

Gardening hacks to remove excess water from plants during monsoon season : पावसाळ्यात रोपांच्या कुंड्यात पाणी साचून राहू नये म्हणून काही सोप्या ट्रिक्सचा वापर करुयात.

पावसाळा सुरु झाल्यामुळे आपल्या बाल्कनीतील रोपांना पुरेसे पाणी मिळते. असे असले तरीही काहीवेळा जास्तच पाऊस पडल्यामुळे रोपांना अतिरिक्त पाणी मिळते. पावसात रोपांच्या कुंड्यात पाणी साचून राहते. हे पाणी असेच साचून राहिल्याने रोपांची मूळ खराब होऊन कुजू लागतात. रोपांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिल्याचा थेट परिणाम झाडांच्या मुळांवर होतो आणि त्यामुळे मुळ कमकुवत होतात(How to Take Care of Your Plants During Monsoons).

पावसाळ्यात जेव्हा भरपूर पाऊस पडतो तेव्हा कुंड्यांमध्ये पाणी साचून राहते. हे पाणी साचून राहिल्याने रोपांना गरजेपेक्षा जास्त पाणी मिळते. असे झाल्याने मूळ कुजून खराब होतात तर रोपांचे नुकसान होते. कोणत्याही रोपाच्या मुळांना इजा झाली तर असे रोपं फळा - फुलांनी बहरुन येत नाही. अशावेळी रोपांना गरजेपेक्षा जास्तीचे पाणी (Monsoon tips & hacks) मिळाले तर झाडाची पाने गळू लागतात, पानांचा रंग पिवळा पडू लागतो आणि हळूहळू झाड मरते. यासाठीच पावसाळ्यात रोपांच्या कुंड्यात पाणी साचून राहू नये म्हणून काही सोप्या ट्रिक्सचा वापर करुयात(How to protect your plants in the rainy season).

पावसाळ्यात रोपांच्या कुंड्यात पाणी साचून राहू नये म्हणून... 

१. जास्तीचे पाणी घालणे टाळावे :- जर तुमच्या झाडाला आधीच भरपूर पाणी मिळत असेल तर त्यात जास्त पाणी घालू नका. अनेकांना विचार न करता पाणी घालण्याची सवय असते, असे करू नका. जेव्हा माती कोरडी दिसते तेव्हाच पाणी देणे महत्वाचे असते. जर माती खूप ओली असेल तर झाडाची मुळे हवेच्या संपर्कात येऊ शकत नाहीत. यामुळे जर मुळांना योग्य प्रमाणांत हवा मिळाली नाही तर मूळ कुजून खराब होतात. फुलांच्या रोपांच्या मुळांना थोडी जास्त हवा लागते, आणि काहीवेळा माती खूपच ओली असल्यामुळे हवा मुळांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पावसाळ्यात गुलाबाच्या व जास्वंदीच्या रोपांना फुल येत नाही त्याचे हे मुख्य कारण आहे. 

२. स्पंजच्या मदतीने पाणी कमी करा :- जर जास्त पावसामुळे रोपांची माती खूप ओली झाली असेल तर तुम्ही मुळांजवळ स्पंज लावू शकता. स्पंज अतिरिक्त पाणी शोषून घेण्याचे काम करेल. पाऊस पडत असताना हे करू नका नाहीतर स्पंज पावसाचे पाणी शोषून घेईल आणि रोपाची माती अधिक ओलसर होईल. पाऊस थांबल्यानंतर रोपाच्या मुळांजवळ स्पंज लावा. जेव्हा स्पंज ओला वाटू लागतो तेव्हा तो बदला. 

३. रोपाला जास्त सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवा :- रोपाला जास्त हवा आणि सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. जास्त सूर्यप्रकाशामुळे झाडे अधिक वाढतात आणि त्यामुळे त्यांना जास्त पाणी लागते. अशा परिस्थितीत झाडे अतिरिक्त पाणी आपोआप पितात.

४. पाण्याचा निचरा करा :- कुंडीतील जास्तीचे पाणी निघून जाण्यासाठी कुंडीच्या खालील भागात आपण छिद्रे करतो. ही छिद्रे जरा जास्त करावीत यामुळे कुंडीतील जास्तीच्या पाण्याचा आपोआप निचरा होऊ शकेल. आपण कुंडीच्या तळाशी एक किंवा दोन जास्तीची छिद्रे बनवू शकता, जेणेकरून मुळांना हवा लागू शकले. बऱ्याचवेळा ड्रेनेजचे छिद्र मातीने इतके झाकले जाते की त्यामुळे रोपाची कुंडी सतत जास्त पाण्याने भरलेली राहते, यामुळे समस्या वाढतच जाते.अशा परिस्थितीत रोपाला हवा देण्यासाठी अतिरिक्त छिद्रे पाडावीत, पण कुंडी फुटणार नाही याची काळजी घ्यावी. 

५. माती मोकळी करावी :- पावसाच्या पाण्यामुळे कुंडीतल्या मातीचा गोळा तयार होतो. असे झाल्याने मातीच्या मुळांना मोकळी हवा लागत नाही. त्यामुळे अशावेळी  कुंडीतील वरवरची माती खणून मोकळी करावी. माती मोकळी केल्याने रोपांच्या मुळांना पुरेशी मोकळी हवा लागते. यामुळे रोपांची मुळे न कुजता  रोपं चांगली राहतात.

टॅग्स :बागकाम टिप्समानसून स्पेशल