Join us   

झोपलं दुपारी थोडावेळ तर काय बिघडलं? ३ गोष्टी आरोग्याचं चक्रच बिघडवून टाकतात, तुम्ही झोपता का दुपारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 9:38 AM

Perfect Time of Sleep lifestyle : झोप व्यवस्थित प्रमाणात न घेतल्यास क्रोध, संताप, चिडचिड, भीती, द्वेष, चिंता इ. मानसिक लक्षणे तीव्रतेने दिसू लागतात.

डॉ. संदीप काळे

आहार, निद्रा व ब्रह्मचर्य हे मनुष्यशरीराचे मुख्य आधारस्तंभ आहेत. समाजामध्ये वेळेवर झोप घेणारे, कमी- जास्त प्रमाणात अवेळी दिवसा किंवा अजिबात न झोपणारे अशा अनेक प्रकारच्या व्यक्ती आढळतात. झोप न येणे (अनिद्रा) व त्यापासून पुढे काही शारीरिक व मानसिक आजार निर्माण झालेले बरेच रुग्ण पाहायला मिळतात. यासाठी बदललेली जीवनशैली, मानसिक ताण, बदललेल्या जेवणाच्या सवयी, मनोरंजनाची वाढलेली साधने, शहरीकरण, व्यवसायाचे स्वरूप, प्रदूषण इ. गोष्टी कारणीभूत आहेत. आपण झोप येण्याची वाट बघत असतो. त्यासाठी टीव्हीसमोर बसणे, गप्पा मारणे, गाणे ऐकणे, वाचन करणे, इ. गोष्टींमध्ये मन गुंतवतो; परंतु असे न करता झोप घेण्यासाठी मनाला इतर सर्व विषयांपासून दूर करून लवकरात लवकर झोपण्यासाठी गेले पाहिजे. चोवीस तासांत व्यक्तीनुसार सात ते नऊ तास झोप घेतलीच पाहिजे. आयुर्वेदानुसार रात्री ८ ते पहाटे ४ या कालावधीत घेतलेली झोप ही उत्तम समजली जाते (Perfect Time of Sleep lifestyle). 

चुकीच्या वेळेवर घेतलेली झोप, अति प्रमाणात झोपणे व कमी प्रमाणात झोपणे या सवयींमुळे आरोग्य व आयुष्य यांचे नुकसान होते. झोप व मानसिक अवस्था यांचा एकमेकांशी पूरक असा संबंध असतो. झोप व्यवस्थित प्रमाणात न घेतल्यास क्रोध, संताप, चिडचिड, भीती, द्वेष, चिंता इ. मानसिक लक्षणे तीव्रतेने दिसू लागतात. काही संशोधनांमध्ये पूर्ण झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती वाढणे, चयापचय क्रिया सुरळीत चालणे, स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती, एकाग्रता वाढणे, मूड चांगला असणे, दिवसभर तरतरीतपणा असणे, निर्णयक्षमता उत्तम असणे, हृदयाची ताकद वाढणे, डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे कमी होणे, आयुष्य वाढणे इ. चांगले परीणाम दिसून आले आहेत. याच्या उलट जागरण केल्याने देहातील धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र) हे रुक्ष होतात व शरीरात उत्पन्न होतात. वात दोष वाढू लागतो आणि दिवसा झोपल्याने धातू स्निग्ध होतात व कफ दोष वाढू लागतो. 

दिवसा कोणी झोपलेले चालते? 

रात्री जागरण झाले असता त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाआधी जेवढा वेळ जागरण झाले, त्याच्या निम्मा वेळ झोप घ्यावी. ग्रीष्म ऋतूत (जून जुलै) रात्र लहान असल्यामुळे, वातावरणात उष्णता व रुक्षता असल्यामुळे दिवसा झोपणे हितकारक असते. इतर ऋतूंमध्ये मात्र दिवसा झोपल्याने कफ व पित्त दोषांची वृद्धी होते. भाषण करणारे, वाहनातून प्रवास करणारे (एसी वाहन नव्हे), पायी प्रवास करणारे, ओझे वाहणारे किंवा क्रोधित, दुःखी वृद्ध, लहान मूल, गर्भार स्त्रिया व अशक्त किंवा ज्यांना रोज झोपायची सवय आहे (परंतु कुठलाही त्रास होत नाही) अशांनी दिवसा झोप घ्यावी.

दिवसा कोणी झोपू नये? 

 मेद फार वाढलेले, कफ प्रकृती असलेले, जे रोज स्निग्ध (दूध, तूप इ.) आहार घेतात, त्यांनी दिवसा व ग्रीष्म ऋतूतही झोपू नये. अवेळी झोपल्याने ताप, अंगाला ओलसरपणा व थंडी वाजणे, सर्दी, शिंका, डोकेदुखी, अंगावर सूज, मळमळणे, शरीरातील रसवाहिन्यांचा अवरोध, भूक कमी होणे इ. विकार होतात.

निद्रानाशाची लक्षणे 

अंग ठेचल्यासारखे किंवा मोडून आल्यासारखे दुखणे, जांभया येणे, डोळे जड पडणे, आळस, ग्लानी, भ्रम, अपचन, वेगळ्याच तंद्रीत असणे व वातरोग. झोप येत नसल्यास दूध, दही यांचे सेवन करावे. अभ्यंगस्नान, डोक्यास तेल लावणे, कानांत तेल सोडणे, डोळ्यांवर घड्या ठेवणे इ. उपाय करावेत, सुख, समाधान व आवडत्या विषयाने झोपेचे सुख मिळते. 

(लेखक आयुर्वेदतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल