Join us  

 मीरा राजपूत उत्तम तब्येतीसाठी तूप पिते, असं तूप खरंच कधीही प्यावं का? आयुर्वेद तज्ज्ञ म्हणतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2022 2:16 PM

मीरा राजपूत जसं तूप पिते तसं आपणही पिलं तर चालेल का? आयुर्वेद तज्ज्ञ काय म्हणतात?

ठळक मुद्देतूप पिणं ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. मीरा राजपूत तूप पिते म्हणून आपण ते पिणं हे अंधानुकरण असून ते आरोग्यास नुकसानकारक आहे. 

ब्यूटी आणि फिटनेससाठी मीरा राजपूत अनेक तरुण मुली आणि महिलींचीसुध्दा आयकाॅन आहे. दोन मुलांची आई असलेली मीरा जशी फिट दिसते तसं आपणही दिसावं असं अनेकींना वाटतं. मीरा राजपूत फिटनेस आणि ब्यूटीबद्दल माहिती देणारे अनेक व्हिडीओज, फोटो समाज माध्यमात टाकत असते. तिच्या या पोस्टना लाखो व्ह्यूज मिळत असतात. नुकतीच मीरा राजपूतने इन्स्टाग्रामवर एक फोटो स्टोरी पोस्ट केली आहे. विना मेकअप आणि नो फिल्टर असलेल्या फोटोत मीरा राजपूतची त्वचा छान चमकते आहे. या पोस्टमध्ये तिने औषधी तूप पिण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे.

हा फोटो व्हायरल झाल्याबरोबर मीरा राजपूत सौंदर्यासाठी तूप पिते, त्वचा चांगली राहाण्यासाठी मीरा राजपूतप्रमाणे तूप पिणं गरजेचं अशा चर्चा सुरु झाल्या. या पार्श्वभूमीवर नाशिकस्थित प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य राजश्री कुलकर्णी ( एमडी, आयुर्वेद)  यांनी तूप पिण्याच्या शास्त्रीय पध्दतीबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय केवळ मीरा राजपूत करते, तिला फायदा झाला म्हणून आपणही करावं असं अंधानुकरण करणंं चुकीचं कसं याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.

Image: Google

तज्ज्ञांच्या देखरेखीखाली स्नेहनवैद्य राजश्री कुलकर्णी म्हणतात की, मीरा राजपूत जे औषधी तूप पिते आहे त्याला स्नेहन किंवा स्नेहपान असं म्हणतात. स्नेहन हे आयुर्वेदातील पंचकर्मातील शुध्दीकरणाची प्रक्रिया आहे. आयुर्वेदातील वमन/ विरेचन या पंचकर्माच्या शुध्दीकरण प्रक्रिया केल्या जातात तेव्हा स्नेहन म्हणून मोठ्या प्रमाणावर तूप प्यायला दिलं जातं. त्यापाठीमागे शास्त्रीय कारण आहे. आपण जो रोजचा आहार घेत असतो त्यातून तसेच हवामानात  बदल होत असतात त्यातून आपल्या शरीरात वेगवेगळे विषार तयार होत असतात. हे विषारी घटक दोन प्रकारच असतात. एका प्रकार म्हणजे जलविलय अर्थात पाण्यात विरघळणारे असतात. जलविलय असणारे विषारी घटक रोजच्या रोज घाम, मूत्र या मार्गाने शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करतं. विषारी घटकांचा दुसरा प्रकार म्हणजे स्नेहविलय.  म्हणजे ते फॅट सोल्यूबल असतात.  ते जर फॅट दिले  जास्त प्रमाणात तरच विरघळून बाहेर पडतात. त्यासाठी स्नेहनाची प्रक्रिया आयुर्वेदात आहे.

वमन, विरेचन हे पंचकर्म करताना स्नेहपान नावाचा विधी केला जातो. ज्यामध्ये तूप प्यायला दिलं जातं. हे औषधी तूप सकाळी उपाशी पोटी मोठ्या प्रमाणात प्यायला दिलं जातं. हे प्रमाण एवढं असतं की तेवढ्या प्रमाणात आपण आहारातून तूप घेऊ शकत नाही आणि ते घेणं अपेक्षितही नसतं. तूप हे दिसायला कमी दिसत असलं तरी ते पचायला जड असतं . रोजच्या जेवणात  1 किंवा 2 चमचा तूप घेणं, दुधात टाकून एखादा चमचा तूप पिणं योग्य. तेवढीच आपल्या शरीराला तूपाची गरज असते. त्यामुळे  मीरा राजपूतनं अमूक मिली तूप प्यायलं म्हणून आपणही तितकं पिणं ही गोष्ट चुकीची आहे. तूप पिणं ही आयुर्वेदातील एक प्रक्रिया असून ती वैद्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखीखालीच करावी लागते. 

Image: Google

रोज किती तूप खावं?

एरवी रोजच्या आहारात तूप पिणं अपेक्षित नसून् तूप सेवन करणं अपेक्षित असतं आणि तेच आरोग्यास  फायदेशीर ठरतं.  'तूप खाऊन रूप येतं' ही म्हण एकदम योग्य आहे. कारण रोजच्या आहारात तूप खाल्ल्यानं त्वचा चांगली होणं, तरुण दिसणं, एजिंगची प्रक्रिया उशिरा होणं हे फायदे होतात. हे तूप खाण्याचे चांगले परिणाम असून त्यासाठी वाटी-वाटी तूप पिण्याची गरज नाही. शरीराला जशी इतर पोषक मूल्यांची गरज असते तशाच प्रकार काही प्रमाणात फॅटसची गरज असते. तेवढ्या प्रमाणात तूप/तेल खाणं आवश्यक असतं.  दूधात 1/ 2 चमचे तूप  घालून पिणं, भात/ आमटीवर तूप घेऊन खाणं, पोळीला तूप लावून खाणं, पदार्थांना तूपाची फोडणी देणं.. अशा प्रकारे आणि एवढ्या प्रमाणात तूप घेणं अपेक्षित असतं आणि योग्य असतं.  रोजच्या आहारात 50 मिली, 100 मिली तूप घेणं हे अयोग्य असून त्याचा शेवटी पचनावर परिणाम होतो. शुध्दीकरणादरम्यानं जेव्हा रुग्णाला औषधी तूप प्यायला दिलं जातं तेव्हा खाण्याचे नियम अत्यंत कडक असतात.  तूप प्यायला दिल्यानंतर पहिले सहा तास त्यांना काहीही खाऊ दिलं जात नाही.  नंतर जेव्हा भूक लागते तेव्हा मूग डाळीचं वरण आणि भात एवढंच खायला दिलं जातं. हे तूप जेव्हा प्यायला दिलं जात तेव्हा पोटातल्य अग्नीला जपणं आवश्यक असतं. म्हणूनच कोणाचं अनुकरण म्हणून मनाला येईल तेवढं तूप पिणं, त्यानंतर दिवसभर जड आहार घेणं यामुळे अग्नी क्षीण होतो.  त्यामुळे स्नेहन हे फक्त पंचकर्मात शुध्दीकरणाच्या वेळेसच केलं जातं एरवी स्वत:च्या मनानं घरी करु नये.

Image: Google

रोजच्या आहारात तूप का गरजेचं?

मेंदू आणि हदय हे शरीरातील अत्यंत महत्वाचे अवयव व्यवस्थितपणे काम करण्यासाठी रोज थोडं तूप खाणं आवश्यक आहे. तुपामुळे शरीरातील स्निग्धता टिकून राहाते. स्मरणशक्ती तल्लख राहाते. त्वचेचा पोत सुधारतो, त्वचेचा वर्ण उजळतो, त्वचेवर सुरकुत्या पडत नाही.  

टॅग्स :आरोग्यआहार योजनाहेल्थ टिप्समीरा राजपूतसोशल व्हायरल