Join us   

पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य? फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या केल्यानं तब्येत बिघडते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 2:10 PM

Harmful Effects of Refrigerated Dough अनेकजणी कणिक भिजून फ्रिजमध्ये ठेवतात, ते तब्येतीसाठी चांगले की वाईट?

स्वयंपाक आणि ऑफिसची घाई यामुळे अनेकजणी सकाळी चपातीचे पीठ मळून हवाबंद डब्यात झाकून ठेवतात. पीठ तयार असेल तर, झटपट चपात्या करता येतात. मात्र, रेफ्रिजरेटेड पिठाच्या चपात्या खाव्या का? मुळात फ्रिजमध्ये कणिक अशी भिजवून ठेवणं, किती वेळ-किती दिवस ठेवणं फायद्याचं किंवा तोट्याचं?

यासंदर्भात कलम टाईम्स या वेबसाईटवर, फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहाय्यक व्यवस्थापक आणि पोषणतज्ञ दीप्ती खातुजा म्हणतात, ''मळलेले पीठ  फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवल्याने शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात. कारण, फ्रिजमधील हानिकारक किरणं आणि रासायनिक वायूंचा पिठाशी संपर्क येऊ शकतो. जे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. लवकरच उन्हाळा सुरु होईल, उन्हाळ्यात तर कणिक बाहेर किंवा उघड्यावर ठेवू नये. त्यामुळे पिठात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत अन्नातून विषबाधा होण्याचा धोकाही वाढतो''(Harmful Effects of Refrigerated Dough).

फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ खाण्याचे तोटे

बुरशीजन्य संसर्ग होऊ शकते

फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ आंबू शकते, पीठ अधिक काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात यीस्टचे प्रमाण वाढू लागते. ज्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होतो. ज्याने शरीरात एक प्रकारची ॲलर्जी निर्माण होते. मळमळ, उलट्या होणे असा त्रास होऊ शकतो.

पचनसंस्थेवर परिणाम

फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ पचनक्रिया बिघडवू शकते. यामुळे पोटाच्या चयापचय गतीसह, विषबाधा होऊ शकते. अशा परिस्थितीत आतड्यांतील चांगल्या जीवाणूंना हानी पोहोचते. ज्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो.

तोंडात सतत फोड येतात? लाल चट्टे, ही सामान्य लक्षणे की कॅन्सर होण्याची शक्यता? तपासा...

आतड्यांसंबंधीत संसर्ग होऊ शकते

फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठामुळे आतड्यांसंबंधी संसर्ग होऊ शकते. यामुळे, आतड्यातील बॅक्टेरिया आणि मायक्रोबायोटा त्रास देऊ शकतात. आतड्यांसंबंधीत संसर्ग टाळण्यासाठी, चपाती बनवताना त्याच क्षणाला पीठ मळणे योग्य ठरेल.

पोषक तत्वांची कमतरता

फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या चपात्या, चवीला वेगळ्या लागतात. कारण, अधिक काळ ठेवल्यामुळे त्यात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. मळलेल्या पिठाचा रंग देखील बदलतो. त्यामुळे फ्रेश चपात्या खाणे उत्तम.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल