Join us   

क्रॅश डाएटमुळे झाला श्रीदेवीचा मृत्यू? स्लिम होण्यासाठी क्रॅश डाएट करतात, ते नक्की असते काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2023 2:29 PM

Know How Crash Diet is dangerous for health one of the reason behind Shridevi's Death :क्रॅश डाएट करणे आरोग्यासाठी कसे घातक असते याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर सांगतात...

बॉलीवूडची ‘चांदनी’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईत अपघाती निधन झाले. भाचा मोहित मारवाहच्या लग्नासाठी गेलेल्या असताना बाथरुममध्ये पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पण यामागे नेमके काय कारण होते ते मात्र समजू शकले नाही. नुकत्याच एका मुलाखतीत श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी एक अतिशय महत्त्वाचा खुलासा केला. श्रीदेवी अतिशय कडक असे क्रॅश डाएट करत असल्याचे बोनी यांनी सांगितले. निधन झालं त्यादिवशी सुद्धा तिचं डाएट सुरु होतं. अनेकवेळा ती काहीच खायची नाही. पडद्यावर सुंदर दिसावं ही तिची कायम इच्छा असायची. माझ्याशी लग्न झाल्यावर अनेकदा तिला ब्लॅकआउट्सचा त्रास झाल्याचं मी पाहिलं होतं. डॉक्टरांनी तिला कमी रक्तदाबाचा त्रास असल्याचंही सांगितलं होतं. जेवणात मीठ खाल्लं पाहिजे असा सल्ला नेहमी तिला डॉक्टर द्यायचे परंतु, डाएटमुळे अनेकदा ती अळणी पदार्थ खायची. दुर्दैवाने, तिने या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही असंही त्यांनी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर अशाप्रकारे क्रॅश डाएट करणे आरोग्यासाठी कसे घातक असते याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले. 

(Image : Google )

हल्ली तरुण मुलींना आणि बायकांना स्लिम आणि ट्रिम राहायचं असतं !  मॉडेल्स टीव्ही स्टार यांच्यासारखं दिसायचं असतं. तसेच परदेशी मॉडेल्स आणि फिल्मस्टार सारखं सुद्धा राहण्याचा प्रयत्न असतो. वजन काट्यावर कमीत कमी आकडा दिसला की मुली खुश होतात. पण क्रॅश डायटिंग करून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं की त्याची किंमत मोजावी लागते बहुतेक तरुण मुली बारीक होण्यासाठी कुठलीही किंमत द्यायला त्या तयार असतात. जिम मध्ये तासान तास व्यायाम करणे, क्रॅश डायटिंग आणि या सगळ्यामुळे अभ्यासाकडे किंवा इतर ऍक्टिव्हिटीजकडे दुर्लक्ष होतं.  अशाप्रकारच्या डाएटमुळे चेहरा सुकून जातो, केस निस्तेज होतात. काही वेटलॉस प्रोग्रॅममध्ये व्यायाम भरपूर वाढवला जातो आधीच कमी असलेला आहार किंवा डायट आणखी कमी केला जातो. या मुलींना जे काय थोडं खायची सवय असते त्याचाही मनाला खूप त्रास होतो. भूक अनावर झाली की काहीतरी थोडं खाताना खूप प्रचंड अपराधी वाटायला लागतं. खाणं म्हणजे पाप करणं आहे अशी भावना मनात रुजते आणि मग खायचीच भीती वाटायला लागते. या सगळ्याचा परिणाम मनावर इतका होतो की स्वभाव चिडचिडा बनतो. 

कुपोषणामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते, आजारपण येतं आणि शेवटी मासिक पाळी थांबते. आहारावरील तीव्र निर्बंधांमुळे मासिक पाळी नियंत्रित करणारा मेंदूचा भाग काम करणं थांबवतो. ओव्ह्युलेशन साठी आवश्यक हार्मोन्सची निर्मिती थांबते. शरीरातील चरबी म्हणजे फॅट आणि मसलमास अति प्रमाणात कमी झाल्यामुळे इस्ट्रोजनचं उत्पादन कमी होतं. आहारातील फॅटच्या तीव्र कमतरतेमुळे कोलेस्टेरॉलचं इस्ट्रोजनमध्ये रूपांतर होऊ शकत नाही आणि परिणामी मासिक पाळी थांबते, या स्थितीला अमेनोरिया म्हणतात. शेवटी काही मुलींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ येते. मानसोपचार तज्ञांकडून ट्रीटमेंट घ्यायची वेळ येते. त्यांचा आत्मविश्वास ढासळतो, वारंवार डिप्रेशन येतं. हृदयाचे ठोके कमी होतात, ब्लडप्रेशर लो होतं. रक्तातील क्रियाटिनिनच्या लेव्हल्स वाढतात. ह्या सगळ्याला अनोरेक्झिया नरव्होसा म्हणतात. 

(Image : Google )

जाड होण्याच्या भीतीपोटी ही सगळी किंमत या मुली मोजतात. वजन कमी करण्याकरता सर्रास नको ते अघोरी उपाय केले जातात आणि हे शॉर्टकट्स वापरून शरीराची हेळसांड केली जाते. त्यामुळे असे विचित्र, शरीराला घातक असलेले उपाय क्रॅश डाएट करणं म्हणजे जीवावर बेतणं होऊ शकतं. दीर्घकाळ उपास किंवा एकदाच जेवण करून उपास केल्यामुळे शरीराला फायदा होण्यापेक्षा तोटाच होऊ शकतो. हे डाएटीशियनच्या सल्ल्याशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जात नाही. क्रियाटिनीनच्या लेवल्स वाढून पाय सांधे दुखणं असे विकार होतात. पित्तखडे, हृदयविकार, मुतखडे, गाऊट होण्याची शक्यता असते. काहीजण एलट्रोक्झिन किंवा पोडेरॉक्स अशी कृत्रिम कॅलरी वाढवणारी किंवा भूक कमी करणारी औषधे घेतात. या गोळ्यांचे साईड इफेक्ट होतात. यामुळे हा उपाय तात्पुरता असून त्याची किंमत खूप जास्त असते. याशिवाय स्टीम बाथ, सोना बाथ, बॉडी रॅप यांनी शरीरातील पाणी तात्पुरतं कमी होतं आणि वजन घटतं.  दुसऱ्या दिवशी वजन परत पूर्वी इतकच भरतं. म्हणून स्लिम आणि ट्रिम राहण्यासाठी योग्य उपाय समजून घ्यावेत. वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर सावकाश, संपूर्ण आरोग्य सांभाळून ते कमी करता येतं. हेल्दी डायट असेल आणि स्लो आणि स्टेडी मेथड ने सुद्धा वजन कमी करता येतं आणि ते टिकवता सुद्धा येतं. शरीराला आवश्यक ते सर्व अन्नघटक पुरेशा प्रमाणात असलेला बॅलन्स डाएट घेणं केव्हाही महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्यायला हवे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स