आंघोळ करणे हा आपल्या दैनंदिन गोष्टींमधील एक अतिशय महत्त्वाचे काम असते. सकाळी उठल्यावर आपण आधी ब्रश करतो मग पाणी पिऊन चहा किंवा कॉफी घेतो आणि मग पारोशी कामं आवरुन आंघोळीला जातो. आंघोळ झाल्यावर आणि धुतलेले कपडे घातल्यावर आपल्याला एकदम फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. काही जण अगदी कावळ्यासारखी झटपट आंघोळ करतात तर काही जण बराच वेळ निवांत आंघोळ करतात. स्वच्छतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली आंघोळ दिवसातून २ वेळा किंवा एकदा नक्कीच केली जाते (Benefits of Salt Water bath).
आंघोळीसाठी आपल्याला साधारणपणे कोमट पाणी लागते. पण आंघोळीच्या या पाण्यात आपण काही जण युडी कलोन घालतात तर काही जण पाण्याला आणि अंगाला चांगला वास यावा यासाठी आणखी काही घालतात. मात्र आज आपण आंघोळीच्या पाण्यात मीठ घातल्याने त्याचे शरीराला होणारे फायदे कोणते असतात ते पाहणार आहोत. डॉ. दीपिका राणा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून हे फायदे आपल्याला सांगितले आहेत. हे मीठ नेहमीचे पांढरे, सैंधव किंवा खडे मीठ असेल तरी चालते. त्याचा काय आणि कसा फायदा होतो ते पाहूया...
१. केसांत खूप जास्त प्रमाणात कोंडा झाला असेल किंवा खूप जास्त खाज येत असेल तर अशावेळी मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास फायदा होतो. आठवड्यातून २ वेळा केसांवरुन मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास ही खाज आणि कोंडा कमी होण्यास मदत होते.
२. प्रमाणापेक्षा जास्त ताण असेल आणि सारखं काही ना काही कारणामुळे बेचैन वाटत असेल तर आठवड्यातून २ वेळा मीठाच्या पाण्याने आंघोळ करणे गरजेचे आहे. त्यामुळे ताण कमी होण्यास निश्चितच मदत होईल.
३. त्वचेवर कोणत्या प्रकारची अॅलर्जी किंवा इन्फेक्शन असेल तर तर मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास फायदा होतो. मीठामध्ये अँटीमायक्रोबियल, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. त्यामुळे ही अॅलर्जी निघून जाण्यास मदत होते.
४. जॉईंट पेन किंवा एखाद्या ठिकाणी सूज आल्याची समस्या असेल तर अशावेळी मीठाच्या पाण्याने जरुर आंघोळ करावी. आठवड्यातून २ वेळा मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास ही सूज आणि दुखणे कमी होण्यास मदत होते.