Join us   

पावसाळ्यात गॅसेसचा त्रास छळतो, अपचन होते? आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात ६ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2022 1:06 PM

Reason behind Gases And Indigestion in Rainy Season Remedies : बदलत्या हवामनात वात त्रास देत असेल तर काय करावे याविषयी सांगत आहेत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. लीना बावडेकर

ठळक मुद्दे संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान खावे. यामुळे अन्न पचनाला पुरेसा कालावधी मिळतो आणि पोटाच्या तक्रारी दूर राहतात. तुपामुळे पदार्थ पचायला सोपे होत असल्याने फुलका, भात, थालिपीठ यांसारख्या पदार्थांवर आवर्जून तूप घालावे. 

उन्हाळा संपून पावसाळा येतो त्यावेळी हवेतील बदलामुळे साधारणपणे वाताचे विकार डोकं वर काढतात. गरमीने हैराण झालेले आपण पावसाचा जरा कुठे आनंद घेत नाही, तर अपचन, गॅसेस, अॅसिडीटी यांसारख्या तक्रारी सुरू होतात. घरोघरी पचनाच्या किंवा वाताच्या समस्यांनी त्रस्त असलेले लोक पाहायला मिळतात. हा वात बाहेर पडला तर ठिक, पण तो शरीरात साचून राहीला तर त्याचा जास्त त्रास होतो. कधी ढेकरांच्या माध्यमातून तर कधी मागील मार्गाने हा गॅस बाहेर पडतो तर काही वेळा पोटात, छातीत वात फिरल्याने आपल्याला असह्य होते. आता अशाप्रकारे वात त्रास देत असेल तर काय करावे याविषयी सांगत आहेत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. लीना बावडेकर (Reason behind Gases And Indigestion in Rainy Season Remedies)...

हवाबदलामुळे नेमके काय घडते?

उन्हाळ्याच्या दिवसांत वाढलेला वात पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारणपणे वाढतो. या काळात साधारणपणे हा वात आपले परिणाम दाखवायला सुरुवात करतो. पावसाळा सुरू होतो तसा पोटातला अग्नी मंद झालेला असतो. मात्र इतके दिवस उन्हाळ्यात म्हणावे तसे खावेसे वाटत नाही, पण पावसाळी हवेमुळे आपल्याला चमचमीत खावसं वाटतं. पण पावसाळी हवेत अग्नीची क्षमता मंद असल्याने अरबट-चरबट खाल्ल्यास त्याचा पचनशक्तीवर ताण येतो आणि पचनाच्या तक्रारी सुरू होतात. 

या काळात सगळ्यात महत्त्वाचे काय लक्षात घ्यावे? 

आपल्या पोटात किती जागा आहे, आपल्याला किती भूक आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यानुसारच अन्न शरीरात घ्यायला हवे. जीभेला चांगले लागते म्हणून, खायची इच्छा होते म्हणून चटपटीत पदार्थ किंवा कोणतेही पदार्थ खात राहीलो तर ते पचत नाहीत आणि त्याचे रुपांतर म्हणजे पचनाशी निगडीत तक्रारी सुरू होतात. तसेच दोन खाण्यांमध्ये किती अंतर आहे, आपण खात असलेले अन्न पचायला जड नाही ना या गोष्टींचा योग्य पद्धतीने विचार करण्याची आवश्यकता असते. पोटात अन्न साचून राहिल्यास आळस येणे, झोपून राहावसं वाटणं, पोट जड झाल्यासारखे किंवा फुगल्यासारखे वाटणे अशा समस्या निर्माण होतात. 

उपाय काय? 

१. पोटाला आराम देणे गरजेचे असल्याने आपल्या परंपरेनुसार या काळात उपवास करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंद झालेल्या अग्नीवर ताण न येता पचनशक्ती आणि पर्यायाने आपली तब्येत चांगली राहते. 

२. या दिवसांत भाजलेला, हलका आहार घेणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे पोट हलके राहते आणि पचनाच्या किंवा गॅसेस, अॅसिडीटी अशा तक्रारींपासून आपण दूर राहू शकतो. वाताला पोटात पुरेशी जागा असेल तर हा वात आपल्याला त्रासदायक ठरत नाही. 

(Image : Google)

३. आपण जे अन्नपदार्थ खातो ते गरम, ताजे खायला हवे. तसेच जुने धान्य वापरणे जास्त चांगले, ते पचायला हलके असते. भात करातना तांदूळ भाजून घेणे, डाळी भाजून घेणे यांमुळे ते पदार्थ पचायला हलके होतात. कुकरमध्ये खूप शिट्ट्या घेऊन शिजवण्यापेक्षा मोकळा भात शिजवल्यास तो पचायला हलका होतो.

४.  पावसाळ्याच्या काळात कोणताही पदार्थ खाताना त्यावर शक्यतो तूप घालावे. म्हणजे हे पदार्थ स्नेहयुक्त होऊन शरीरातील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. कोरडेपणा दूर झाल्यास वाताचे विकार कमी होण्यास मदत होते. तसेच तुपामुळे पदार्थ पचायला सोपे होत असल्याने फुलका, भात, थालिपीठ यांसारख्या पदार्थांवर आवर्जून तूप घालावे. 

५. जास्त प्रमाणात गॅसेस होत असतील तर जेवणाच्या आधी कोमट पाण्यातून तूप घेणे, पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणाआधी आल्याचा रस मधातून किंवा सैंधव मीठातून घेतल्यास त्याचाही वात किंवा गॅसेस कमी होण्यास फायदा होतो. 

६. रात्री उशीरा जेवण करणे टाळावे, त्याऐवजी संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान खावे. यामुळे अन्न पचनाला पुरेसा कालावधी मिळतो आणि पोटाच्या तक्रारी दूर राहतात. जेवणानंतर हालचाली झाल्यामुळे अन्नपचन क्रिया सुलभ होते. त्यामुळे लवकर जेवणे केव्हाही फायद्याचेच ठरते.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समानसून स्पेशलआहार योजना