Join us   

डॉक्टर सांगतात केकेही घेत होता ऍसिडिटीच्या गोळ्या; ऍसिडिटी म्हणत त्रासाकडे दुर्लक्ष धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2022 4:31 PM

पित्त होतं म्हणून सारख्या गोळ्या घेऊ नका, अशाप्रकारे गोळ्या घेणे बेतू शकते जीवावर

ठळक मुद्दे या गोळ्या सतत घेतल्याने त्याचे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात हे अनेकांना माहितही नसते. सततची जागरणे, जंक फूडचे सेवन, व्यसनाधिनता, वाढते ताणतणाव यांसारख्या कारणांनी होणारे पित्त दिवसेंदिवस वाढत जाते.

आपल्या सुरेल आवाजाने अनेक वर्षे तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा प्रसिद्ध गायक केकेची एक्झिट मनाला चटका लावणारी होती. एका कॉन्सर्टमध्ये गाता गाता अचानक त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अवघ्या ५३ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. यामुळे कमी वयात होणाऱ्या हृदयरोगाच्या समस्येवर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र केकेच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार केके मोठ्या प्रमाणात पित्तशामक गोळ्या घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हृदयरोगासाठी अशाप्रकारच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेणे हेही एक कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(Image : Google)

हार्ट ॲटॅक हा केवळ ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, ताणतणाव, व्यसने यांमुळेच होतो असे आपल्याला वाटते. पण हार्ट ॲटॅक येण्यासाठी पचनाशी निगडीत तक्रारी हेही एक महत्त्वाचे कारण असल्याचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुभेंदू मोहंती यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. अनेकदा ॲसिडीटी आणि हार्ट ॲटॅकची लक्षणे सारखी असण्याची शक्यता असते. मात्र छातीत दुखणे आणि जळजळल्यासारखे होणे हे हार्ट ॲटॅकचे लक्षण असू शकते. सततची जागरणे, जंक फूडचे सेवन, व्यसनाधिनता, वाढते ताणतणाव यांसारख्या कारणांनी होणारे पित्त दिवसेंदिवस वाढत जाते. मग मळमळ, उलट्या, पोटात आग पडल्यासारखे वाटणे, छातीत होणारी जळजळ, गॅसेस यांमुळे जीव हैराण होऊन जातो. रोजची कामं तर केल्यावाचून पर्याय नसतो आणि एकीकडे पित्त काही कमी व्हायचे नाव घेत नसते. अशावेळी वारंवार या गोळ्या घेतल्याही जातात. आपणही अनेकदा पित्त झाले की वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या मेडिकलमधून आणतो आणि घेतो. मात्र त्याचा शरीरावर दूरगामी परीणाम होतो हे आपण लक्षात घेत नाही. 

(Image : Google)

पित्ताच्या गोळ्या महिन्या दोन महिन्यातून ५ ते ७ दिवसांपर्यंत घेतल्या तर ठिक आहे. पण ६ आठवड्यांहून अधिक काळ या गोळ्या घेत राहील्यास त्याचा किडनी घातक परिणाम होतो, याबरोबरच या औषधांचा मेंदू, हृदय यांच्यावरही याचा परिणाम होतो. शरीरातील रासायनिक घटक किडनी आणि यकृत या अवयवांमधून बाहेर पडतात. पण या घटकांचे प्रमाण जास्त झाले तर ते संबंधित अवयवाला बाधक ठरु शकतात. तसेच औषधांमधील हे घटक रक्तात साचत जातात. शरीर हे घटक शरीराबाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. पण पुरेशा प्रमाणात ते बाहेर टाकले गेले नाहीत तर त्याचा अवयवावर परिणाम होतो. असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोगकेके कृष्णकुमार कुन्नथ