Join us   

Tips To Get Rid Of Bad Breath : तोंडाला सतत दुर्गंध येतो? काय त्याचं कारण, ५ सोपे उपाय- दुर्गंधी घालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2022 12:13 PM

Tips To Get Rid Of Bad Breath : दातांचे आणि तोंडाचे तसेच पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तोंडाचा वास येणे चांगले नाही...

ठळक मुद्दे शरीराचे कार्य सुरळीत चालण्याबरोबरच तोंडाचा वास येऊ नये म्हणून पाणी पिण्याचा उपयोग होतो.तोंडाला दुर्गंधी येणे हे अस्वच्छपणाचे लक्षण आहेच पण आरोग्याच्यादृष्टीनेही ते चांगले नाही

आपण बराच वेळ शांत बसलो आणि नंतर तोंड उघडले की आपल्या तोंडाला एकप्रकारची दुर्गंधी येते. बोलताना आपण एकमेकांच्या जवळ असू तर आपल्या तोंडाचा हा वास आजुबाजूच्यांना अगदी सहज जातो. आपल्या तोंडाला असा वास येत असेल तर नकळत लोक आपल्यापासून चार हात लांब राहतात. तोंडाला असा वास येणे सामाजिकदृष्ट्या तर चांगले नाहीच मात्र आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही अशाप्रकारे वास येणे योग्य नाही (Tips To Get Rid Of Bad Breath). यामागे दातांचे आरोग्य चांगले नसणे, पोट साफ नसणे, पाणी कमी पिणे, फुफ्फुसात इन्फेक्शन असणे किंवा डायबिटीस अशी अनेक कारणे असू शकतात. दात स्वच्छ न घासणे, हिरड्या किंवा तोंडाशी संबंधित समस्या, धूम्रपान किंवा तंबाखू खाणे यांसारख्या सवयींमुळेही तोंडाला घाण वास येण्याची शक्यता आहे. आता असा वास येत असेल तर नेमके कोणते उपाय करायला हवेत हे जाणून घेऊया.

(Image : Google)

१. दिवसातून २ वेळा न चुकता ब्रश करणे 

आपण सगळेच सकाळी उठल्यावर ब्रश करतो. रात्रभर आपल्या तोंडात जमा झालेले ट़क्सिन्स यामुळे साफ होण्यास मदत होते. याबरोबरच रात्री झोपताना आपण न चुकता ब्रश केला आणि जीभ साफ केली तर सकाळी उठल्यावर आपल्या तोंडाला जास्त वास येत नाही. जीभ आणि तोंड साफ असल्याने आपले पोटाचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. 

२. जेवणानंतर बडीशोप खाणे 

बडीशोपला एकप्रकारचा स्वाद असतो, त्यामुळे तोंडाचा वास दूर होण्यास मदत होते. तसेच बडीशोपमुळे खाल्लेले अन् चांगल्यारितीने पचत असल्याने जेवणानंतर आवर्जून बडीशोप खायला हवी. यामुळे लाळेची निर्मिती होते आणि तोंड कोरडे पडत नाही. तोंड कोरडे पडल्याने तोंडाला वास येण्याची शक्यता असते. पण बडीशोपमुळे तोंड कोरडे पडत नाही आणि तोंडाला वासही येत नाही. 

३. जेवणानंतर चुळा भरणे 

जेवण झाल्यावर लगेचच पाणी पिणे पोटाच्या आरोग्यासाठी चांगले नसते. मात्र जेवण झाल्यावर भरपूर आणि जोरजोरात चुळा भरणे आवश्यक आहे. त्यामुळे दातांमध्ये किंवा तोंडाच्या इतर भागात कुठे अन्नाचे कण अडकलेले असतील तर ते निघून जाण्यास मदत होते. हे कण तोंडात तसेच राहील्यास तोंडाला वास येण्याची शक्यता असते. ऑफीसमध्ये असल्यास चुळा भरण्यासाठी आपण बाजारात मिळणारे वेगवेगळ्या फ्लेवरचे माऊथ वॉशही वापरु शकतो.

(Image : Google)

४. ठराविक अंतराने अन्न खाणे 

आपण दर काही वेळाने काही ना काही तोंडात टाकत राहीलो तर तोडात पदार्थांचा वास किंवा चव तशीच राहते. दरवेळी आपण खाल्ल्यावर चूळ भरतोच किंवा पाणी पितोच असे नाही. सतत खाल्ले गेले तर तोंडाला दुर्गंध येण्याची शक्यता असते. म्हणून नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा किंवा स्नॅक्स आणि रात्रीचे जेवण यांच्या मध्ये शक्यतो सतत तोंडात काही टाकू नये. प्रत्येक खाण्यामध्ये किमान ३ ते ४ तासांची गॅप असायला हवी. 

५. जास्तीत जास्त पाणी पिणे 

जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. शरीराचे कार्य सुरळीत चालण्याबरोबरच तोंडाचा वास येऊ नये म्हणून पाणी पिण्याचा उपयोग होतो. लघवी पांढरी होत असेल तर ठिक आहे. पण लघवी पिवळ्या रंगाची होत असेल तर आणखी पाणी पिण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे. 

 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स