Join us  

मुलांना शिस्त लावण्याआधी पालकांनी स्वत: अमलात आणावे ५ नियम, नाहीतर मुले तुमचं ऐकणारच नाहीत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2022 8:29 AM

मुलांवर आई वडिलांचा, त्यांच्या वागण्या बोलण्याचा प्रभाव अधिक असतो, यासाठी मुलांना शिस्त लावण्याआधी (disciplining child) पालकांनी आपल्याला शिस्त आहे की नाही हे तपासून पाहावं. तज्ज्ञांच्या मते मुलांनी शिस्तीनं वागावं असं वाटत असेल तर पालाकांनीही 5 नियम ( rules to be follow by parents) आधी पाळायला हवेत.

ठळक मुद्देमुलांचं आपल्याकडे लक्ष असतं याची जाणीव पालकांनी ठेवावी.पालक मुलांच्या सांगण्याकडे, बोलण्याकडे दुर्लक्ष करत असल्यास मुलांनाही मोठ्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागते. चांगल्या वाईटाचा फरक मुलांशी संवाद साधून त्यांना पटवून देता आला तर मुलं पालकांकडून शिकण्याच्या भूमिकेत राहातात.

आई बाबा कसे वागतात हे बघूनच मुलंही वागायला शिकतात. आई बाबा जर शांत स्वभावाचे असतील तर साहजिकच त्याचा प्रभाव मुलांच्या वागण्यावरही दिसतो. पण आई बाबा रागीट असतील तर मुलांनी शांत राहावं, नम्र राहावं अशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे. सर्व पालकांनी आपली मुलं मोठी होवून चांगली वागावीत असंच वाटतं. त्यासाठी ते मुलांना वागण्या बोलण्याची शिस्त (disciplining child)  शिकवतात. पण बालमानस शास्त्रज्ञांच्या मते मुलांवर आई वडिलांचा, त्यांच्या वागण्या बोलण्याचा प्रभाव अधिक असतो, यासाठी मुलांना शिस्त लावण्याआधी पालकांनी आपल्याला शिस्त आहे की नाही हे तपासून पाहावं. तज्ज्ञांच्या मते मुलांनी शिस्तशीर वागावं असं वाटत असेल तर पालाकांनीही 5 नियम (rules to be follow by parents) आधी पाळायला हवेत.

Image: Google

पालक  शिस्त पाळतात का?

1. मुलांचं आपल्याकडे लक्ष असतं हे पालकांनी लक्षात असू द्यावं. यासाठी आपण घरात कसं वागतो? घरातल्यांशी, बाहेरच्या लोकांशी कसं वागतो बोलतो हे पाहूनच मुलंही तसंच वागायला बोलायला शिकतात. त्यामुळे पालकांना जर खोटं बोलण्याची, सतत मोबाइल बघण्याची, टीव्ही पाहाण्याची सवय असेल तर मुलंही तसंच वागतात. पण मुलांनी खोटं बोललेलं, सतत टीव्ही पाहात बसलेलं पालकांना आवडत नाही. म्हणून ते मुलांवर ओरडतात, पण मुलांवर ओरडण्याआधी आपण आपली सवय आधी तपासून पाहावी आणि चुकीच्या सवयी आधी दुरुस्त कराव्यात.

2. नवरा बायकोत छोट्या मोठ्या गोष्टींवरुन वाद होणं हे चुकीचंही नाही आणि नवीनही नाही. पण मुलांच्या देखत वाद वाढणार नाही, भांडण जास्त ताणलं जाणार नाही याची पालकांनी काळजी घ्यायला हवी. एकमेकांशी वाद घालताना आवाजाची पातळी, अपशब्द निघणार नाही, चुकीचं वर्तन होणार नाही याबाबत पालकांनी सतत जागरुक असणं आवश्यक आहे. घरात सतत भांडणं होत असतील तर मुलंही बाहेर इतरांशी वागताना वैतागल्यासारखी वागतात नाहीतर अगदीच शांत शांत राहातात, इतरांमध्ये मिसळत नाहीत. हे टाळण्यासाठी आपसातले वाद चटकन कसे मिटतील याकडे लक्ष द्यावं. 

3. कामांच्या घाईगर्दीत मुलांना देण्यासाठी पालकांकडे वेळच नसतो. मुलांना  पालकांना काही सांगायचं असतं, दाखवायचं असतं पण वेळ नाही असं कारण देत मुलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं तर मुलं दुखावली जातात. इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागण्याचा धोका तर असतोच पण आपल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आई बाबांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय मुलांना लागू शकते. मग पुढे जावून आई बाबा आमच्या सांगण्याकडे मुलांचं लक्षच नसतं अशी तक्रार करतात. ही तक्रार करण्याची वेळ येवू नये म्हणून मुलांकडे दुर्लक्ष करणं टाळावं.

Image: Google

4. मुलांचं थोडं काही चुकलं तर त्यांच्यावर पालक ओरडतात, कधी मारतात. पण त्याचा मुलांवर वाईट परिणाम होतो. मुलांच्या चुकांवर ओरड्याची, मारण्याची सवय असल्यास पालकांनी ती आधी बदलायला हवी. मुलं चुकली म्हणून ओरडण्यापेक्षा त्यांना काय चुकलं ते शांतपणे समजून सांगता यायला हवं, चांगल्या वाईटाचा फरक मुलांशी संवाद साधून त्यांना पटवून देता आला तर मुलं पालकांकडून शिकण्याच्या भूमिकेत राहातात. नाहीतर सतत ओरडा खाणारी मुलं पुढे जावून मुजोर होतात. कोडग्यासारखी वागतात. 

5. मुलं उशिरा उठतात, एकाच जागी बसून राहातात, सतत मोबाइल खेळतात, टीव्ही पाहातात अशा तक्रारी पालक मुलांविषयी करत असतात. मुलांची जीवनशैली बदलायची असल्यास, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात असं वाटत असल्यास पालकांनीही स्वत:ला आरोग्यदायी सवयी लावायला हव्यात. लवकर उठणे, व्यायाम करणे, खेळणे, वाचणे, मोबाइल कमी पाहाणे या सवयी जर पालकांमध्ये असतील तर या सवयी मुलांना शिकवाव्या लागत नाही. मुलं पाहून त्याचं अनुकरण करतात. 

टॅग्स :पालकत्व