Join us   

उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या ३ चुका महागात पडतात! बघा, तुमच्याकडूनही नकळत तेच चुकतंय का..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 4:52 PM

3 Mistakes to Avoid In Summer Season : योग अभ्यासक काम्या ३ महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात, त्या कोणत्या पाहूया...

ऋतू बदलला की आपण आपल्या दिनचर्येत बदल करतो. आहार-विहारातही नकळत बरेच बदल केले जातात. प्रत्येक ऋतूमध्ये आपण त्या ऋतुला साजेसा असा आहार घेतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आपण शरीरात जास्तीत जास्त पाणी राहील यासाठी द्रव पदार्थांचा आहारात समावेश करतो. त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण व्हावे यासाठी काळजी घेणे आवश्यक असते. योग्य पद्धतीने काळजी घेतली तर उन्हाळ्यात आपल्याला आरोग्याचे त्रास उद्भवत नाहीत (3 Mistakes to Avoid In Summer Season). 

मात्र योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर मात्र उन्हाळी लागणे, लघवीला त्रास होणे, उष्णतेचे अंगावर पुरळ येणे, ताप येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. इतकेच नाही तर उन्हाने त्वचा काळवंडणे, रॅश येणे, फोड किंवा घामोळी येणे यांसारखे त्रासही होतात. अशा समस्या उद्भवू नयेत म्हणून रोजच्या सवयींपैकी काही सवयी उन्हाळ्यात आवर्जून बदलायला हव्यात. या सवयी कोणत्या आणि त्या बदलल्याने शरीरात नेमके काय बदल होतील याविषयी योग अभ्यासक काम्या ३ महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात, त्या कोणत्या पाहूया...

१. सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे 

आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी घ्यायची सवय असते. मात्र रिकाम्या पोटी चहा घेतल्यास पचनसंस्थेमध्ये गॅसेस होण्याची शक्यता असते. कॅफिनमुळे पोटात ऍसिडचे उत्पादन होते, ज्यामुळे अपचन, छातीत जळजळ आणि इतर पाचन समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी चहा घेतल्यास कॉर्टिसॉलसारख्या तणाव संप्रेरकांच्या उत्पादनास देखील चालना मिळते आणि यामुळे चिंता आणि चिडचिडेपणाची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे किमान उन्हाळ्यात रिकाम्या पोटी चहा घेणे टाळावे. 

२. फ्रिजमधले पाणी पिणे 

उन्हाळ्याच्या दिवसांत उकडत असल्याने आपल्याला गार काहीतरी खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. नेहमीचे पाणी पिऊन आपली तहान भागत नाही. अशावेळी आपण फ्रिजमध्ये बाटल्या ठेवतो आणि तहान लागली की त्या काढून पाणी पितो. पण असे थंडगार पाणी प्यायल्याने पचनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. थंड पदार्थांमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि पचनक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. थंड पाण्यामुळे अन्नपदार्थातील पोषकद्रव्ये शोषून घेण्याची नैसर्गिक क्रिया मंदावते. त्यामुळे फ्रिजमधले पाणी न पिता माठातले पाणी प्यायला हवे. 

३. आंबे पाण्यात न भिजवता खाणे

उन्हाळ्याच्या दिवसांत आपण सगळेच आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. वर्षातून एकदाच मिळणारा आंबा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. मात्र आंबा खाताना तो न विसरता पाण्यात भिजवायला हवा. आंब्यामध्ये फायटिक ऍसिड असते जे शरीरात उष्णता निर्माण करते, त्यामुळे आंबे भिजवल्याने अतिरिक्त ऍसिड काढून टाकण्यास मदत होते. यामुळे आंब्यातील उष्णता कमी होते आणि ते खाण्याचा आपल्याला त्रास होत नाही. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलसमर स्पेशल