लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडताना गाळे लिलावाची प्रक्रिया थांबविण्याची विनंती केली. यावेळी पाटील यांनी, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. उद्या मंत्रालयात नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. काळजी करू नका, अशा शब्दात धीर दिला.
पाटील यांनी येथे गाळेधारकांचे म्हणणे ऐकून घेत कागदपत्रांची माहिती घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, नगरसेवक शहाजी पाटील, गटनेते संजय कोरे, नगरसेवक खंडेराव जाधव, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, आयुब हवालदार यांनी पाटील यांना माहिती दिली. नगरपालिकेत ठराव काय झाला आहे, भाडेवाढ, अनामत रक्कम वाढीचा निकष काय धरला आहे, आदी मुद्द्यांवर चर्चा केली.
पाटील म्हणाले की, कोरोनाने अनेक घटकांबरोबर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना विश्वासात न घेता भाडेवाढ, अनामत रकमेत मोठी वाढ करणे योग्य नाही.
शहाजी पाटील म्हणाले, गाळेधारक राष्ट्रवादीचे आहेत, पोटभाडेकरू आहेत, अशा आकसातून ही लिलाव प्रक्रिया राबविली जात आहे. आम्ही नगरपालिकेच्या सभागृहात यास विरोध केला आहे.
गाळेधारकांचे प्रतिनिधी वैभव कोकाटे यांनी जयंत पाटील यांना माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून व्यवसाय नसल्याने गाळेधारकांचे कंबरडे मोडले आहे. भाडे व अनामत रक्कम सहा-सहा पटीने वाढविली आहे. एवढी रक्कम आम्ही कुठून भरणार?
यावेळी आनंदराव मलगुंडे, नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, सुनीता सपकाळ, संगीता कांबळे, गाळेधारकांचे प्रतिनिधी वसंत पाटील, अनिल पावणे, राहुल मगदूम उपस्थित होते.