Join us  

Dasra 2022 : ९ दिवसांचे उपवास सोडताना लक्षात ठेवा १० गोष्टी, तज्ज्ञ सांगतात, कसा असावा दसऱ्याचा आहार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2022 11:39 AM

Important Diet Tips How to Break Navratri Fasting : ९ दिवसांचे ठिक आहे पण हा उपवास सोडताना काय काळजी घ्यायची हे लक्षात घ्यायला हवे.

ठळक मुद्देनेहेमीच्या पदार्थांबरोबर थोड्या प्रमाणातच सणासुदीचे विशेष पदार्थ खा, म्हणजे आहारात संतुलन राहीलनेहेमीचं खाणं पिणं सुरू करतानाही, भरपूर पाणी आणि पातळ पदार्थ घ्या. त्यामुळे पचन तर चांगलं होईलच पण डीहायड्रेशनही होणार नाही

सुकेशा सातवळेकर

 नवरात्रीचे उपास म्हणजे केवळ धार्मिकता नसून स्वत:वरचा ताबा वाढविण्याचे हे एकप्रकारचे प्रशिक्षण असते. पावसाळ्यामुळे मंदावलेली पचनशक्ती सुधारून, शरीरशुद्धी करणं ह्यासाठी केलं जाणारं हे एक महत्त्वाचं व्रत ! ऋतुबदलामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवायची गरज असते, उपवास हा त्यावरचा उत्तम उपाय. ९ दिवस सलग उपवास केल्यानंतर काहीसं हलकं वाटतं, थोडं अशक्त वाटतं किंवा खूप फ्रेश वाटतं असे सांगणारे आपल्या आजुबाजूला बरेच जण असतात. आता ९ दिवस उपवासाचं तेही  योग्य तेच पदार्थ आणि कमी प्रमाणात खाणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही (Important Diet Tips How to Break Navratri Fasting). 

(Image : Google)

आता ९ दिवसांचे ठिक आहे पण हा उपवास सोडताना काय काळजी घ्यायची हे लक्षात घ्यायला हवे. उपवास जेवढे महत्त्वाचे तेवढंच महत्त्व, ते योग्य रीतीने सोडण्याला आहे ! दसऱ्याच्या दिवशी पक्वान्न आणि तळलेल्या पदार्थांवर ताव मारला तर पचनशक्ती वर खूप मोठा ताण पडेल. ९ दिवसांच्या उपवासाने मंद झालेल्या पचनक्रियेला अचानक ताण दिल्यास हे पदार्थ पचायला अवघड पडतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, उपवासामुळे मिळालेला शरीरशुद्धी आणि सकारात्मकतेचा लाभही नाहीसा होईल. तेव्हा उपवास सोडताना आवर्जून लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी... 1) पचायला हलके आणि लो कॅलरी पदार्थ थोड्या प्रमाणात खात नेहमीचे अन्नपदार्थ घेण्यास सुरुवात करावी.

2) फक्त फळं, दूध, सुकामेवा खाऊन उपास केले असतील तर सोडताना बीट/गाजर/दुधी भोपळा/पालक यांचा रस, दाल सूप किंवा भाज्यांचं सूप, दही, ताक घ्या.

3) पचनशक्ती हळूहळू पूर्वपदावर आली की मग इतर पदार्थ थोड्या प्रमाणात आणि थोड्या थोड्या वेळाने खायला सुरुवात करा.

4) पचन आणि भूक सुधारेल तेव्हा गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य खायला हरकत नाही, मात्र सुरुवातीला हे जड पदार्थ घेणे शक्यतो टाळा.

5) उपवास सोडताना साखर, मीठ, मैदा आणि तेल, तूप मर्यादित स्वरूपातच वापरायला हवं.

6) तळलेले, तेलकट, तुपकट आणि पचायला जड पदार्थ चवीलाच खा. म्हणजे उपासा मुळे कमी झालेलं वजन आणि टॉक्सिन्स परत वाढणार नाहीत.

7) शक्यतो 2 ते 3 वेळाच खाण्यापेक्षा 5 ते 6 वेळा थोडं थोडं खा.

8) नेहेमीचं खाणं पिणं सुरू करतानाही, भरपूर पाणी आणि पातळ पदार्थ घ्या. त्यामुळे पचन तर चांगलं होईलच पण डीहायड्रेशनही होणार नाही

9) मसालेदार, तिखट पदार्थ शक्यतो टाळा, म्हणजे पित्तविकार आणि पचनाच्या तक्रारी उद्भवणार नाहीत.

10) नेहेमीच्या पदार्थांबरोबर थोड्या प्रमाणातच सणासुदीचे विशेष पदार्थ खा, म्हणजे आहारात संतुलन राहील आणि अनावश्यक कार्ब्ज आणि फॅटसचा बोजा वाढणार नाही

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.) 

dietitian1sukesha@yahoo.co.in 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाआरोग्यनवरात्रीदसरा