Join us   

दसऱ्याला श्रीखंड-पुरीवर ताव माराच, पण त्यानंतर न विसरता करा ३ गोष्टी, खाल्लेलं नीट पचावं तर…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2023 11:15 AM

Health Tips After having Shrikhand puri on Dasra : श्रीखंड पचायला जड असतं त्यामुळे ते खाल्ल्यावर काय काळजी घ्यावी याविषयी...

सणवार म्हणजे गोडाधोडाचे साग्रसंगीत जेवण आण त्यावर ताव मारुन दुपारी मस्त वामकुक्षी घेण्याचा दिवस. दसरा हा या सणांमधीलच एक महत्त्वाचा सण. या दिवशी बहुतांश जणांच्या घरी श्रीखंड-पुरीचा बेत केला जातो. ऑक्टोबर महिना म्हणजे उन्हाळा असल्याने गारेगार श्रीखंड किंवा आम्रखंड आणि टम्म फुगलेली पुरी आणि त्यासोबत बटाट्याची भाजी, मसालेभात हा वर्षानुवर्षाचा ठरलेला मेन्यू असतो. गोडाचं जेवण असेल आणि घरातले सगळे एकत्र असतील तर नकळत नेहमीपेक्षा ४ घास जास्तच जेवण जाते. असे भरपेट जेवण झाल्यावर आपल्याला एकतर जडपणा येतो आणि गोड आणि तेलकट खाल्ल्याने सतत तहान लागते. मात्र श्रीखंडावर प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायले तर त्याचा त्रास होऊ शकतो. तसंच श्रीखंड पचायला जड असतं त्यामुळे ते खाल्ल्यावर काय काळजी घ्यावी म्हणजे खाल्लेले पचणे सोपे होईल हे समजून घेऊया (Health Tips After having Shrikhand puri on Dasra)...

१. खूप पाणी पिऊ नये

श्रीखंड हे दह्याचे म्हणजेच चक्क्यापासून तयार झालेले असते. तसेच त्यामध्ये साखरेचे प्रमाणही जास्त असते. त्यासोबत पुरी असेल तर त्या पुऱ्या तेलकट असतात. हे दोन्ही पदार्थ खाल्ल्यावर खूप पाणी पाणी होण्याची शक्यता असते. तसेच ऑक्टोबर हिटमुळेही घामाने शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते. अशावेळी जास्तीचे जेवण आणि त्यावर घटाघटा पाणी प्यायल्यास पोटात गुबारा धरल्यासारखे होऊ शकते. काहीवेळा पोट खराब होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे खूप जास्त पाणी पिऊ नये, मग तहान शमवण्यासाठी काकडी खाणे, थोडा सोडा घेणे असे उपाय करता येतात. 

(Image : Google )

२. लगेचच झोपू नये

जास्तीचे आणि गोडाचे जेवण झाल्यावर नकळत आपल्या डोळ्यावर झापड यायला लागते. सणाला सुट्टी असल्याने आपण जेवण झाले की मस्त फॅन लावून ताणून देतो. पण असे केल्याने खाल्लेले अन्न पचत नाही आणि शरीरावर चरबी साचते. त्यामुळे लठ्ठपणा आणि डायबिटीस सारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून जास्त आणि गोडाचे जेवण झाल्यावर लगेचच झोपू नये तर थोडी शतपावली करावी आणि वज्रासनात बसावे. 

(Image : Google )

३. रात्री हलके जेवण घ्यावे

श्रीखंड-पुरीचा बेत केल्यावर त्यासोबत कोरडी भाडी, कोशिंबीर, तळण, चटणी, वरण भात हे असतेच. इतके साग्रसंगीत जेवण केल्यावर आपल्याला काहीसे जड झाल्यासारखे वाटते. अशावेळी रात्री आवर्जून हलका, पोटाला सहज पचेल असा आहार घ्यायला हवा. नाहीतर सणवार अंगाशी येण्याची शक्यता असते. यामध्ये मूगाची खिचडी, दही भात, सॅलेड, सूप असे हलके जेवण घ्यायला हवे.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सदसराफिटनेस टिप्स