दररोज पोळी भाजी, भात-वरण, भाकरी हे खाऊन कंटाळा आला की आपल्याला वेगळं आणि चमचमीत काहीतरी हवं असतं. यातही कमी वेळात आणि झटपट होणारे असे प्रकार घरोघरी जास्त प्रमाणात केले जातात. पाव हा त्यामध्ये वापरण्यात येणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. कंटाळा आला किंवा कोणी पाहुणे येणार असतील की आपण पाव भाजी, मिसळ पावचा बेत करतो. बाहेरही या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. इतकेच नाही तर कच्ची दाबेली, सँडविच, शेव पाव, मसाला पाव, वडापाव, भजी पाव किंवा अगदी सामोसा पावही आवडीने खाल्ला जातो. मात्र या पावाचे शरीरावर विपरीत परीणाम होतात, ते कोणते पाहूया (5 Disadvantages of Having Pav or Bread)...
१. शुगर वाढते
पावामध्ये असणारी रिफाईन्ड साखर आपल्या मॅटॅबॉलिझमच्या कार्यावर परीणाम करते. तसेच स्वादुपिंडातून जास्त प्रमाणात इन्शुलिन शोषले जाते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण एकाएकी वाढते.
२. गॅसेसची समस्या
वडापाव, कच्ची दाबेली यांसारख्या पदार्थांमध्ये लॅक्टोजचे प्रमाण जास्त असते. लॅक्टोजमुळे ब्लोटींग तसेच गॅसेसच्या समस्येत वाढ होते. तसेच यामध्ये असणारे ग्लुटेन पचायला जड असल्याने पाव खाल्ल्यावर गॅसेसच्या समस्या उद्भवतात. काही वेळा पाव पचायला २ ते ३ दिवस लागतात.
३. वजन वाढते
पावात साखर किंवा फ्रुक्टोज कॉर्न सिरप असते. यामुळे कॅलरीज वाढण्याचा धोका असतो. तसेच वडा, सामोसा या पदार्थांमध्येही कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच पावाशी संबंधित पदार्थ खाल्ल्याने आपले वजन झपाट्याने वाढते.
४. पोषणद्रव्यांचा अभाव
पाव हा मैद्यापासून तयार केलेला असतो. त्यामुळे त्यातून शरीराचे पोषण होण्याची शक्यता खूपच कमी असते. शरीराला आवश्यक असणारे फायबर, व्हिटॅमिन कींवा खनिजे असे कोणतेच घटक पावातून मिळत नाहीत.
५. अॅलर्जिक रिअॅक्शन
पाव तयार करताना त्यामध्ये काही एन्झाइम्स घातले जातात. त्यामुळे पाव दिर्घ काळ टिकण्यास मदत होते. तसेच पाव मऊ राहण्यासही या पदार्थांचा उपयोग केला जातो. मात्र या घटकांमुळे आपल्याला विविध प्रकारच्या अॅलर्जी होण्याची शक्यता असते.