Join us  

दुपारी ४ नंतर शक्यतो फळं खाऊ नयेत, तज्ज्ञ सांगतात यामागचे नेमके कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2023 12:56 PM

Know Why No Fruits After 4 Pm : आहाराचे काही नियम असतात, ते पाळल्यास तब्येत दिर्घकाळ चांगली राहण्यास मदत होते

आपल्या आहारात फळांचा जास्तीत जास्त समावेश असायला हवा असं आपण नेहमी वाचतो, ऐकतो. फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्याने ती खाल्ल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळण्यास मदत होते. इतकेच नाही तर फळांमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स, खनिजे यांचे प्रमाण चांगले असल्याने शरीराचे चांगले पोषण व्हावे यासाठी फळं अतिशय फायदेशीर असतात. हे जरी खरं असलं तरी फळं कोणत्या वेळेला खावीत, कशी खावीत, किती प्रमाणात खावीत याबाबत आपल्याला माहिती असायला हवी (Know Why No Fruits After 4 Pm). 

फळं पचायला हलकी असतात असा आपला समज आहे. मात्र फळं कच्ची असल्याने ती पचायला थोडी जड असतात. आपण खातो ते अन्न शिजवलेले असते त्यामुळे शिजवलेल्या अन्नासोबत शक्यतो फळे खाऊ नयेत. ब्रेकफास्ट किंवा जेवण आणि फळं यामध्ये किमान १ ते २ तासांचा गॅप असायला हवा. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी यांनी फळं खाण्याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर एका पोस्टच्या माध्यमातून त्या दुपारी ४ नंतर फळं का खाऊ नयेत यामागचे कारण समजावून सांगतात. आयुर्वेदामध्ये संध्याकाळच्या वेळी फळं खाऊ नयेत असं सांगितलं आहे, आता असं का असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल. तर त्याचीच कारणे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 

१. अनेक जण संध्याकाळी भुकेच्या वेळी फळं खाणं पसंत करतात. इतर गोष्टींपेक्षा फळं आरोग्यदायी आहेत हे खरे असले तरी फळं शक्यतो संध्याकाळी खाऊ नयेत.

२. फळं खायला सोपी वाटत असली तरी ती प्रकृतीने थंड असतात. तसेच बरीचशी फळं ही गोड आणि आंबट प्रकारात मोडतात. त्यामुळे इतर अन्न खाल्लेले असताना फळं पचणे काहीसे अवघड जाते. 

३. दुपारी ४ नंतर साधारणपणे सूर्य मावळतीला येतो. त्यामुळे हवेत काही प्रमाणात गारठा निर्माण होतो. तसेच फळं गार आणि हलकी असल्याने यावेळी आपण फळं खाल्ली तर वात आणि कफ यांचा त्रास होण्याची शक्यता असते. 

४. फळं पचायला जड असतात त्यामुळे संध्याकाळी फळं खाणं योग्य नाही. तसेच फळं खाल्ल्याने झोपेवरही त्याचा परीणाम होतो आणि रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे सूर्य डोक्यावर असताना फळं खायला हवीत.

५. फळांमध्ये कार्बोहायड्रेटस असतात, त्यामुळे ते पटकन पचतात. तसेच त्यामध्ये असलेल्या साखरेमुळे झटपट ऊर्जा मिळते पण तितक्याच लगेच ते पचते त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर लवकर भूक लागते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाफळे