Join us  

वजन कमी करायचं तर भात बंद करावा की पोळी? तज्ज्ञ सांगतात, काय खाणं फायद्याचं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 2:31 PM

वजन कमी करण्यासाठी ( for weight loss) पोळी फायदेशीर की भात हे कसं ठरवणार? तज्ज्ञ सांगतात दोन्ही पौष्टिकच पण...  वजन कमी करण्यासाठी भात योग्य की पोळी ( roti or rice) हे कसं ठरवणार? हे ठरवण्याची फुटपट्टी आपल्याकडे आहे का? पोळी की भात ( roti or rice for weight loss) असा आपला मनातला गोंधळ दूर करण्यासाठी म्हणूनच तज्ज्ञ काय म्हणतात हे महत्वाचं.

ठळक मुद्देभात किंवा पोळी खाण्याचे प्रत्येकाच्या शरीरावर होणारे परिणाम वेगवेगळे असतात.भाताच्या तुलनेत पोळीमध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात.भात खाताना सोबत वरण/ आमटी आणि भाजीचं प्रमाणही योग्य हवं.

 वरण-भात-भाजी-पोळी हे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणातले (daily diet)  महत्वाचे घटक असतात. निरोगी आरोग्यासाठी चौरस आहार (healthy diet)  महत्वाचा असतो. पण वजन कमी करताना खाण्या पिण्याचे विविध प्रयोग केले जातात. या प्रयोगाचा भाग म्हणून कोणाला वजन कमी करण्यासाठी (weight loss diet)  पोळी खाणं महत्वाचं वाटतं तर कोणाला पोळीमुळे वजन वाढतं असं वाटतं म्हणून ते केवळ भात खातात. पण असे प्रयोग करताना प्रत्यक्ष तज्ज्ञ काय म्हणतात याकडे बघितलंच जात नाही. वजन कमी करण्यासाठी पोळी की भात (roti or rice for weight loss)  याबद्दल आहारतज्ज्ञ स्वाती विष्णोई यांनी अमूकच चांगलं आणि तमूक वाईट असं न सांगता दोन्ही पदार्थातील गुणविशेष विस्तृतपणे सांगून आपल्यासाठी काय योग्य याचा निर्णय स्वत: घेण्याचा सल्ला दिला आहे. स्वाती विष्णोई यांच्या मते वजन कमी करण्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे त्या गोष्टीची सविस्तर माहिती असल्याशिवाय ठरवणं चुकीचं आहे. 

Image: Google

आहार तज्ज्ञ स्वाती विष्णोई म्हणतात की भात किंवा पोळी खाण्याचे प्रत्येकाच्या शरीरावर होणारे परिणाम वेगवेगळे असतात. हे परिणाम बघूनच वजन कमी करण्यासाठी भात खावा की पोळी हे ठरवावं लागतं . कोणाला भात खाल्ल्यानंतर हलकं फुलकं वाटतं, तर कोणाला भात खाल्ल्यामुळे सारखी भूक लागते. कोणाला पोळी खाल्ल्याने जास्त ऊर्जा मिळते तर कोणाला पोळी खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही. अशा प्रकारे भात आणि पोळी प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम करते.  केवळ पोळी खाल्ल्यानं वजन वाढतं, भात खाल्ल्यानंच जाड होतं हे खरं नसून कोणतीही गोष्ट अतिरेकी प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यास तोटा तर होतोच शिवाय वजनही वाढतं. त्यामुळेजे खाणं योग्य वाटतंय ते प्रमाणात आणि योग्य पध्दतीनं खाणं आवश्यक आहे. 

Image: Google

तज्ज्ञ काय म्हणतात पोळी की भात?

1. वजन कमी करण्यासाठी अनेकजण भाताचा पर्याय निवडतात. पण भात खाल्ल्यानंतर पोट भरल्याची जाणीव होत नाही. सारखी भूक लागते. अशा वेळी भात खाण्याची पध्दत चुकते आहे हे समजावं. भातासोबत डाळ, आमटी आणि भाजी यांचं प्रमाण योग्य ठेवलं तर भात खाल्ल्याने पोट भरतं, मन संतुष्ट होतं आणि वजनही वाढत नाही. भाताच्या तुलनेत पोळी कमी खाल्ली तरी पोट भरल्याची भावना लवकर निर्माण होते. त्यामुळे पोळी ही वजन कमी करण्यासाठी योग्य मानली जाते. पोषकतेच्या बाबतीत पोळी आणि भाजीमध्ये फारसं अंतर नाही. पण भाताच्या तुलनेत पोळीमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. भातात ते जवळ जवळ नसतंच. ज्यांना सोडियमाशी निगडित काही समस्या असतील त्यांनी पोळी ऐवजी भात खावा असं स्वाती विष्णोई सांगतात. 

2. पण वजन कमी करण्यासाठी भाताच्या तुलनेत पोळीत प्रथिनं आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. पोळी खाल्ल्यानं पोट लवकर भरतं. जास्तीचं खाणं टाळता येतं. म्हणून वजन कमी करण्यासाठी भाताच्या तुलनेत पोळी खाण्याचा सल्ला दिला जातो.  पोळी पचण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे पोळी ही रक्तातील साखर नियंत्रित करते.

Image: Google

3. भातामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे भात पचायला वेळ लागत नाही. ज्यांना पोटाशी संबंधित विकार असतात त्यांनी पोळीपेक्षा भात खाण्याचा सल्ला दिला जातो. फक्त भात खाताना तो प्रमाणात खावा. भातासोबत वरण/ आमटी आणि भाजीचं प्रमाण जास्त असावं. 

4. पोळी आणि भात आरोग्यासाठी दोन्हीही फायदेशीरच. पण पोळीमध्ये भाताच्या तुलनेत जास्त पोषक घटक असतात. भात खाल्ल्यानं रक्तातील साखर वेगानं वाढते. ही समस्या पोळीच्या बाबतीत नसते. वजन कमी करण्यासाठी भाताच्या तुलनेत पोळी खाणं योग्य पर्याय मानला जातो. पोळीमुळे भूक कमी लागते त्यामुळे वजन आपोआपच नियंत्रित होतं. पण ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि ज्यांची पचन व्यवस्था नीट काम करत नसेल त्यांना पोळी ऐवजी भात खाण्याचा सल्ला दिला जातो. 

Image: Google

5. अन्नपदार्थातील कर्बोदकं ही शरीरास ऊर्जा तर देतातच शिवाय चरबीचं पचन होण्यास मदत करतात. धान्यं, ब्राऊन राइस/ हातसडीचा तांदूळ, डाळ यासारखे घट्क वजन कमी करण्यासाठी , शरीरातील चरबी कमी करण्यासाठी महत्वाचे मानले जातात. आपल्या रोजच्या आहारात कमीत कमी  60 टक्के कर्बोदकं असायला हवीत. योग्य प्रमाणात कर्बोदकांचं सेवन केलं नाही तर वजनावर अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.  कर्बोदकांमुळे शरीराला ऊर्जा मीळते. गुड कार्ब्ज आणि बॅड कार्ब्ज हे कर्बोदकांचे प्रकार आहेत. धान्यं, फळं. डाळी साळी, भाज्या यांच्यात चांगले कार्ब्ज असतात. ही कर्बोदकं पचायला वेळ घेतात. त्यामुळे पोट भरपूर वेळ भरलेलं तर राहातंच सोबतच रक्तातील साखर अचानक वाढत नाही. तर पाॅलिश केलेल्या अन्न घटकांमध्ये बॅड कार्ब्ज असतात. यात पोषक घटकांची कमतरता असते. पाॅलिश केलेल्या तांदळाचा भात खाल्ला तर त्यातील फायबरचं प्रमण नगण्य असतं आणि कर्बोदकांचं प्रमाण जास्त असतं. म्हणूनच अशा प्रकारच्या तांदळाचा भात खाल्ल्यास रक्तातील साखर लगेच वाढते. मधुमेहाचा धोका संभावतो.

वर सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विचार करुन आपल्यासाठी भात चांगला की पोळी हे आपल्याला कोणी ठरवून देण्यापेक्षा आपलं आपण ठरवणं हे जास्त फायदेशीर ठरतं. आपल्याला जे योग्य ठरतं तेच आपण निवडल्यास त्याचा वजन कमी होण्यास, वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते.  

टॅग्स :आहार योजनावेट लॉस टिप्सअन्न