Join us   

पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर लक्षात ठेवा 5 गोष्टी, डॉक्टर सांगतात हमखास होणाऱ्या चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2022 11:17 AM

Monsoon Health Care Tips : पावसाळा एन्जॉय करायचा तर आरोग्याची काळजी घ्यायलाच हवी...

ठळक मुद्दे पावसाळ्या आधी किंवा पावसाळ्यात तेलाची बस्ती (एनिमा) करुन घेतले तर वाताचे विकार आटोक्यात राहण्यास मदत होते. पाण्यात सुंठ घालून ते उकळल्यास या काळात कमी झालेली भूक वाढेण्यास मदत होते.

पावसाळा म्हणजे सगळीकडे हिरवेगार, वाहणारे धबधबे आणि शेतीसाठी आबादीआबाद असा हा ऋतू. मात्र आरोग्यासाठी मात्र पावसाळा म्हणावा तितका चांगला नाही. सततच्या दमट हवामानामुळे हवेत वाढणारे जंतूंचे प्रमाण, पाणी दूषित होत असल्याने उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्या हे नेहमीचेच (Monsoon Special). मात्र आपल्याला पावसाळा एन्जॉय करता यावा आणि आजारपण आपल्यापासून दूर राहावे यासाठी आहार-विहाराची जास्त काळजी घेणे आवश्यक असते. थंड हवेमुळे या काळात भूक तर लागते. (Monsoon Health Care) पण पचनशक्ती क्षीण झाल्याने अन्न म्हणावे तसे पचत नाही. (Diet Tips) त्यामुळे गॅसेस, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी असे त्रास उद्भवू शकतात. तसेच या काळात गारठ्यामुळे सर्दी-ताप, खोकला यांसारखे संसर्गजन्य आजारही वाढतात. (Health Care Tips) या आजारांपासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी याविषयी सांगत आहेत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदिप काळे (Avoid 5 Mistakes in Monsoon).... 

(Image : Google)

१. पचायला हलका, गरम आहार घ्यावा

या काळात वातावरणात आम्लता वाढल्यामुळे, पचनशक्ती कमी झाल्याने अपचनाच्या तक्रारी वाढू लागतात.  त्यामुळे अनेकदा गॅसेस होण्याचे प्रमाण वाढते. म्हणून पावसाळ्यात शक्यतो कमी प्रमाणात घ्यावा. तसेच पचायला जड असलेले पदार्थ खाऊ नयेत. तसेच शिळे, आंबवलेले पदार्थ टाळायला हवेत. जास्तीत जास्त ताजा आणि गरम आहार घ्यावा.

२. काय खावे, काय खाऊ नये? 

पावसाळ्यात शक्यतो वातूळ पदार्थ म्हणजेच वाटाणे, हरभरा, छोले असे वातूळ पदार्थ टाळलेले चांगले. खाल्ले तरी त्याचे गरम सूप करुन, फोडणी देऊन खायला हवे. या काळात पालेभाज्या शक्यतो कमी प्रमाणात खाव्यात. आहारात सुंठ किंवा आल्याचा आवर्जून वापर करावा म्हणजे इन्फेक्शनपासून दूर राहणे शक्य होते, तसेच सैंधव मीठ आणि गाईच्या तूपाचा समावेश करावा. 

पांढरेशुभ्र मजबूत दात हवेत? तज्ज्ञ सांगतात दातांच्या आरोग्यासाठी २ सोपे घरगुती उपाय

३. बाहेरचे खाताना 

पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. या काळात माश्यांचे प्रमाण वाढलेले असते. अनेकदा माशांमुळे संसर्ग पसरायला मदत होते. बाहेरचे अन्न किती शिळे आहे, ते बनवताना कोणते पदार्थ, पाणी वापरले आहेत हे आपल्याला माहित नसते. तसेच बाहेर अन्न बनवताना स्वच्छतेची कितपत काळजी घेतली जाते हे माहित नसल्याने या दिवसांत बाहेरच्या खाण्यातून बाधा होण्याची शक्यता नेहमीपेक्षा जास्त असते. त्यामुळे शक्यतो घरातील ताजे अन्न खावे. पर्यायच नसेल तर बाहेरचे गरम, आपल्या समोर ताजे केलेले आणि स्वच्छता असलेल्या ठिकाणी खावे. 

(Image : Google)

प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून सतत सी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेता? 3 साईड इफेक्टस...

४. पाणी पिताना लक्षात ठेवा...

उन्हाळ्यामुळे आपल्याला पाणी जास्त प्रमाणात पिण्याची सवय असते. मात्र पावसाळ्यात शरीराला इतक्या पाण्याची आवश्यकता नसते, त्यामुळे आवश्यक तितकेच पाणी प्यावे. पावसाळ्यात पाणी गढूळ असण्याची शक्यता असल्याने शक्यतो उकळून, तुरटी फुरवून मगच प्यायला हवे. पाण्यात सुंठ घालून ते उकळल्यास या काळात कमी झालेली भूक वाढेण्यास मदत होते. तसेच गॅसेसचा त्रासही कमी होण्यास मदत होते. 

५. तर पावसाळाही होईल सुखाचा

पावसाळ्यात गार हवा असल्याने आपण फिरायला जातो. मात्र जास्त काळ पाण्यात राहिल्यास आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त भिजू नये. भिजलोच तरी लगेचच अंग, डोके कोरडे करावे. शक्यतो उबदार कपडे वापरावेत. पाण्यामुळे पायांना चिखल्या किंवा इतर संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. पावसाळ्या आधी किंवा पावसाळ्यात तेलाची बस्ती (एनिमा) करुन घेतले तर वाताचे विकार आटोक्यात राहण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनामानसून स्पेशल