Join us   

दिवसभरात कोणत्या वेळेला पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले? तज्ज्ञ सांगतात, योग्य वेळ-कारणं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2024 11:18 AM

What is the best time of day to drink water : आपण आहाराबाबत ज्याप्रमाणे नियम पाळतो त्याचप्रमाणे पाण्याबाबतही पाळायला हवेत..

आपल्या शरीरातील ७० ते ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो हे आपल्याला माहित आहे. खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रुपांतर होण्यासाठी पाण्याची अतिशय महत्त्वाची भूमिका असते पाण्यामुळे सर्व शरीरातील चयापचय क्रिया सुरळीत चालण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभरात किमान ३ ते ४ लीटर पाणी आवर्जून प्यायला हवं असं वारंवार सांगितलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसांत तर हवेतील उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी होते. त्यामुळे आपल्याला एरवीपेक्षा जास्त तहान लागते (What is the best time of day to drink water) . 

पाणी योग्य प्रमाणात प्यायला हवं हे ठिक आहे. पण ते पिण्याची योग्य वेळ कोणती हेही आपल्याला माहित असायला हवं. नाहीतर पाण्याचा उपयोग न होता चुकीचे परीणामही होऊ शकतात. आपण आहाराबाबत ज्याप्रमाणे काही नियम पाळतो त्याचप्रमाणे पाण्याबाबतही काही नियम आवर्जून पाळायला हवेत. योग्य वेळी, योग्य पद्धतीने पाणी प्यायले तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा पाणी पिण्याच्या योग्य वेळेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, त्या कोणत्या पाहूया..

(Image : Google)

१. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या २०० मिली पाणी प्या. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतील आणि पोट मोकळे होण्यास मदत होईल. या पाण्यात आपण १ चमचा तूप किंवा अर्ध्या लिंबाचा रस किंवा चिमूटभर दालचिनी पावडर घालू शकता. यामुळे अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात मिळण्यास मदत होईल. दात घासल्यानंतर आणि जीभ साफ केल्यानंतरच हे पाणी प्यायला हवे. 

२. आंघोळीच्या आधी १ ग्लास पाणी आवर्जून प्यायला हवे. यामुळे रक्तदाबाची समस्या असेल तर ती कमी होण्यास मदत होईल. पाणी प्यायल्याने शरीर थंड आणि शांत राहण्यास याचा फायदा होईल. 

३. जेवणाच्या आधी पाणी पिणे गरजेचे असते. यामुळे पचनमार्ग साफ होण्यास आणि वजन नियंत्रणात येण्यास फायदा होतो. त्यामुळे जेवणासाठी पोट किंवा शरीर तयार होते, मात्र जेवताना अजिबात पाणी पिऊ नये. यामुळे पचनासाठी आवश्यक असणारे रस निघून जातात. जेवण झाल्यावर अर्धा तासाने पाणी पिण्यास हरकत नाही. 

४. झोपताना आवर्जून ग्लासभर पाणी प्यायला हवे. त्यामुळे कार्डीअॅक अरेस्टची शक्यता कमी होण्यास मदत होते. कार्डीअॅक अरेस्ट साधारणपणे पहाटेच्या वेळात येण्याची शक्यता जास्त असते. पण झोपताना पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी चांगली राखली जाते आणि रक्तदाब कमी राहण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल