Join us  

मुलांना शिस्त लावायची म्हणून चांगले रट्टे देता? मारण्याचे मुलांवर होतात 5 भयंकर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 7:49 PM

मुलांना मारणं, रट्टे देणं हा कुठल्याच समस्येवरचा उपाय नाही. तज्ज्ञ सांगतात याचे चांगले परिणाम होणे दूरच दुष्परिणामच जास्त होतात.

ठळक मुद्देमुलांना मारुन, त्यांच्यावर ओरडून पालक मुलांना असंच वागण्याचं जणू लायसन देत असतात.मुलांना मारल्यानं त्यांच्यात नकारात्मक भाव निर्माण होतात.छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलांना मारलं गेलं तर मुलं स्वत:ला दोषी समजायला लागतात.

मुलं ऐकत नाही, हट्ट करतात, अभ्यास नीट करत नाही, उलटून बोलता म्हणून आई बाबांचा संताप होतो. त्या संतापातून मुलांना मारलं जातं. मुलं तात्पुरती ऐकतात. हट्ट सोडतात पण म्हणून मुलांना मारल्यानं शिस्त लागली असं होत नाही. मुलांना मारण्याचे परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होवून त्याचा परिणाम मुलांच्या वर्तनावर, त्यांच्या विकासावर आणि सामाजिक वर्तनावर होतात.  म्हणून तज्ज्ञ मुलांना मारण्याऐवजी प्रेमानं समजून सांगण्याचा, समजून घेण्याचा सल्ला देतात. तज्ज्ञ म्हणातात मुलांना मारणं हा कुठल्याच समस्येवरचा उपाय नाही. याचा चांगला परिणाम होणे दूरच दुष्परिणामच जास्त होतात. 

Image: Google

मुलांना मारल्यास..

1.मुलांना मारुन, त्यांच्यावर चिडून ओरडून त्यांना शिस्त लावता येते हा चुकीचा समज आहे. उलट मुलांना मारुन, त्यांच्यावर ओरडून पालक मुलांना असंच वागण्याचं जणू लायसन देत असतात. मुलांना आपल्या लहान भावडांना मारण्याची सवय लागते. छोट्या चुका झाल्या तरी मुलं आई बाबा मारतील या शंकेनं घाबरतात आणि लहान भावंडांना मारुन, मारण्याची भीती दाखवून घाबरवतात. काही झालं की मारणं हाच योग्य पर्याय आहे असा समज मुलांंच्या मनावर पक्का होतो आणि मुलं मारकुटे, भांडकुदळ होतात. 

2. मुलांना मारण्याचा परिणाम केवळ शारीरिक पातळीपुरताच मर्यादित राहात नाही तर त्याचा मानसिक आणि भावनिक परिणामही होतो. मुलांकडून काहीही चुका झाल्यासा पालक मुलांना मारत असतील तर मुलांना आपण वाईट  मुलगा/ मुलगी असल्याची जाणीव होते. या जाणीवेचा परिणाम म्हणजे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. 

Image: Google

3.मारल्यानंतर मुलं ऐकतात हा पालकांचा गैरसमज आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलांना मारलं गेलं तर मुलं स्वत:ला दोषी समजायला लागतत. पालकांना घाबरतात. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचं टाळतात. मुलांना मारल्याचा परिणाम  नात्यावर होतो. मुलं आणि पालक यांच्यात शारीरिक शिक्षा दुरावा निर्माण करतात. 

Image: Google

4.  मुलांना सतत शारीरिक शिक्षा केल्यानं मुलं काही काळ घाबरतात, दबकून राहातात. पण आई बाबा काहीही झालं तरी मारतातच असा समज करुन कोडगी होतात. थोडं मोठं झाल्यावर आई बाबांना विरोध करणं, त्यांचं काहीच न ऐकणं , घरात बाहेर चुकीचं वागणं अशा भूमिकेतून एक प्रकारचा विद्रोह पुकारतात. ही विद्रोही भूमिका मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करते. 

5. मुलांना मारल्यानं त्यांच्यात नकारात्मक भाव निर्माण होतात. आई बाबा मारतात म्हणून आतल्या आता चडफडतात. सतत मनात राग साचत राहिल्यानं  हा राग नकारात्मक पध्दतीनं बाहेर काढतात. मुलं सतत मार खाऊन चिडचिडी आणि रागीट होतात. 

टॅग्स :पालकत्व