Join us   

महागडी फळं विकत आणता पण; फळं खाताना होणाऱ्या ४ चुका तब्येत कायमची बिघडवतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 2:01 PM

Follow 4 Rules While Eating Fruits : ऋतूनुसार फळं खाण्याचं प्रमाण, पद्धत बदलायला हवी का याविषयी समजून घेऊया...

फळं आरोग्याासाठी अतिशय चांगली असतात त्यामुळे दिवसभराच्या आहारात फळांचा आवर्जून समावेश असायला हवा असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. त्यामुळेच आपण आहारात विविध चवीच्या, रंगांच्या फळांचा समावेश करतो. फळांमध्ये असणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने त्यांचा आहारात समावेश करायला हवा. दिवसातून किमान २ फळं आवर्जून खायला हवीत असं म्हटलं जातं. मग ही फळं कशी खावीत इथपासून ते कोणत्या वेळेला, कशासोबत खावीत याबाबतचे काही ना काही नियम सांगितले जातात (Follow 4 Rules While Eating Fruits).

मात्र आपण त्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही तर फळांतून पुरेपूर पोषण मिळत नाही. इतकेच नाही तर नियमाच्या विरुद्ध फळं खाल्ल्यास त्यामुळे आरोग्याला त्रास होण्याचीही शक्यता असते. आता फळं खाताना नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी माहिती घेणे आवश्यक आहे. विशिष्ट सिझनमध्ये बाजारात येणारी आणि स्थानिक ठिकाणी पिकणारी फळं तर आवर्जून खायला हवीत. ऋतूनुसार फळं खाण्याचं प्रमाण, पद्धत बदलायला हवी का याविषयी समजून घेऊया...

(Image : Google)

१. फळांचा ज्यूस करु नका

अनेकदा लहान मुलांना, ज्येष्ठ व्यक्तींना किंवा एरवीही फळांचा ज्यूस घेण्याला पसंती दिली जाते. मात्र ज्यूस काढल्याने फळं त्याच्या नैसर्गिक अवस्थेत राहत नाही. त्यामुळे शक्यतो फळ चावून मूळ स्वरुपात खाल्ल्यानंतर त्यातून जास्त प्रमाणात पोषण मिळते. ज्यूस केल्यानंतर त्यामध्ये साखर किंवा अन्य स्विटनर्स घातले जातात. जे आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. म्हणूनच फळांचा ज्यूस न करता ती मूळ स्वरुपातच खाल्लेली केव्हाही चांगली. ज्यूस केल्यावर साखरेची पातळी वाढते आणि फळातील फायबरचे प्रमाण कमी होते. 

२. फळं एकत्र करु नका

काहीवेळा फ्रूट कस्टर्ड किंवा फ्रूट सॅलेड करण्यासाठी आपण २ वेगळ्या स्वरुपाची फळं एकत्र करतो. मात्र प्रत्येक फळात पचन होण्यासाठी आवश्यक असणारी एन्झाइम्स वेगळी असतात. म्हणूनच २ फळं एकत्र केल्यास ती नीट पचत नाहीत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फळं कोणत्याही कारणाने एकत्र करु नयेत. एकावेळी एकच फळ खावे. 

३. मीठ किंवा चाट मसाला घालू नका

बाहेर ज्या फ्रूट डिश मिळतात त्यावर फळांना चव यावी किंवा ती चटपटीत लागावीकत यासाठी त्यावर आवर्जून चाट मसाला किंवा मीठ टाकले जाते. मात्र यामुळे फळाची मूळ चव हरवते. फळं मूळातच गोड, आंबट, तुरट अशा विविध चवी घेऊन आलेली असतात. या नैसर्गिक चवी घेणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. मीठ आणि चाट मसाल्याने या मूळ चवी मरण्याची शक्यता असते. त्यामुळे फळं ही कापल्यावर किंवा फोडी केल्यावर आहेत तशीच खायला हवीत. 

४. सूर्यास्तानंतर फळं खाऊ नयेत

फळं खाण्याची सगळ्यात चांगली वेळ ही सकाळी झोपेतून उठल्यावर असते. पण या वेळात अनेकांना चहा घेण्याची सवय असल्याने फळ खाल्ले जात नाही. साधारणपणे सकाळी ११ वाजता आणि संध्याकाळी ४ वाजता फळ खाण्याची योग्य वेळ असते. सूर्यास्तानंतर पचनशक्ती क्षीण झालेली असते, त्यामुळे त्यावेळी फळं खाणं आरोग्यासाठी योग्य नाही. फळांमध्ये साखर जास्त प्रमाणात असल्याने आणि रात्री अशी साखर खाणे योग्य नसल्याने फळं रात्रीच्या वेळी खाणं योग्य नाही. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफळेआहार योजना