Health Tips: 'या' ६ चुका करत असाल तर तरुणपणीच म्हातारे व्हाल; शरीर थकते कारण...
Updated:February 1, 2025 17:18 IST2025-01-27T15:35:38+5:302025-02-01T17:18:36+5:30
Health Tips: अँटी एजिंग क्रीम लावून किंवा हेअर कलर लावून वृद्धत्त्वाच्या छटा झाकता येतील, पण शरीरावर दिसणारा थकवा तरुणपणीच म्हातारे बनवेल हे लक्षात ठेवा. शरीरात हे बदल कशाने घडतात? अकाली वृद्धत्त्व का येते? त्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्यात ते जाणून घेऊया.

वाढत्या वयाबरोबर शरीर थकले तरी मन तरुण ठेवता येते असे म्हणतात. मात्र लेखात दिलेल्या सहा चुका टाळल्या तर तरुणपणीच येणारे म्हातारपण थांबवता येईल हे नक्की. त्यासाठी दिलेले बदल आजपासूनच दैनंदिन जीवनात अंमलात आणायला सुरुवात करा.
साखरेचे अति सेवन :
तरुण वयात खाण्या-पिण्याच्या जडलेल्या सवयी म्हातारपणी त्रासदायक ठरू शकतात. जसे की दिवसभरात ७-८ वेळा चहा पिणे, गोड पदार्थ खाणे, कोल्ड ड्रिंक पिणे, या सवयींमुळे कळत-नकळत रक्तात साखरेचे प्रमाण वाढते आणि कमी वयात मधुमेह होण्याची शक्यता वाढते. तसेच साखरेचे प्रमाण वाढले तर त्वचा खराब होते, सुरकुत्या पडतात आणि कमी वयात वार्धक्याच्या खुणा दिसू लागतात. तसेच साखरेच्या अतिसेवनाने हाडांना ठिसूळपणा येतो आणि वजनवाढ होऊन तरुण असूनही ज्येष्ठ दिसू लागाल, रक्तदाब वाढेल आणि इतरही आजार जडतील. त्यामुळे साखरेचे सेवन आटोक्यात आणा, नैसर्गिक पदार्थामधून जेवढी साखर जाईल तेवढेच सेवन करा.
झोपेचा अभाव :
मोबाईलचा वापर वाढल्यापासून झोपेचे गणित बिघडले आहे. जागरण सुरु झाल्याने रात्री पुरेशी झोप होत नाही आणि दिवसा पेंग येते. मात्र आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाला सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. ती न झाल्याने आरोग्यावर परिणाम दिसू लागतात. तरुणपणी जाणवणारा उत्साह, जोश गमावून बसतो आणि आळसामुळे शरीर शिथिल होते.
तळलेले पदार्थ आणि जंक फूड :
तळलेले पदार्थ खावेत, पण प्रमाणात आणि तेही घरी बनवलेले. कारण ते स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेले असतात. याउलट बाहेर मिळणारे तेलकट पदार्थ तेलाचा पुनर्वापर करून बनवले जातात, जे आरोग्यासाठी घातक असतात. कोलेस्ट्रॉल वाढते, हृदय विकार ओढवतात, रोग प्रतिकार शक्ती कमी होते. जंक फूडमध्ये प्रिझर्व्हेटिव्हचा वापर केला असल्याने त्या पदार्थांच्या सेवनाने शरीराला नानाविध अपाय होतात. शिवाय अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता वाढते. या बाबींमुळे तारुण्य कमी आणि वार्धक्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात.
सिगारेट, दारूचे सेवन :
तरुणपणी वाईट संगतीमुळे व्यसन जडू शकते. काही जण कॉर्पोरट कल्चरच्या नावाखालीदेखील व्यसन करतात. 'ओकेजनली' असे गोंडस समर्थन करतात. मात्र हळू हळू नियंत्रण सुटले की व्यक्ती व्यसनाधीन होते. खंगत जाते. विकार जडतात. चेहऱ्यावर वार्धक्याच्या खुणा दिसू लागतात आणि काही जणांच्या बाबतीत अकाली मृत्यूही ओढवतो.
व्यायामाचा अभाव :
हेल्थ कॉन्शस लोक डाएटवर भर देतात आणि तो दिलाही पाहिजे, मात्र डाएट बरोबर व्यायामही हवा. बैठ्या कामांमुळे आपल्या शरीराला पुरेशी हालचाल मिळत नाही. त्यामुळे शरीराच्या यंत्रणेत वारंवार बिघाड होतो. सतत एसी मध्ये बसून राहिल्याने शारीरिक श्रमाचा घाम निघत नाही. शरीरातले अनावश्यक घटक बाहेर पडत नाहीत. हाडांना बळकटी येत नाही. शरीर लवचिक होत नाही. ही यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी दिवसभरात १० ते २० मिनिटे व्यायाम हवाच. चालणे, नाचणे, सूर्य नमस्कार घालणे, योगाभ्यास करणे यापैकी कोणताही प्रकार करू शकतो. अन्यथा दादा, ताई असण्याच्या वयात काकू, काका, मावशी, आजी हे ऐकण्याची वेळ येईल.
सतत काळजी किंवा अतिविचार :
माणूस शारीरिक आजाराने जेवढा खचून जात नाही तेवढा मानसिक आजाराने लवकर खचतो. अतिविचार किंवा अति काळजी हा एक मानसिक आजार आहे. तो नियंत्रणात आणला नाही तर व्यक्ती सैरभैर होते. कोशात जाते. नैराश्य ओढावून घेते. अशी व्यक्ती पोक्त माणसांसारखी आयुष्य जगते आणि तरुणपणीचे चैतन्य गमावून बसते. भूतकाळ विसरा, वर्तमानात जगा, कष्ट करा आणि भविष्य नियतीवर सोडून द्या.