Join us   

दिवाळीत खादाडी तर होणारच; पोटाला त्रास होऊ नये म्हणून तज्ज्ञ सांगतात ५ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 4:37 PM

Diet Tips For Diwali Celebration by Dietician : फराळाच्या पदार्थाचे फायदे असले तरी आपली आत्ताची बदलेली जीवनशैली लक्षात घेता या काळात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

ठळक मुद्दे दिवाळीच्या सणाचा आनंद घेताना आहाराबाबत थोडी स्वयंशिस्त पाळली तर दिवाळी आणखी आनंददायी होईल. स्नायू, अवयव, हाडे दिर्घकाळ बळकट राहावीत असे वाटत असेल तर व्यायाम करणे अतशिय आवश्यक असते

सुचेता लिमये

भारतीय परंपरेतील एक महत्वाचा सण म्हणजे दिवाळी या सणाच्या खाद्यसंस्कृतीची परंपरागत सांगड ही ऋतूमानाबरोबर आणि त्यानुसार होणा-या शारिरीक आणि मानसिक बदलाबरोबर घातलेली आहे. तसेच याचा संबंध हा आपल्या सामाजिक बांधीलकीबरोबर जोडला गेला आहे. दिवाळीमध्ये थंडीची चाहूल लागते. कमी तापमानामुळे चयापचयाचा वेग भूक देखील वाढवतो. या थंड हवामानात शरीराचे तापमान संतुलीत ठेवण्यासाठी, ऊर्जा मिळण्यासाठी आपल्याला नेहमीपेक्षा जास्त आणि वेगळ्या प्रकारच्या आहाराची आवश्यकता असते. ही सर्व ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आणि थंडीसाठी चरबी साठवून ठेवण्यासाठी लाडू, करंज्या व इतर गोड पदार्थ व तळलेले पदार्थ शेव चकली इत्यादी पदार्थ दिवाळीत केले जातात (Diet Tips For Diwali Celebration by Dietician). 

हे पदार्थ जशी ऊर्जेची गरज भागवतात तसेच यात वापर केली जाणारी डाळी, कडधान्ये आपल्या शरीराला प्रथिने पुरवून पोषित करतात. या काळात होणारा सुकामेव्याचा वापर आपल्याला लागणा-या विविध स्निग्ध पदार्थांची गरज भागवत असतो. जसे बदाम, आक्रोड यामध्ये ओमेगा ३ प्रकारची स्निग्धाम्ले जास्त प्रमाणात आहेत. तसेच करंजीमध्ये, लाडूमध्ये वापरला जाणारा नारळ आपली MCT Oil ची गरज भागवतो जी आपल्या मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. हे सर्व या पदार्थाचे फायदे जरी असले तरी आपली आत्ताची बदलेली जीवनशैली लक्षात घेता या काळात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्या कोणत्या ते पाहूया...

1. अनियंत्रित मधुमेह असणा-यांनी गोड खाणे टाळावे. एखादवेळी गोड खाल्ले तरी ते योग्य त्या प्रमाणातच खावे. एकदा गोड खाल्ल्यानंतर त्या दिवसभरात पुन्हा गोड खाऊ नये. 

2. या काळात आपले एकमेकांकडे जाणे होते, तसेच बाहेरही खाणे होते. त्यामुळे आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. दिवसभरात एकदा (एक जेवण) मीत आहार करावा.

3. गोड पदार्थ करताना शक्य असल्यास साखरेऐवजी खारीक पुड, खजूर किंवा सुके अंजीर, गूळ या पदार्थांचा वापर करावा. ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या समस्या असणाऱ्यांना जास्त त्रास होणार नाही. 

4. थंडीच्या दिवसात तहान कमी लागते. त्यामुळे आपल्याकडून नकळत पाणी कमी प्यायले जाते. मात्र पाणी कमी प्यायल्याने बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे या काळात आठवणीने १०-१२ ग्लास पाणी जरूर प्यावे. शर्करायुक्त पेयांचे सेवन शक्यतो टाळावे.

5. या सर्वांबरोबर नियमित व्यायाम हा उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो हे लक्षात घ्यायला हवे. व्यायामाला कोणताही पर्याय असू शकत नाही. स्नायू, अवयव, हाडे दिर्घकाळ बळकट राहावीत असे वाटत असेल तर व्यायाम करणे अतशिय आवश्यक असते हे लक्षात घ्यायला हवे. 

दिवाळीच्या सणाचा आनंद घेताना आहाराबाबत थोडी स्वयंशिस्त पाळली तर आपली दिवाळी अजून आनंददायी व सुखकारक होईल याची खात्री असावी. अशी ही दिवाळी सर्वांना आरोग्यदायी होवो. 

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत)

टॅग्स : आरोग्यलाइफस्टाइलहेल्थ टिप्सआहार योजनादिवाळी 2022