Join us   

जेवल्यानंतर कराव्या अशा ५ गोष्टी, ही पंचसूत्री पाळा - ५ मिनिटे रोज आणि पचनाच्या तक्रारी कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 7:13 PM

5 Things To Do After Eating Your Meals To Boost Digestion, Metabolism & Absorption Of Nutrients : आपली पचन क्रिया चांगली रहाण्यासाठी जेवणानंतर काय करायला हवं हे समजून घेणं आवश्यक आहे.

प्रत्येक व्यक्तीचं त्याच्या कामाप्रमाणे, सवयींप्रमाणे, वेळेप्रमाणे रोजचं जीवन आणि वेळापत्रक अवलंबून असतं. कामाच्या आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात जेवणाच्या वेळांमध्ये सहाजिकच बदल होतात. काहीवेळेला आपण कामाच्या गडबडीत जेवणाच्या वेळा नीट पाळत नाही, उशिरा जेवतो. तसेच काहीवेळा काही लोक आवडीचे पदार्थ मिळाल्यास गरजेपेक्षा जास्त जेवतात. त्यामुळे नंतर त्यांना पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. जेवणाच्या वेळा नीट न पाळल्यामुळे किंवा उशिरा जेवल्यामुळे आपल्या अन्नपचनात अडथळा निर्माण होतो.  

निरोगी आयुष्यासाठी आपण सर्वच आहाराकडे बारकाईने लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. अन्न पचणं हे पूर्णपणे आपल्या इतर सवयींवर अवलंबून असते.आपली जीवनशैली, कामाची पध्दत आणि पचन यांचा जवळचा संबंध असतो. यात जर दोष असले तर परिणाम पचनावरच होतो. पचन नीट झालं नाही तर त्याचा दिवसभराच्या कामावर परिणाम होतो. आपली पचन क्रिया चांगली रहाण्यासाठी जेवणानंतर काय करायला हवं हे समजून घेणं आवश्यक आहे. खूप सोप्या गोष्टी आहेत. पण त्या माहिती आहेत म्हणून किंवा वेळच नाहीये म्हणून केल्या जात नाही(5 Things To Do After Eating Your Meals To Boost Digestion, Metabolism & Absorption Of Nutrients).

जेवणानंतर नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात? 

१. जेवल्यानंतर बडीशेप नक्की खावी. 

जेवल्यानंतर लगेच बडिशेप खावी. यामुळे तोंडास सुखद आणि ताजातवाना गंध येतो. बडिशेप ही पचनासाठी अतिशय उपयुक्त असते. बडिशेप चावून खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. विषारी घटक बाहेर पडल्याने पचनक्रियाही सुधारते. अनेकांना जेवणात तिखट पदार्थ खाल्ल्याने जेवण झाल्यावर मळमळ आणि करपट ढेकर येण्याचा त्रास होतो. काहींना अजीर्ण झाल्यासारखे देखील होते. अशावेळी बडीशेप खाल्ल्यास हा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे नियमीतपणे जेवण झाल्यावर थोडी बडीशेप खायलाच हवी.

२. जेवल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे चालण्याची क्रिया करावी. 

चालणे ही आरोग्यदायी क्रिया आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळेला चाललं तर त्याचे आरोग्यास लाभच होतात. जेवणानंतर चालायाला गेल्यानं त्याचा परिणाम पचन सुलभ होण्यावर होतो. जेवल्यानंतर लगेच व्यायाम करु नये हा नियम आहे. पण खूप जोरात आणि खूप ह्ळू न चालता एका सामान्य वेगानं चालण्यानं जेवण लवकर पचतं. जेवणानंतर अनेकांना अस्वस्थ होतं. बसणंही अवघड होतं. जेवल्यानंतर लगेच नाही परंतु किमान अर्ध्या तासानंतर १५ ते २० मिनिटं चालल्याने पचनासंबंधीचे विकार दूर होतात. आयुर्वेदानुसार, जेवणानंतर शतपावली म्हणजेच किमान १०० पावले तरी चाललेच पाहिजे. चालण्यामुळे शरीराला अनेक फायदे होऊन जेवण लगेच पचण्यास मदत होते. म्हणून जेवल्यानंतर थोडावेळ तरी चालावे.       

३. जेवल्यानंतर प्रोबायोटिक पदार्थांचे म्हणजेच ताकासारख्या पदार्थांचे सेवन करणे.

जेवल्यानंतर ताक प्यायल्याने त्याचे अनेक चांगले फायदे आपल्या शरीराला मिळतात. जेवल्यानंतर ताकाच्या सेवनामुळे पचनाशी संबंधित सर्व प्रकारचे विकार दूर होण्यास आणि पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. जेवणांनंतर ताक प्यायल्याने अपचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ज्या लोकांचे पोट स्वच्छ होत नाही किंवा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा लोकांनी नियमित स्वरुपात ताकाचे सेवन करावे. दही व ताक हे शरीराला प्रोबायोटिक मिळवून देणारे उत्तम स्रोत आहेत. अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत दही किंवा ताक वाढण्याची पद्धत आहे. आयुर्वेदात ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं. कारण ताकामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. बऱ्याचदा बाहेरचे पदार्थ खाण्यामुळे किंवा अती प्रमाणात तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे आपल्याला अ‍ॅसिडिटीचा त्रास जाणवतो. ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात. पोटासंबंधित अशा समस्या उद्भवू नये म्हणून जेवणानंतर ताक प्यावे. 

जेवणानंतर ताक पिण्याचे ५ फायदे! छान-गोडसर चवीचं ताक प्या आणि तब्येतीच्या अनेक तक्रारी टाळा...

४. जेवण जेवल्यानंतर थोड्या वेळासाठी आरामात बसा. 

जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आरामात बसा. जेवण झाल्यानंतर लगेचच कोणत्याही प्रकारचे काम न करता थोडा वेळ रिलॅक्स बसा. जेवण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम किंवा हेवी अ‍ॅक्टिव्हिटी करणे टाळावे. जेवणानंतर थोडा वेळ आरामात एका जागी बसावे. असे केल्याने जेवण चांगल्या प्रकारे पचण्यास मदत होते.  

५. जेवल्यानंतर हर्बल टी चे सेवन करावे हर्बल टी प्यायल्यामुळे अन्न पचनास मदत होते. 

हर्बल टी अतिशय स्वादिष्ट आणि औषधी गुणांनी उपयुक्त असल्याचं म्हटलं जातं. यामधून मिळणारी पोषक तत्व ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. निरोगी राहण्यासाठी पचनसंस्था सुदृढ असणे आवश्यक असते. आजकाल लोक त्यांच्या आहारात तेलकट आणि जंक फूडचा अधिक समावेश करतात, ज्यामुळे पचनाशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात. योग्य आहार न घेतल्याने आपल्या पोटात जंतू आणि वाईट बॅक्टेरिया तयार होतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता, जुलाब आणि पोटदुखीसारख्या समस्या निर्माण होतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या आहारात काही बदल करुन हर्बल टी चे सेवन करु शकता. अन्न पचनासाठी फायदेशीर ठरू शकते कारण त्यात अनेक पोषक घटक असतात. हर्बल टी चे सेवन हे केवळ पचनासाठीच नाही तर शरीराच्या इतर भागांसाठी देखील फायदेशीर ठरु शकते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य