Join us  

उपवास करूनही वजन वाढतंय, त्यात पित्ताचा ताप? मग मिलेट्स प्रकारातले हे पारंपरिक सुपरफूड खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 1:32 PM

वजन कमी करण्यासाठी श्रावणात उपवास करत असाल, तर खाण्यापिण्याची पथ्ये पाळलीच पाहिजे. अन्यथा उपवास तर घडतील, पण वजन मात्र वाढेल.

ठळक मुद्देभगर ही अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे तिचा वापर केवळ उपवासापुरताच मर्यादित ठेवू नये. अधूनमधून नाश्त्याला भगरीची खिचडी किंवा रात्रीच्या जेवणात भगर आमटीचा बेत अवश्य बनवावा. 

श्रावणात बहुसंख्य महिला वेगवेगळ्या करणांनी उपवास करत असतात. श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवारचा उपवास तर ८० टक्के महिला करतात. यात तरूणींचे प्रमाणही मोठे आहे. उपवासाच्या निमित्ताने वजन कमी होईल, या उद्देशाने आता उपवास करण्याचा नवा ट्रेण्ड आला आहे. पण जर खरोखरच उपवास करून वजन कमी व्हावे असे वाटत असेल आणि उपवासामुळे थकवाही येऊ द्यायचा नसेल, तर उपवासाच्या दिवशी साबुदाणा खाण्याऐवजी भगर खाण्याला प्राधान्य द्या. 

 

भगरीमध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे वजन वाढत नाही. भगर ग्लूटेनमुक्त असून तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहींसाठी देखील भगर उपयुक्त ठरते. त्यामुळे ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत, ज्यांना वजन वाढीचा खूप त्रास आहे, अशा व्यक्तींनी एरवीही भगर खाण्यास हरकत नाही. भगरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे थोडी भगर खाल्ली तरी पोट भरल्यासारखे वाटते आणि शिवाय एनर्जीही अधिक काळासाठी टिकून राहते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी भगर खाण्यास प्राधान्य द्यावे. साबुदाणा पचायला जड आहे. साबुदाणा खाल्ल्यामुळे चयापचय क्रिया बिघडते. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन वाढते. शिवाय साबुदाणा खाल्ल्यामुळे अनेकांना ॲसिडिटीचाही त्रास होतो. 

भगर खाण्याचे फायदे- भगर पचायला खूप हलकी असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी तिचा कसलाही त्रास होत नाही.-  नो कॅलिरिज फुड आणि नो शुगर फुड म्हणून भगर ओळखली जाते. त्यामुळे भगरीच्या सेवनाने वजन वाढत नाही. त्यामुळेच मधुमेह असणाऱ्या आणि हृदयरोग असणाऱ्या रूग्णांनीही भगर खाण्यास प्राधान्य द्यावे. - भगरीमध्ये फायबर, आयर्न, प्रोटिन्स आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे थोडी भगर खाल्ली तरी उपवासाच्या दिवशी थकवा जाणवत नाही. - भगरीच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेचा तसेच गॅसेस आणि अपचनाचा त्रासही होत नाही. - भगरीमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तींनी लोहाचे प्रमाण वाढावे म्हणून नेहमी भगर खावी. इतर कोणत्याही धान्यातून भगरीइतके जास्त आयर्न मिळत नाही.

- भगरीमध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि इ तसेच खनिजे यांचे चांगले प्रमाण असते. - सोडियम फ्री फूड म्हणून भगर ओळखली जाते. त्यामुळे ज्यांना बीपीचा त्रास असतो, त्यांनीही उपवासाला भगरच खावी. - भातापेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट्स भगरीमध्ये असतात.

 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सपौष्टिक आहार