Join us  

मुलांना अपयश आलं तर पालक म्हणून तुम्हीच जास्त रडता-चिडता आणि घाबरता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2023 4:17 PM

Things To Say If Your Child Fails : मुलांच्या वाट्याल अपयश आलंच तर अशावेळी पालकांनीच त्यांच्याशी योग्य संवाद साधला पाहिजे, पालकच हताश झाले तर..

'अपयश हीच यशाची पहिली पायरी असते' असं म्हटलं जातं. आपण अपयशी झालो म्हणून प्रयत्न करणे सोडत नाही. उलट आपल्या चुका कुठे झाल्या आहेत याचा संपूर्ण अभ्यास करून परत जोमाने कामाला लागतो. मात्र कोणत्याही कामात अपयश आले तर कितीही समजूतदार व्यक्ती असली तरी नाराज तर होतेच. ती नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्यामुळे लहान मुलांचंही तेच होतं. स्पर्धा आहेच, त्यात पालक मुलांना स्पर्धेत लोटतात. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे असतेच. त्यामुळे अपयश आल्याने दुःखी होणे, एकटे वाटणे, गप्प बसणे यांसारखे वेगवगेळे बदल मुलांमध्ये होतात. अशा परिस्थितीत मुलांची समजूत काढणे पालकांना खूप कठीण जाते. अशावेळी पालकांनी काय करावे?(Things To Say If Your Child Fails).

सोबत आहोत हे सांगा..

१. आव्हानांबद्दल बोला - जर एखाद्या गोष्टीत पाल्याला अपयश आले तर सर्वप्रथम आव्हाने कोणती होती हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांसोबत आव्हानांबद्दल तसेच आलेल्या अडचणींबद्दल पॉझिटिव्हली चर्चा करा. त्यांना दोष देऊ नका.

२. सुधारणा करा - कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा केल्यास यश निश्चित मिळू शकत यावर मुलांशी चर्चा करा. ज्या कारणांमुळे अपयश आले आहे ती नेमकी करणे शोधून त्यात मुलांना सुधारणा करण्यास सांगा. 

३. अजून एक संधी आहे - एकदा अपयश आल्याने पुन्हा प्रयत्न केल्यास अपयशच मिळणार आहे, असा मुलांचा समज होऊ देऊ नका. एक संधी हुकल्याने काही बिघडत नाही, त्यापुढे येणाऱ्या संधीसाठी प्रयत्नशील राहा. ही गोष्ट मुलांच्या लक्षात आणून द्या. 

४. पुढे बघू - आता आलेले अपयश तुमचे पुढचे भविष्य ठरवू शकत नाही, असा विश्वास मुलांना द्या. सध्या समोर आलेले अपयश हे तात्पुरते आहे, त्यातील कमी भरून काढून आपण यशस्वी होऊ शकतो हे मुलांना समजावून सांगा.

५. अपयशाने चुका समजतात - जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत अपयशी होतो तेव्हाच आपल्या चुका कोणत्या आहेत व आपण कुठे चुकलो हे समजते . त्यामुळे मिळणाऱ्या अपयशातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. 

६. आपण त्यांच्या सोबत असल्याचे पटवून द्या - मुलांना अपयश आल्यानंतर आपले आई - वडील आपल्याला काय बोलतील याचे जास्त दडपण येते. अशा वेळी आपण त्यांच्या सोबत असल्याचे त्यांना पटवून द्या. त्यांना मिळालेल्या अपयशाने आपण दुःखी किंवा निराश झालेलो नाहीत याची खात्री मुलांना करून द्या. मुलं कितीही अपयशी झालीत तरी आपले पालक आपल्यासोबत आहेत हे समजल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

टॅग्स :पालकत्व