Join us  

आंघोळ करताना टाळा ५ चुका, त्वचा आणि केसांवर होतात गंभीर दुष्परिणाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 4:41 PM

5 Common Bathing Mistakes You Should Never Make : आंघोळीदरम्यान तुम्हीही करता का या चुका, त्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते....

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आपण सकाळी उठून सर्वात आधी आंघोळ करतो. आंघोळ हा आपल्या दिनचर्येचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ तर राहतेच, पण तंदुरुस्त देखील होते. दिवसभर काम करून थकून जेव्हा आपण संध्याकाळी घरी येतो तेव्हा आपल्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे स्वच्छ आंघोळ करून आराम करणे. विशेषतः उन्हाळ्यात तर या अंघोळीची अधिकच गरज भासते. वाढत्या उष्णतेमुळे घामाने आपण हैराण होऊन जातो, अशा वेळी स्वच्छ आंघोळ करून फ्रेश राहणे सगळ्यांनाच आवडते. 

वेळच्या वेळी आंघोळ करणे आणि शरीराची स्वच्छता ठेवणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फारच गरजेचे असते. आंघोळ आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेकवेळा आपण आजारांना बळी पडू शकतो. यासाठी आंघोळ करून शारीरिक स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. परंतु आपल्यापैकी बहुतेकजण आंघोळ करताना अशा चुका करतात, ज्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेला हानी पोहोचवण्याचे काम करतात. नक्की कोणत्या आहेत या चुका ते पाहूयात(Stop making these 5 common shower mistakes if you love your hair and skin).

आंघोळ करताना होणाऱ्या नेमक्या चुका कोणत्या ? 

१. चुकीच्या साबणाचा वापर :- चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या शरीरात असतात. शरीरातील रोगजनक जंतू नष्ट करण्यासाठी अँटीबॅक्टेरियल साबण वापरण्याचा सल्ला दिला जातो, परंतु काहीवेळा तो शरीरातील चांगले जीवाणू देखील मारतो. त्यामुळे काही साबण त्वचेला कोरडे करतात, तर त्यामुळे शरीरावर वाईट बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आंघोळीसाठी असा साबण निवडा जो सौम्य असेल आणि त्यात तेल आणि क्लिन्झरचे गुणधर्म असतील. जर आपल्याला खाज येण्याची समस्या असेल किंवा त्वचा खूप संवेदनशील असेल, तर जास्त सुगंध असलेला साबण वापरणे टाळा, यामुळे त्वचेला जास्त नुकसान होऊ शकते.   

केमिकल शाम्पू लावून लावून केसांचा झाडू झाला? रिठ्याचा ' असा ' करा वापर, केस होतील मऊ चमकदार...

२. आठवड्याला टॉवेल न बदलणे :- ओल्या टॉवेलमध्ये अनेक प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया असतात. त्यामुळे बुरशी, खाज सुटणे आणि अनेक प्रकारचे संक्रमण होण्याचा धोका असतो. त्यामुळे या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर दर आठवड्याला टॉवेल बदलत राहा. यासोबतच आंघोळीनंतर टॉवेल व्यवस्थित सुकवणे आवश्यक आहे, जेणेकरून बॅक्टेरिया आणि विषाणूंची वाढ होण्याची शक्यता कमी होईल.

फेशियल केल्यानंतर लगेच चेहऱ्यावर वाफ घेण्याचे ४ फायदे, मिळवा चमकदार सुंदर ग्लो...

 ३. लूफा स्वच्छ न करणे :- लूफाचा वापर शरीराला स्क्रब करण्यासाठी केला जातो, परंतु वापरल्यानंतर ते नीट स्वच्छ न केल्यास त्यातही जंतू सहज वाढू शकतात. त्यामुळे आंघोळीनंतर लूफा पाण्याने नीट धुवून स्वच्छ करा. तसेच, वापरल्यानंतर, लूफा सहज सुकते अशा ठिकाणी ठेवा. स्वच्छता राखण्यासाठी दर ३ आठवड्यांनी तुमचा लूफा बदलावा. लूफाची वेळच्या वेळी स्वच्छता केली नाही तर त्यातील जंतू संसर्गामुळे आपल्या त्वचेला वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीजन्य आजार होऊ शकतात. 

४. अति गरम पाण्याचा वापर :- गरम पाण्याने अंघोळ करणे त्वचेसाठी चांगले नाही. त्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल संपुष्टात येऊ लागते, त्यामुळे त्वचा कोरडी होते. कोरडेपणामुळे खाज येण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे खूप गरम पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी. त्वचेचे कोणतेही संसर्गजन्य आजार असल्यास गरम पाण्याने अंघोळ अजिबात करू नये. 

५. वारंवार केस धुणे :- आंघोळ करत असताना जर आपण आपले केस रोज धुत असाल तर त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. त्यामुळे दररोज शॅम्पू केल्यानेही केसांची गुणवत्ता खराब होऊ शकते. त्यामुळे रोज केस धुणे टाळावे.

सतत होणाऱ्या केस गळतीमुळे हैराण ? खोबरेल तेलाचा घरगुती हेअर मास्क वाढवेल केसांचे सौंदर्य...

टॅग्स :सोशल व्हायरल