Join us  

एकादशीचा उपवास तर केला, पण सोडताना काय करायचं? लक्षात ठेवा ४ गोष्टी, होणार नाही त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2022 1:32 PM

Ashadhi Ekadashi Fasting Tips : उपवासाच्या दुसऱ्या दिवशीही सकाळी काय खायला हवे, काय टाळायला हवे याविषयी...

ठळक मुद्देपवास सोडताना खीर खाल्ल्यास उपवास सोडल्यानंतर अशक्तपणा वाटण्याची तक्रार दूर होते.उपवासामुळे अॅसिडीटी, अपचन होण्याची शक्यता असते त्यामुळे उपवास करताना आणि सोडताना योग्य ती काळजी घ्यायला हवी

एकादशी दुप्पट खाशी असं म्हटलं जात असलं तरी विठूरायावर असलेल्या श्रद्धेपोटी आषाढी एकादशीचा उपवास आपल्याकडे आवर्जून केला जातो. इतकेच नाही तर रोज-रोज पोळी-भाजी खाऊन कंटाळा आल्याने त्यानिमित्ताने वेगळे पदार्थ खायला मिळतील म्हणून हा उपवास करणारेही अनेक जण आहेत. पण उपवासाचे पदार्थ काही प्रमाणात वातूळ असल्याने ते प्रत्येकाला पचतातच असं नाही. उपवासाच्या पदार्थांमुळे पित्त होणे, मळमळ किंवा उलट्या होणे असे प्रकार होतात (Ashadhi Ekadashi). उपवास करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे ज्याप्रमाणे महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे उपवास सोडताना काय काळजी घ्यायची हेही पाहायला हवे (Fasting Diet Tips).   

(Image : Google)

काही जण भक्तीपोटी निर्जल किंवा फलाहार करुन कडक उपवास करतात. मात्र पोटाला अशाप्रकारे त्रास देणे काहीवेळा महागात पडू शकते. तर उपवासाला खाल्ले जाणारे साबुदाणा, दाणे, बटाटा हे पदार्थ वातूळ असल्याने गॅसेस, अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. उपवासाच्या दिवशी खाण्या-पिण्याची काय काळजी घ्यायची हे आपल्याला माहित आहे, मात्र उपवास सोडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नाहीतर उपवासामुळे आरोग्याला त्रास होण्याचा धोकाच अधिक. उपवासामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी खूप जास्त प्रमाणात खाणे किंवा इतर चुकीचा आहार त्रासदायक ठरु शकतो. त्यामुळे उपवासाच्या दुसऱ्या दिवशीही सकाळी काय खायला हवे, काय टाळायला हवे याविषयी...

आषाढी एकादशीचा उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, उपवासाचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही

१. नाश्ता टाळू नका

सकाळच्या घाईत अनेकांना नाश्ता करण्याची सवय नसते. घरातली कामं, आवराआवर आणि ऑफीसला पोहोचचण्याची घाई या नादात हे लोक सकाळी चहा-बिस्कीट खाऊन थेट १२.३०-१ वाजता जेवतात. मात्र आदल्या दिवशी उपवास केला असेल तर असे करु नये. सवय असेल तर सकाळी अर्धा कप चहा घेणे ठिक आहे पण त्यानंतर आवर्जून नाश्ता करायला हवा. नाहीतर अॅसिडीटी, अपचन, डोकेदुखी होण्याची शक्यता असते. 

२. चहाऐवजी काय घेता येईल..

उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शक्यतो चहा टाळलेला चांगला. त्याऐवजी तुम्ही गार दूध किंवा एखादे फळ, सुकामेवा खायला हवा. कारण उपवासाचे बरेचसे पदार्थ वातूळ किंवा पित्तकारक असतात. अशात सकाळी उठल्यावर चहा प्यायल्यास पित्त आणखी खवळू शकते. त्यापेक्षा फळ, दूध अशा नैसर्गिक गोष्टी घेतल्यापचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. 

Weight Loss Diet Tips : तुम्हीही व्हाल मस्त बारीक, वजन होईल कमी- डाएटमध्ये करा फक्त ५ छोटे बदल

३. नाश्त्याला कोणते पदार्थ खाल? 

उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता करताना मसालेदार, तळलेले पदार्थ असा असू नये. उपवासामुळे पोटाला एकप्रकारचा आराम मिळालेला असतो. अशात आपण पोटाला एकदम ताण दिल्यास त्यामुळे पचन बिघडू शकते. अशावेळी शक्यतो हलके पदार्थ खाल्ल्याने पोटाला आराम मिळण्यास मदत होते. यामध्ये आपण रव्याचा उपमा किंवा शिरा, तांदळाची उकड, भाज्यांचे सूप, मऊ भात, ज्वारीची गरम भाकरी, दलियाचा उपमा अशा गोष्टी खाऊ शकतो. 

(Image : Google)

४. आवर्जून खा खीर

उपवास सोडताना जेवणात रव्याची, तांदळाची , गव्हाची, दलियाची किंवा शेवयाची खीर खावी. कारण खीरीमधे प्रथिनं आणि कर्बोदकं असतात. या आहार घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. उपवास सोडताना खीर खाल्ल्यास उपवास सोडल्यानंतर अशक्तपणा वाटण्याची तक्रार दूर होते. फक्त खीर करताना त्यात साखरेचा वापर जपून करावा, किंवा गूळ वापरावा. यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवत नाही. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआषाढी एकादशीआहार योजनाआरोग्य