Join us  

दिला एखादा फटका तर बिघडलं कुठे? रागात मुलांवर हात उगारण्याचे मेंदूवर होतात ३ गंभीर परीणाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 9:35 AM

Know how hitting affect on children's brain parenting Tips : मुलांच्या मनावर दिर्घकालीन परीणाम होतो आणि भविष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी यावर अवलंबून असू शकतात.

मुलांनी ऐकलं नाही किंवा आपल्याला हवं तसं ते वागले नाहीत की आपण अगदी सहज त्यांना फटका देतो. काही वेळा मुलं आपल्या सहनशक्तीचा अंत पाहतात. त्यांना चांगली शिस्त लागावी त्यांनी चांगले वागावे यासाठी आपण त्यांना वळण लावत असतो आणि त्यांच्यावर संस्कार करत असतो. एकीकडे आपल्या आयुष्यातील ताणतणाव आणि दुसरीकडे मुलं देत असलेला त्रास हे सगळं काहीवेळा मॅनेज होत नसल्याने आपला मुलांवर राग निघतो. मुलांना ओरडणं, एखादी गोष्ट दटावून सांगणं किंवा त्यांच्या भल्यासाठी त्यांना आपलं ऐकायला लावणं हे ठिक आहे. पण काही वेळा रागाच्या भरात आपण त्यांच्यावर हात उगारतो. आपल्या माराला घाबरुन त्यावेळी मूल आपलं ऐकतंही. पण अशाप्रकारे मुलांवर हात उगारणे खरंच योग्य असते का (Know how hitting affect on children's brain parenting Tips)? 

आपण लहान असताना आपले आईवडील आपल्याला नाही का बदडून काढायचे. मग एखादवेळी धाक म्हणून एखादा फटका दिला तर बिघडलं कुठे असं आपल्याला अगदी सहज वाटून जातं. त्यावेळचा राग म्हणून आपण मुलांना एक फटका दिला असला तरी त्याचा मुलांच्या मनावर दिर्घकालीन परीणाम होतो आणि भविष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी यावर अवलंबून असू शकतात. कदाचित त्यावेळी आपल्या हे लक्षात येत नाही. पण कोणत्याही कारणासाठी मुलांना मारणे योग्य का नाही हे समजून घेतले तर आपल्याला त्यामागचे गांभिर्य नक्कीच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. मारण्याचे नेमके काय परीणाम होतात पाहूया...

(Image : Google)

मारल्यानंतर मुलांचा मेंदू कशाप्रकारे काम करतो...

मुलांच्या मेंदूची किमान गरज ही व्यक्ती म्हणून आपण सुरक्षित असणे ही असते. आपण जेव्हा मुलांना मारतो किंवा हल्ला करतो तेव्हा आपण सुरक्षित कसे राहायचे असा विचार नकळत मेंदूत सुरू होतो. अशावेळी मुलांच्या मेंदूत काही गोष्टींबाबत विचारचक्र सुरू होते. 

१. पालकांनी सांगितलेलं ऐकायला हवं असं वाटण्याऐवजी मी पालकांना काही सांगितलंच नाही तर मी सुरक्षित राहीन असा विचार मुलं करतात. 

२. मी पालकांसोबत सुरक्षित नाही त्यामुळे मला त्यांच्यापासून दूर राहायला हवं. 

३. सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे जर मी माझ्या पालकांसोबत सुरक्षित नसेन तर मी जगात कोणासोबतच सुरक्षित राहू शकत नाही. 

आपल्या मुलाचा मेंदू यातील कोणता विचार करेल यावर आपले नियंत्रण नसते. आपल्याला आईवडीलांना मार देऊनही आपण चांगल्या प्रकारे वाढलेलो असलो तरी आपण मुलांवर हात उगारुन त्यांना असुरक्षित वाटेल असे वागणे नक्कीच योग्य नाही. त्यामुळे ओरडा, प्रसंगी शिक्षा करा पण मुलांवर हात उगारु नका.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं