Join us   

Summer Care Tips : उन्हाळ्यात चहा-कॉफी नको वाटते, प्या 4 मस्त पेय, मिळवा गारेगार एनर्जी झटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 12:55 PM

Summer Care Tips : आपल्याकडे असणारी पारंपरिक शीतपेये प्यायल्यास शरीराला त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात आपला उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कोणती पेये प्यायलेली चांगली...

ठळक मुद्दे आवळा, कोकम यामध्ये असणारे पित्तशमन करणारे गुणधर्म असणारी सरबते उन्हाळ्यात अतिशय फायदेशीर असतात.

मार्च महिना अर्धा संपत आला आणि आता डोक्यावरचे ऊन वाढायला लागले. उन्हाचा चटका वाढला की आपोआपच आपल्या शरीराची पाण्याची मागणी वाढते. थंडीत तुलनेने कमी पाणी प्यायले जाते आणि भूक जास्त लागते. पण त्याच्याच उलटे उन्हाळ्यात भूक कमी होते आणि सतत पाणी-पाणी होते. शरीर बाहेरच्या वातावरणाशी आपले तापमान जुळवून घेत असल्याने हा बदल होतो. साधारणपणे आपल्याला ४ वाजता किंवा मधल्या वेळेतही चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. पण उन्हाळ्यात यामध्ये थोडा बदल करुन पारंपरिक शीतपेये घेतल्यास त्याचा आरोग्याला चांगला फायदा होतो. उकाड्यामुळे अंगाची होणारी लाहीलाही आणि घशाला पडणारी कोरड यामुळे एकूणच सतत गारेगार काहीतरी प्यावेसे किंवा खावेसे वाटते. मात्र अशात बर्फाचा गोळा, आईस्क्रीम, शीतपेये अशा गोष्टी वारंवार खाल्ल्यास घशाला त्रास होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा आपल्याकडे असणारी पारंपरिक शीतपेये प्यायल्यास शरीराला त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात आपला उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कोणती पेये प्यायलेली चांगली (Summer Care Tips)....

(Image : Google)

१. ताक - ताक हे अतिशय उत्तम पेय असून ताज्या दह्याचे ताक प्यायल्याने पित्तशमन होते. उन्हाळ्यात होणारे अॅसिडीटी, अपचन, गॅसे, यांसारखे त्रास ताकामुले कमी होतात. ताकामध्ये पचनासाठी चांगले गुणधर्म असल्याने जेवणामध्ये किंवा मधल्या वेळेतही हिंग किंवा जीरेपूड घालून प्यायलेले ताक तब्येतीसाठी अतिशय चांगले असते. शरीराला थंडावा मिळण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. ताकामध्ये असणारे व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस हे घटक आरोग्यासाठी उपयुक्त असतात. उन्हाळ्यात लघवीशी संबंधित उद्भवणाऱ्या तक्रारी ताकामुळे कमी होण्यास मदत होते. 

२. शहाळं पाणी - शहाळं पाण्याला आयुर्वेदात अमृतासमान महत्त्व आहे. शहाळं पाण्यामध्ये आरोग्याला आवश्यक असणारे असंख्य घटक असतात. त्यामुळे शरीराची झीज भरुन येण्यास तसेच शरीराला पोषण मिळण्यास मदत होते. शहाळं पाणी म्हणजे एकप्रकारचे सलाईन असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत शहाळं पाणी प्यायल्याने थकवा, मलूलपणा दूर होण्यास मदत होते. शहाळं आपण राहतो त्याठिकाणी सहज उपलब्ध असल्याने किमान दोन ते तीन दिवसांतून एकदा शहाळं आवर्जून प्यायला हवं. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी शहाळं अतिशय उपयुक्त असते. 

३. सरबते - उन्हाळ्याच्या दिवसांत आवळा, कोकम, वाळा अशी सरबते आपण घरात अगदी सहज करु शकतो. याशिवाय लिंबू सरबत, वेगवेगळ्या फळांच्या पल्पपासून केली जाणारी सरबते या काळात आवर्जून प्यायला हवीत. आवळा, कोकम यामध्ये असणारे पित्तशमन करणारे गुणधर्म उन्हाळ्यात अतिशय फायदेशीर असतात. माठातील पाण्यात साखर, मीठ आणि सरबताचा फ्लेवर असे घातल्याने तरतरी येण्यास मदत होते. उन्हामुळे आपल्याला ग्लानी येते किंवा सतत घाम आल्याने अचानक थकवा वाटतो. अशावेळी ताजे सरबत प्यायल्यास निश्चितच फायदा होतो. मात्र बाहेर सरबत पिताना त्यामध्ये बर्फ नाही ना, पाणी चांगले आहे ना याबाबत काळजी घेतलेली केव्हाही चांगली. 

(Image : Google)

४. उसाचा रस - उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या शरीराची लाहीलाही व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला सतत तहान लागते. अशावेळी उसाचा रस प्यायला तर काही वेळासाठी आपली तहान भागली जाते. उस हा अतिशय गोड असल्याने हा रस प्यायल्यास उन्हामुळे आलेला थकवा दूर होण्यासही मदत होते. उसाचा रस अधिक ऊर्जा देणारा असल्याने या कालावधीत आवर्जून प्यायला जातो. उन्हामुळे अनेकांना पित्ताचा त्रास होतो. हा त्रास कमी होण्यास उसाचा रस फायदेशीर ठरतो. उसाच्या रसात कार्बोहाड्रेट, प्रोटीन, आर्यन आणि पोटॅशियम असल्याने शरीरासाठी हे घटक फायदेशीर ठरतात. उसाचा रस प्यायल्याने शरीर मजबूत होते आणि आपल्या कार्यक्षमतेतही वाढ होते.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससमर स्पेशल