सांगली : जिल्ह्यात रविवार ते सोमवार या चोवीस तासांत नाेंदलेल्या आकडेवारीनुसार जत तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ३६ मि. मी. पाऊस झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगांची दाटी कायम होती.
सोमवारी सकाळी आठ वाजता नोंदविलेल्या आकडेवारीनुसार, चोवीस तासांत मिरज तालुक्यात १३.८, खानापूरमध्ये ३.४, वाळवा-इस्लामपूरला ०.३, तासगावला ४.२, शिराळ्यात १.३, आटपाडीत ९, कवठेमहांकाळला ९, पलूसला ०.९ तर कडेगाव तालुक्यात १.१ मि. मी. पाऊस झाला. सोमवारीही ढगाळ वातावरण कायम होते. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. सलग तिसऱ्या दिवशी पावसाने मुक्काम ठोकला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. या काळात तापमानातही घट होणार आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी कमाल तापमानात घट झाली. रविवारी कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा हे तापमान एक अंशाने कमी आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
चौकट
तालुकानिहाय एकूण पाऊस, मि. मी.
मिरज ५८७.६
जत ५२९.१
खानापूर-विटा ३९०.७
वाळवा-इस्लामपूर ७१३.३
तासगाव ४६५.६
शिराळा १४१७.२
आटपाडी ३५२.२
कवठेमहांकाळ ३७१.१
पलूस ५९७.१
कडेगाव ४७३.८