Join us   

पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या अपचन, गॅसेसच्या त्रासाने हैराण ? १० उपाय पावसाळ्यात पचन राहील चांगले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2023 8:04 PM

6 Ayurvedic Home Remedies That Can Cure Your Gas, Indigestion & Stomach Upset During Monsoons Season : पावसाळ्यात बदलत्या हवामानानुसार अपचन, गॅसेसचा त्रास होत असेल तर नेमके काय करावे ? काही घरगुती सोपे उपाय...

पावसाळ्याच्या सुरुवातीला वातारवण प्रसन्न वाटत असलं तरी याच कालावधीमध्ये ऋतूबदलामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात अनेकांना पोटाच्या व्याधींची समस्या जाणवते. अपचन, पोटात गॅसेस होणे, बद्धकोष्ट या त्रासामुळे उलट्या जुलाब पोटदुखी हे आजार देखील उद्भवू शकतात. विशेषतः ज्यांना अ‍ॅसिडिटीचा त्रास असणाऱ्यांना पावसाळ्यात अधिक त्रास होतो. त्यांनी अधिक काळजी घेतली तर हा त्रास टाळता येईल. पावसाळ्यात अपचनाचा त्रास होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या पचनसंस्थेची कार्यशीलता कमी होते. हवेतील आर्द्रतेमुळे असे होते. पोट, स्वादूपिंड, आतड्यांचे कार्य मंदावते आणि पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो. 

एवढेच नव्हे तर पावसाळ्यात आपण बरेचदा बाहेरचे उघड्यावरचे अन्नपदार्थ खातो. या उघड्यावरच्या अन्नपदार्थातून किंवा दूषित पाण्यामधून जिवाणू व विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. गरमीने हैराण झालेले आपण पावसाचा जरा कुठे आनंद घेत नाही, तर अपचन, गॅसेस, अॅसिडीटी यांसारख्या तक्रारी सुरू होतात. घरोघरी पचनाच्या किंवा गॅसेसच्या समस्यांनी त्रस्त असलेले लोक पाहायला मिळतात. हा गॅस बाहेर पडला तर ठिक, पण तो शरीरात साचून राहीला तर त्याचा जास्त त्रास होतो. पोटाचे हे त्रास टाळण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या या अपचन आणि गॅसेसच्या त्रासापासून स्वतःचा बचाव करु शकतो(Suffer From Gas & Indigestion During Monsoons - Ayurveda Experts Suggest 6 Remedies).

पावसाळ्यात अपचन आणि गॅसेसच्या समस्यांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी काही सोपे उपाय... 

१. पोटाला आराम देणे गरजेचे असल्याने आपल्या परंपरेनुसार या काळात उपवास करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंद झालेल्या अग्नीवर ताण न येता पचनशक्ती आणि पर्यायाने आपली तब्येत चांगली राहते.  

२. या दिवसांत भाजलेला, हलका आहार घेणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे पोट हलके राहते आणि पचनाच्या किंवा गॅसेस, अॅसिडीटी अशा तक्रारींपासून आपण दूर राहू शकतो. वाताला पोटात पुरेशी जागा असेल तर हा वात आपल्याला त्रासदायक ठरत नाही. 

३. आपण जे अन्नपदार्थ खातो ते गरम, ताजे खायला हवे. तसेच जुने धान्य वापरणे जास्त चांगले, ते पचायला हलके असते. भात करातना तांदूळ भाजून घेणे, डाळी भाजून घेणे यांमुळे ते पदार्थ पचायला हलके होतात. कुकरमध्ये खूप शिट्ट्या घेऊन शिजवण्यापेक्षा मोकळा भात शिजवल्यास तो पचायला हलका होतो.

मासिक पाळीत खूप पोट दुखते? करा ४ उपाय, पोटदुखी होईल कमी...

४. पावसाळ्याच्या काळात कोणताही पदार्थ खाताना त्यावर शक्यतो तूप घालावे. म्हणजे हे पदार्थ स्नेहयुक्त होऊन शरीरातील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. कोरडेपणा दूर झाल्यास वाताचे विकार कमी होण्यास मदत होते. तसेच तुपामुळे पदार्थ पचायला सोपे होत असल्याने फुलका, भात, थालिपीठ यांसारख्या पदार्थांवर आवर्जून तूप घालावे. 

५. जास्त प्रमाणात गॅसेस होत असतील तर जेवणाच्या आधी कोमट पाण्यातून तूप घेणे, पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणाआधी आल्याचा रस मधातून किंवा सैंधव मीठातून घेतल्यास त्याचाही वात किंवा गॅसेस कमी होण्यास फायदा होतो. 

६. रात्री उशीरा जेवण करणे टाळावे, त्याऐवजी संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान खावे. यामुळे अन्न पचनाला पुरेसा कालावधी मिळतो आणि पोटाच्या तक्रारी दूर राहतात. जेवणानंतर हालचाली झाल्यामुळे अन्नपचन क्रिया सुलभ होते. त्यामुळे लवकर जेवणे केव्हाही फायद्याचेच ठरते.

पाणी चुकीच्या रीतीने प्यायल्यानेही होते अपचन, पहा पाणी नेमके कसे प्यावे, केव्हा प्यावे ?

 ७. पावसाळ्यात बाहेर चालायला जाणं आणि व्यायाम हे कमी प्रमाणात होतात. रोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे किमान ३० मिनिटं शारीरिक व्यायाम करावे. सूर्यनमस्काऱ योगासने हे घरच्या घरी देखील शक्य असल्यास ते करावे.

८. रोजच्या आपल्या चहा ऐवजी हर्बल टी घ्यावा. तसेच सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्याआधी कोमट पाणी प्यावे.

सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...

९. प्रोबायोटिक्स युक्त पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया तयार होतात तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. प्रोबायोटिक्स युक्त दह्याचे दररोज सेवन करा. तेलकट पदार्थ खाल्ल्याने त्रास होत असेल तर एक वाटी दही खा. त्याने पोटाला आराम मिळेल.

१०. जर आपण जास्त तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर अनेकवेळा अपचन, आंबट ढेकर येणे, पोट फुगणे, गॅस इत्यादी समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात आपल्यालाही असा त्रास झाला तर लगेच कोमट पाणी प्यावे. त्यामुळे पचनसंस्था सक्रिय होते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपावसाळा आणि पावसाळी आजारपण