Join us  

ब्रेकअप तर झाला पण तरी ‘एक्स’ची फार आठवण येतेय? ब्रेकअप करुन चूक झाली असं वाटलं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2022 3:09 PM

Relationship Breakup तरुण जोडपी पटापट प्रेमात पडतात तशीच पटापट ब्रेकअपही करतात. असा ब्रेकअप झाला आणि पुन्हा त्याच जोडीदाराची आठवण छळायला लागली तर काय करायचं?

पटत नाही, भांडणं होतात म्हणून अनेक जोडपी ब्रेकअप करतात. पण कालांतराने ब्रेकअप केल्याचा पश्चाताप होतो. ब्रेकअपनंतर जोडीदाराची आठवण येणे आणि पुन्हा ते नातं हवंसं वाटणे असंही काहींच्या बाबतीत होतं. ब्रेकअपची अनेक कारणे असू शकतात. अनेक वेळा लोक रागाच्या भरात जोडीदारासोबतचे नाते संपुष्टात आणतात, तर अनेक वेळा आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी जोडीदारापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. काहींना तर ब्रेकअप नंतर आपण खरंच प्रेमात होतो याची जाणिव होते. पण अशावेळी फिल्मी अतिरेक न करता काय केलं ब्रेकअपनंतरही नात्याला पुन्हा एक चान्स देता येईल. अर्थात पार्टनरची तयारी असेल तर, जोरजबरदस्ती करण्यात काहीच अर्थ नाही हे लक्षात ठेवलेलं बरं.

ब्रेकअपनंतर आधी स्वतःशी बोला..

ब्रेकअपनंतर जोडीदाराची फार आठवण येत असेल. पुन्हा ते नातं हवंसं वाटतं आहे ते का, हे तुम्ही आधी स्वतःला विचारा. तुम्हाला पुन्हा एकदा नात्याची सुरुवात का करायची आहे? ब्रेकअप नक्की कशानं झालं, तुम्ही का केलं?  तुमच्या दोघांमधली समस्या किती गंभीर आहे आणि रिलेशनशिपमध्ये परत आल्यानंतर तुम्ही पुन्हा त्या समस्यांना तोंड देऊ शकाल का? हे व असे अनेक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. याचे उत्तर योग्य मिळाले. तुमचा निर्णय ठाम असेल तर, तुम्ही त्या व्यक्तीसह पुन्हा नव्याने नात्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करु शकता.

तुम्हाला वाटतं पण त्याचं काय?

ब्रेकअपनंतर जर आपल्याला वारंवार आठवण येत असेल तर, तुम्ही आपल्या एक्स जोडीदाराच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेतले पाहिजे. आपल्या जोडीदाराला देखील पुन्हा नात्यात यायचे आहे का ? त्याला आपली आठवण येते का ? जोडीदाराच्या मनात आपल्या विषयी तितकेच प्रेम राहिले आहे का ? जर, आपल्या जोडीदाराच्या मनात आपल्या विषयी असलेली भावना संपुष्टात आली असेल तर, पुन्हा नात्याची सुरुवात करणे अयोग्य ठरेल. त्यामुळे जोडीदाराच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे.

एक्सशी थेट बोला.. न भांडता..

ब्रेकअपनंतर पुन्हा नात्यात यायचे असेल. तर, मागचे विसरून तुम्ही नव्याने नात्याची सुरुवात करू शकता. एकेमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा उद्भवलेल्या समस्यांवर तोडगा काढणे उत्तम ठरेल. ब्रेकआप कोणत्या कारणावरून झाले, ती चूक पुन्हा दोघांकडून घडणार नाही याची देखील खबरदारी दोघांनी घेतली पाहिजे.

स्वतःवर विश्वास ठेवा

एकदा नातं तुटलं की कदाचित तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याविषयी असलेला विश्वास आणि कनेक्शनमध्ये कमी होऊ शकते. किंवा स्वतःच्या मनात देखील जोडीदाराविषयी असलेला विश्वास कमी होऊ शकतो. असं झाल्यावर आपल्या जोडीदाराशी मैत्री करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू ब्रेकअपमुळे झालेलं कडू वातावरण गोडव्यात बदलेल. आणि या कारणामुळे एकमेकांच्या मनात पुन्हा नव्याने विश्वास वाढेल.

कामात बिझी राहा

ब्रेकअपनंतर वारंवार जोडीदाराची आठवण येणे साहजिक आहे. मात्र, आपल्या पार्टनरसह घालवलेले क्षणांची आठवण न काढता. स्वतःला इतर कामात मन रमवा. तुमचे मन इतर चांगल्या गोष्टीत गुंतवा, ज्यामुळे ब्रेकअप आणि पार्टनर सह घालवलेले क्षण विसराल आणि आनंदी जीवन जगाल. यासह परीवार आणि मैत्रीणीना वेळ द्या. त्यांच्यासोबत राहून तुम्ही तुमचे दु:ख निश्चित विसराल.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप