Join us  

पालकांनी मुलांशी बोलताना टाळायलाच हवीत अशी 5 वाक्ये, मुलांच्या मनावर होतो परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 10:14 AM

5 Things Parents Should Never Say to Their Child : मुलांशी बोलताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी...

ठळक मुद्देआज जग जवळ येत असताना महिला आणि पुरुष दोघांनाही सर्व प्रकारची कामे येणे, दोघांच्याही क्षमता विकसित असणे आवश्यक आहे. पालकत्व ही जबाबदारीची भूमिका असून ती निभावताना आपल्याला काही गोष्टींचे भान असणे आवश्यक आहे.

मुलांनी आपल्याशी नीट बोलावं, उलटं बोलू नये किंवा आगाऊसारखं बोलून आपला अनादर करु नये असं आपल्याला कायम वाटतं. मात्र मुलं सगळ्यांसमोर आपला अपमान करतात आणि आपल्याला शरमेनं खाली मान घालायची वेळ आणतात. मुलं काही गोष्टी न शिकवताही केवळ निरीक्षणातून शिकत असतात. त्यामुळे मुलांसमोर काय बोलायचं, मुलांशी कसं वागायचं, त्यांना काही सांगताना कोणत्या गोष्टींचं भान ठेवायचं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात (Parenting Tips). पालक म्हणून मुलांवर हक्क किंवा अधिकार गाजवण्यापेक्षा मुलांशी मोकळा आणि पारदर्शी संवाद ठेवला तर त्याचा निश्चितच फायदा होतो. मुलांशी बोलताना कोणत्या गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात याविषयी अनेकदा पालकांना माहित नसते. पालकत्व ही जबाबदारीची भूमिका असून ती निभावताना आपल्याला काही गोष्टींचे भान असणे आवश्यक आहे. पाहूयात मुलांशी बोलताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी (5 Things Parents Should Never Say to Their Child ). 

१. तू चांगली कामगिरी केलीस पण...

मुलांनी अभ्यासात, खेळात किंवा एखाद्या कलेत चांगली कामगिरी करत यश मिळवलं असेल तर मुलांचं कौतुक करायला हवं. मुलांकडून जास्तीत जास्त चांगल्या यशाची अपेक्षा करणे रास्त असले तरी आता मिळालेले यश त्यांच्यासाठी खूप मोलाचे असू शकते. अशातच आपण यापेक्षा आणखी काहीतरी हवे होते असे म्हटल्यास मुले निराश होऊ शकतात. आपण आपल्या पालकांना अभिमान वाटेल असे काम केले नाही असे वाटून त्यांना विनाकारण न्यूनगंडाची भावना येऊ शकते. म्हणून आवश्यक तिथे मोकळेपणाने कौतुक करायला हवे.

२. रडणे थांबव, सगळं नीट होईल

मुलं जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे रडतात तेव्हा त्यांना त्याचे वाईट वाटलेले असते. आपल्या भावना ते रडण्यातून व्यक्त करत असतात. पण आपण त्यांना रडणे थांबव असे म्हणतो म्हणजे त्यांच्या भावना दाबण्यास सांगतो. त्यामुळे मुलांना एखाद्या गोष्टीमुळे रडू येत असेल तर त्यांना आधार द्यावा पण त्यांना मोकळे होऊ द्यावे. त्यामुळे त्यांच्या भावनांना वाट मिळते. 

३. त्यात काय मोठे...

आपले मूल जेव्हा अपसेट असते तेव्हा त्यात काय मोठे असे म्हणणे चुकीचे आहे. कारण यामुळे मुले आहेत त्याहून जास्त शांत होतात आणि आपल्या भावना ते आपल्या पालकांकडे मोकळेपणाने व्यक्त करु शकत नाहीत. त्यात काय मोठे हे वाक्य त्यांच्यासाठी साशंकता व्यक्त करणारे असू शकते. त्यामुळे मुलांशी बोलताना काळजी घ्यायला हवी. 

४. मी तुझ्यासाठी इतकं करतो/करते 

काही पालक मुलांना आपण त्यांच्यासाठी अमुक करतो, तमुक करतो हे सतत सांगत राहतात. मुलांना असे सारखे सांगत राहीलो तर मुलांना आपल्या पालकांबद्दल प्रेम वाटायचे सोडून त्यांना आपण पालकांवरचे ओझे आहोत की काय अशी भावना निर्माण होऊ शकते. त्यापेक्षा आमचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आम्ही तुझ्यासाठी ही गोष्ट करतो त्यामुळे तू जास्त प्रयत्न करुन स्वत:ला सिद्ध कर असे सांगायला हवे. 

५. भेदभाव नको

आजही आपल्या समाजात मुलगा आणि मुलगी यांच्याशी वागताना पालक बराच भेदभाव करत असल्याचे दिसते. मात्र असे करणे चुकीचे असून दोघांनाही समान वागणूक द्यायला हवी. आज जग जवळ येत असताना महिला आणि पुरुष दोघांनाही सर्व प्रकारची कामे येणे, दोघांच्याही क्षमता विकसित असणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी असा भेदभाव करणे चुकीचे आहे. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंरिलेशनशिप