Join us   

Rules of Drinking water : भरपूर पाणी प्यावं हे खरं की खोटं? पाणी पिण्याचे 5 नियम...चुकलात की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 12:21 PM

पाणी आरोग्यासाठी आवश्यक असते हे आपल्याला माहित आहे, पण ते कोणी, किती कसे प्यायला हवे याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते, आहारतज्ज्ञ याबाबत सांगतात...

ठळक मुद्दे जगात होणाऱ्या ८० टक्के आजारांचं कारण अशुद्ध पाणी हे आहे.जास्त पाणी प्यायलेले चांगले असे आपल्याला वाटत असले तरी ते कधी कसे प्यावे हे महत्त्वाचे आहे

उत्तम आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व किती असते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आपल्या शरीरात वजनाच्या ६० ते ७० टक्के पाणीच असते. आपल्या शरीरात असणाऱ्या रक्तात ९० टक्के भाग हा पाण्याचा असतो. शरीरातील प्रत्येक पेशीत मोठ्या प्रमाणात पाणी असते. शरीरातील अन्नाचे पचन करण्याचे, शरीराची क्रिया सुरळीत ठेवण्याचे काम पाणी करत असते. पाण्याशिवाय आपण फार काळ जगू शकत नाही. शरीरात चयापचय, ऊर्जानिर्मिती, पचनक्रिया, तापमान नियंत्रण, अवयवांमध्ये अंतर्गत वंगण म्हणून पाणी महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. शरीरातील अनावश्यक घटकांचे उत्सर्जन करण्याचे काम हे पाण्यावाटे केले जाते. त्यामुळेच पाण्याला आपण जीवन म्हणतो. असे हे पाणी दिवसभरात किती, कधी आणि कसे प्यावे याबाबत मात्र आपल्याला पुरेशी माहिती नसते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर याबाबत काही महत्त्वाची माहिती देतात...

(Image : Google)
  पाणी कोणी, कसं आणि किती प्यावं? 

1.पाणी पिण्याचे आवश्यक प्रमाण व्यक्तीगतरीत्या बदलते. इतकेच नाही तर हवामानानुसार, ऋतूनुसारही पाण्याच्या प्रमाणात बदल होतो. पण सर्वसाधारणपणे दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यायला हवं. 

2.आता दिवसभरात या पाण्याचे विभाजन कसे असावे याबाबत माहित असणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर दात घासून १ ते २ ग्लास आणि नंतर दिवसभरात संध्याकाळपर्यंत दर एक तासाने १ ग्लास पाणी प्यावे. पुरेसं पाणी प्यायलं जात नसेल तर, वॉटर अलार्म, वॉटर ट्रॅकर यांचा वापर करु शकतो. नुसतं प्यायलं जात नसेल तर लिंबूपाणी, सरबत, शहाळ्याचे पाणी, ताक प्यावं. 

3.एकावेळी खूप जास्त पाणी पिऊ नये. याचे कारण म्हणजे त्यामुळे अपाय होऊ शकतो. एकावेळी जास्त पाणी प्यायल्यास लघवी जास्त होते आणि शरीरासाठी आवश्यक असणारे क्षार, सोडियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी, सी बाहेर फेकले जातात.

(Image : Google)

4. जेवताना 1 ग्लास पाणी अंतराने प्यायले तर ठिक आहे पण जेवणानंतर तासभर तरी पाणी पिऊ नये. ज्यांना वजन कमी करायचे आहे अशांनी जेवणाआधी पाणी प्यावे, म्हणजे नकळत कमी अन्न खाल्ले जाते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.   सामान्यपणे भरपूर पाणी पिण्याचा अपाय होत नाही पण मूत्रपिंड विकार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाण ठरवावं. याबरोबरच हृदयविकार असेल तर प्रमाणाबाहेर पाणी पिऊ नये. 

5. प्यायचे पाणी स्वच्छ, शुद्ध, निर्जंतुक असणे आवश्यक आहे. घरच्या घरी निर्जंतुक करण्यासाठी पाणी उकळून घ्यावं. उकळी आल्यानंतर 10 मिनिटं उकळावे. जगात होणाऱ्या ८० टक्के आजारांचं कारण अशुद्ध पाणी हे आहे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स