Join us   

Summer Care Tips : ऊन खूप तापायला लागलं, सावधान! ६ आजारांचा वाढता धोका, काय काळजी घ्याल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 4:03 PM

Summer Care Tips :लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या तापत्या उन्हाचा त्रास होतो. पण त्यापासून दूर राहायचे असल्यास वेळीच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली.

ठळक मुद्दे उन्हाळा सुरू होण्याआधीपासूनच तिखट पदार्थ, तळलेले पदार्थ यांचे आहारातील प्रमाण कमी करावे. लहान मुलांना चंदन, वाळा अशा थंड वनस्पतींचा लेप लावला असता घामोळ्या येत नाहीत व उष्णतेचे विकार होत नाहीत.

सगळ्या ऋतूंमध्ये आपल्याला कोणता ऋतू आवडतो असं जर कोणी विचारलं तर उन्हाळा आवडतो असं सांगणारे फारच कमी लोक असतात. आंबा सोडला तर उन्हाळ्यात आवडावे असे विशेष काही नसते. दिवसाचा बहुतांश काळ बाहेर असणारे रखरखीत ऊन, हवेतील रूक्षता आणि त्यामुळे येणारी मलुलता यांमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वैताग येतो. या काळात ऊन इतके प्रखर असते की घराच्या बाहेर पडायचे म्हटले तरी नको वाटते. उन्हाळ्यामध्ये ऊन्हाच्या तडाख्यामुळे ग्लानी किंवा चक्कर येणे, डिहायड्रेशन, गार पाणी किंवा पेय प्यायल्याने घसा धरणे आणि त्यामुळे होणारे जुलाब, ताप यांसारखे आजार, उष्माघात, उन्हाळी लागणे, घोळणा फुटणे, घामोळ्या येणे, त्वचा काळी पडणे, उष्णतेचे विकार, गळू होणे अशा समस्या उद्भवतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या तापत्या उन्हाचा त्रास होतो. (Summer Care Tips) पण त्यापासून दूर राहायचे असल्यास वेळीच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली. उन्हाळ्यात आहारात पाण्याचे आणि द्रवपदार्थांचे प्रमाण वाढवणे, शरीर थंड राहील यासाठी प्रयत्न करणे, उन्हाशी थेट संबंध येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाहूयात उन्हाळ्यात साधारणपणे कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्या होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायची याबाबत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदिप काळे सांगतात...

(Image : Google)

१. ताप / खोकला - या काळात हवामानातील उष्णता वाढून वातावरणातील काही व्हायरस सक्रीय होतात. त्यामुळे या काळात व्हायरल तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. उष्णता व ती टाळण्यासाठी आपण वापरणारे थंड उपाय यामुळे हे व्हायरस सक्रीय होत असतात. यासाठी पित्तपापडा, वाळा, नागरमोथा, चंदन, उशिर हे चूर्ण पाण्यात टाकून उकळून गाळून गार करुन दिवसभर घ्यावे. यामुळे ताप आला असेल तर तो कमी होण्यास मदत होते. 

२.फूड पॉइझनिंग / कावीळ - बऱ्याचदा आपण उन्हात बाहेर पडतो. उन्हामुळे आपल्याला सतत तहान लागते आणि अशावेळी आपल्यासोबत पाणी नसेल तर आपण रस्त्यावरचे सरबत, ज्यूस, उसाचा रस घेतो. यामधील विषाणू पोटात जाऊन फूड पॉयझनिंग किंवा कावीळ होऊ शकते. यासाठी घरातूनच पाणी पिवून जाने किंवा सोबत नेहमी पाणी ठेवणे हिताचे ठरते.

३. गळू - शरिरातील उष्णता बाहेर पडली नाही की ती रक्तातून त्वचेमार्फत फोड या स्वरूपात व्यक्त होत असते व त्वचेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. हे शक्यतो संधीच्या ठिकाणीच जास्त होतात त्यामुळे वेदना अधिक असतात. ज्यांना हा त्रास आहे त्यांनी विरेचन किंवा रक्तमोक्षण करून घेणे गरजेचे असते. याने व रक्तशुद्धी करणाऱ्या काढ्यांच्या सेवनाने गळू होणारच नाहीत असा प्रयत्न करता येतो. 

४. घोळणा फुटणे - बऱ्याचदा नाकातील कोरडेपणामुळे आणि हवेतील उष्णतेमुळे उन्हाळ्याच्या दिवसांत अचानक नाकातून रक्त येऊ लागते. त्यासाठी ४-४ थेंब साजूक तूप दिवसातून दोनदा दोन्ही नाकपुडीत सोडावे. याबरोबरच दुर्वांचा रस काढून तो प्यावा. मात्र सतत असा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला. 

(Image : Google)

५. घामोळ्या येणे - उन्हाळ्यात आपल्या अंगाला खूप घाम येतो. त्यात आपण फॅन किंवा कुलरचा वापर करतो त्यामुळे आलेला घाम हा त्वचेवरच जिरतो आणि त्वचेचे घाम बाहेर येणारे छिद्र बंद पडून तेथे छोट्या छोट्या पिटीका येतात. यासाठी उपाय म्हणून उन्हाळ्यात दोनदा किंवा तीनदा आंघोळ करावी. आंघोळी नंतर पावडर लावावी त्यामुळे घाम आला असता तो शोषला जातो. लहान मुलांना चंदन, वाळा अशा थंड वनस्पतींचा लेप लावला असता घामोळ्या येत नाहीत व उष्णतेचे विकार होत नाहीत.

६. उन्हाळी लागणे - आपल्या शरिरात पित्त दोष अधिक असल्यास उष्णतेने शरिरातील अ‍सिडची पातळी आणखीन वाढते व ती उष्णता शरिराबाहेर काढण्याचे काम मल व मुत्राद्वारे होत असते. मूत्राच्या ठिकाणी हे पित्त जाऊन मुत्राशयात दाह निर्माण करते व त्यामुळे लघवीला जळजळ होते. यासाठी आहारामध्ये थंड पदार्थांचे सेवन आवश्यक असते. धने, जीरे व वाळा यांचे पेय तयार करून प्यायल्यास लगेच आराम मिळतो. उन्हाळा सुरू होण्याआधीपासूनच तिखट पदार्थ, तळलेले पदार्थ यांचे आहारातील प्रमाण कमी करावे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससमर स्पेशल