Join us  

मुलांना नेहमीच घरी एकटं सोडून जाता? तज्ज्ञ सांगतात त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 9:21 AM

Parenting Tips: तुम्हालाही मुलांना नेहमीच घरी एकटं सोडून जावं लागत असेल तर तज्ज्ञांनी सांगितलेला हा खास सल्ला एकदा वाचायलाच पाहिजे. 

ठळक मुद्देनाईलाजाने तुमच्याही मुलांवर अशीच वेळ येत असेल, तर याचे नेमके फायदे काय आणि तोटे काय याचा विचार एकदा पालकांनी करायलाच पाहिजे

आजकाल चौकोनी किंवा त्रिकोणी कुटूंब झालं आहे. या कुटूंबातही बऱ्याचदा आई आणि वडील दोघेही नोकरी करणारे (working parents). त्यामुळे मग थोडी मोठी मुलं असतील तर शाळा झाल्यावर ती मुलं एकेकटीच घरी बसतात. यात जर सोबतीला भाऊ- बहिण असतील तर एकवेळ ठिक. पण अनेक कुटूंबात एकुलते एक मुल असल्याने मग बऱ्याचदा ते एकच मुल घरात एकटे (lonely kid at home) बसलेले दिसते. नाईलाजाने तुमच्याही मुलांवर अशीच वेळ येत असेल, तर याचे नेमके फायदे काय आणि तोटे काय याचा विचार एकदा पालकांनी करायलाच पाहिजे, असे औरंगाबाद येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मिन आचलिया सांगत आहेत. (Leaving your child alone at home is really good?)

 

मुलांना घरी एकटं ठेवण्याबाबत तज्ज्ञ सांगतात...१. अगदी कधीतरी म्हणजे महिन्यातून एक- दोनदा आणि ते ही एक- दोन तासांसाठीच मुलांना घरी एकटं ठेवत असाल तर ते एकवेळ ठिक आहे. यामुळे मुलांमध्ये थोडी जबाबदारीची जाणीव पण निर्माण होते. पण एकटं ठेवण्यासाठी तुमच्या मुलांचं नेमकं वय काय हे आधी लक्षात घ्या. ७ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना तर घरी मुळीच एकटं ठेवू नये. मग ते अगदी थोड्या वेळासाठीही नाही. कारण आई- वडिलांच्या माघारी जर घरात एखादी इर्मजन्सी उद्भवली तर त्यावेळी काय करावं किंवा काय करू नये, याची काहीच माहिती या वयातल्या मुलांना नसते. त्यामुळे एवढ्या लहान मुलांना घरात एकटं ठेवूच नये.

 

२. नोकरी- व्यवसाय या निमित्ताने पालकांना रोजच घराबाहेर रहावं लागत असेल आणि त्यांचे ८ ते १५ या वयोगटातील मुल जर दररोज काही तासांसाठी घरी एकटे राहात असेल, तर अशा मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. 

कधीकधी मुड नसतो, खूप आळस येतो? हॅप्पी हार्मोन्स देणारे 6 पदार्थ खा.. लगेच व्हाल रिफ्रेश३. रोजच एकटं रहावं लागणारी मुलं हळूहळू एकलकोंडी होत जातात. त्यांना स्वत:चंच विश्व आवडू लागतं. त्याच विश्वात ते रममाण होतात. मुलांना अशीच जर सवय होत राहिली तर कालांतराने त्यांना त्यांच्या आई- वडिलांचा हस्तक्षेप किंवा त्यांचा आसपासचा वावरही नकोसा वाटू लागतो. अशी मुलं अगदी सहजपणे समाजापासून तुटली जातात. लोकांमध्ये मिसळण्याची, चारचौघांत बोलण्याची त्यांची क्षमता किंवा इच्छा कमी कमी होऊ लागते. त्यामुळे मुलांना एकटं घरात ठेवण्याऐवजी एकवेळ पाळणाघरात सगळ्या मुलांसोबत ठेवणं कधीही अधिक चांगलं. 

 

४. हल्ली तर घरात सगळ्यांसोबत असतानाही मुलं मोबाईल, टीव्ही यांच्यात गुरफटलेली असतात. मग घरात एकटं असताना तर ते या गोष्टींचा पुरेपूर फायदा घेणारच. वारंवार घरी एकटं रहावं लागत असेल तर मुलांचं स्क्रिन टाईम आणि स्क्रिन ॲडिक्शन या दोन्ही गोष्टी वाढत जातात. शिवाय वाढत्या वयातली मुलं असतील, तर पालक घरी नसताना ते या सगळ्या गॅझेट्सचा, टीव्हीचा उपयोग काय बघण्यासाठी करतील सांगता येत नाही. त्यामुळे मुलांना चुकीचे वळण लागण्याची भीतीही असतेच. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंसुंदर गृहनियोजनमोबाइल