Join us   

World Diabetes Day 2022 : डायबिटीस असेल तर जपायला हव्यात ४ गोष्टी, शुगर नियंत्रणात ठेवायची तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 3:59 PM

World Diabetes Day 2022 Tips for Sugar Patients : वेळीच योग्य ती काळजी न घेतल्यास शरीरात बऱ्याच गुंतागुंती निर्माण होतात

ठळक मुद्दे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योग्य ती औषधे योग्य वेळेला घ्यायला हवीत. ताणाचा म्हणजेच आपल्या मनस्थितीचा थेट आपल्या शरीरावर परीणाम होतो. त्यामुळे मनस्थिती चांगली ठेवणे शुगर नियंत्रणात राहण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. 

डायबिटीस हा आजार नसून ती जीवनशैलीविषयक एक महत्त्वाची समस्या आहे हे आपल्या सगळ्यांनाच एव्हाना माहिती झाले आहे. भारत हा डायबिटीसच्या रुग्णांमध्ये आघाडीवर असलेला देश आहे. चुकीची आहारपद्धती, व्यायामाचा अभाव, वाढते ताणतणाव आणि जीवनशैलीतील इतर गोष्टी यांमुळे डायबिटीसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. समाजाच्या सर्व स्तरात सर्व वयोगटात वेगाने वाढणारा डायबिटीस भविष्यातील अनेक आजारांचे महत्त्वाचे कारण ठरत आहे. याबाबत वेळीच योग्य ती काळजी न घेतल्यास शरीरात बऱ्याच गुंतागुंती निर्माण होतात आणि मग यकृत, किडणी, हृदय यांच्या तक्रारी किंवा इतरही काही समस्या वाढत जातात. असे होऊ नये म्हणून डायबिटीसचे निदान झाल्यावर कोणत्या ४ गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी याविषयी (World Diabetes Day 2022 Tips for Sugar Patients)...

(Image : Google)

१. आहार

आहार ही आपल्या जीवनशैलीतील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपला आहार योग्य नसेल तर त्याचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर वाढणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपला आहार हा सात्विक, घरगुती आणि योग्य त्या प्रमाणातच असायला हवा. 

२. व्यायाम 

व्यायाम ही प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. व्यायामामुळे शरीर लवचिक तर राहतेच पण शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडल्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते. तसचे आपण खात असलेले अन्न पचून त्याचा शरीराला योग्य तो फायदा मिळवायचा असेल तर किमान चालणे, योगासने, सायकलिंग असा काही ना काही व्यायाम डायबिटीस असलेल्यांनी आवर्जून करायला हवा. यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. ताण 

ताण हे रक्तातील साखरेची पातळ वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही लहानसहान गोष्टींचा ताण घेणे शक्यतो टाळायला हवे. ताणाचा म्हणजेच आपल्या मनस्थितीचा थेट आपल्या शरीरावर परीणाम होतो. त्यामुळे मनस्थिती चांगली ठेवणे शुगर नियंत्रणात राहण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. 

४. औषधोपचार 

शुगर असेल तरी अनेक जण औषधोपचार करत नाहीत. अनेकदा औषधोपचारांकडे आपल्याकडे आजही तितक्या गांभिर्याने पाहिले जात नाही. औषधांमुळे आपले आरोग्य दिर्घकाळ चांगले राहण्यास मदत होत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योग्य ती औषधे योग्य वेळेला घ्यायला हवीत. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह